मुंबई – राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीनंतरचे पुरावे गायब झाले असल्याची धक्कादायक माहिती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. महत्त्वाची कागदपत्रे कपाटात ठेवली होती, ती गायब झाली आहेत असेही त्यांनी म्हटले आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अजित पवार यांच्या नेतृत्त्वातील आमदारांनी सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर शरद पवार विरुद्ध अजित पवार असा वाद सुरु झाला आहे.
या दोन्ही गटाने एकमेकांविरोधात दंड थोपाटल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, हा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी सुरु झाली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निकाल दिला आहे. या निकालाला उद्धव ठाकरे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. तर दुसरीकडे आता अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणातील प्रलंबित प्रकरणावर सुनावणी सुरु केली आहे.