कोरेगाव भिमा : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी मुंबईसाठी काढलेल्या पायी दिंडीचा आजचा चौथा दिवस आहे. रविवारी सकाळी 10 वाजता मातोरी गावातून निघालेले मनोज जरांगे रात्री उशिरा बाराबाभळी (करंजी घाट) येथे पोहचले. बाराबाभळी ते रांजणगांव गणपती असा प्रवास करून रांजणगाव गणपती येथे रात्रीचा मुक्काम करून जरांगे यांनी आज सकाळी पुन्हा मुंबईकडे कूच केली आहे. रांजणगाव मधून सकाळी 9 वाजता जरांगे निघाले असून, कोरेगाव भीमा येथे दुपारच भोजन करून वाघोली येथे आजचा रात्रीचा मुक्कामासाठी रवाना झाले आहेत.
आपल्या चौथ्या दिवसाच्या दौऱ्यात जरांगे यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले. मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, आणि हीच सरकारची अडचण आहे. 60 ते 70 वर्षांचा आमचा लढा आहे, मात्र तरीही आम्हाला आरक्षण दिले नाही. मुख्यमंत्री यांच्यामुळे आतापर्यंत 7 महिन्याचा वेळ दिला, परंतु आता मुंबईत जाणारच आणि आरक्षण मिळवणारच या भुमिकेवर आम्ही ठाम आहोत. आता लढाई आरपारची आहे. गोळ्या झाडल्या तरी चालेल, मात्र आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला. मी असेल नसेल सरकारने काही षडयंत्र रचल्यास हे आंदोलन असेच ताकदीने सुरू ठेवा, असे जरांगे म्हणाले.
श्री राम उत्सव आंदोलनातच साजरा
काल देशभरात अयोध्यातील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा केला गेला. दरम्यान, आम्ही देखील या उत्साहात सहभागी असल्याचे जरांगे पाटील यांनी प्रभात च्या प्रतिनिधी शी बोलताना सांगितले. आमच्या पायी दिंडीत आम्ही हा आनंद साजरा केला असल्याचे जरांगे यांनी सांगितले. आम्ही देखील रामभक्त असून, आम्हाला देखील याचा आनंद आहे. मात्र, सोबतच आमच्या लेकरांच्या आयुष्यासाठी आरक्षणाचा मुद्दा देखील तेवढाच महत्वाचा असल्याचे जरांगे म्हणाले.
ठिकठिकाणी जेवणाची सोय…
मुंबईला निघतांना मराठा आंदोलकांनी सोबत जेवणाची सोय म्हणून अन्नधान्य, पिण्यासाठी पाण्याच्या बॉटल, बिस्कीट असे पदार्थ घेण्याचे आवाहन जरांगे यांनी केले होते. गरज पडल्यास ज्या ठिकाणी थांबू तिथेच स्वयंपाक करून आपल्या जेवणाची सोय करावी लागेल असेही जरांगे म्हणाले. मात्र, प्रत्यक्षात मागील तीन दिवसांत आंदोलकांना एकही दिवस स्वतः स्वयंपाक करण्याची वेळ आली नाही. कारण दुपारी आणि रात्रीच्या थांब्याच्या ठिकाणी स्थानिक गावकरी यांच्याकडून जेवण्याची सोय करण्यात येत आहे.
सकल मराठा समाज एकवटला
लाखोंच्या संख्येने मुंबईकडे निघालेल्या मराठा समाजाच्या स्वागतासाठी सणसवाडी कोरेगाव भीमा वढू डिंग्रजवाडी, पेरणे लोणीकंद फुलगाव तुळापूर गावांतील सकल मराठा समाजाने एकत्र येत मसाले भात,वरण भात, गरम गरम भाकरी, शेंगदाणा चटणी, पाण्याच्या बॉटल, ज्यूस यांसह मोठ्या प्रमाणावर खाद्य पदार्थ पुरविण्याचे काम केले.
पोलीस प्रशासनाने घेतली कायदा व सुरक्षेची काळजी
१ अप्पर पोलीस अधीक्षक, ३ डी वाय एस पी,१५ पोलीस निरीक्षक, ४७ सहाय्यक पोलीस निरीक्षक, ३१० पोलीस अंमलदार, १५० होमगार्ड ,३ एस आर पी एफ प्लाटून, ३ सी आय एस एफ प्लाटून, १ आर सी पी टीम सह स्वयंसेवकांनी मनोज जरांगे पाटील यांचा मोर्चा शांततेत पुणे शहराकडे रवाना केला.
मराठा समाजाची गरज फुलगाव करांनी भागवली
आज दिवसभर भगवामय वातावरण झालेले असताना पुणे नगर रोड वर खाद्य पदार्थांची मोठ्या प्रमाणावर रेलचेल पाहायला मिळाली परंतु मराठा समाजाची गरज ओळखून फुलगाव ग्रामस्थांच्या वतीने कोलगेट ब्रश साबण शाम्पू मेडिकल किट देऊन ४ दिवस प्रवास करून आलेल्या आंदोलकांची खरी गरज भागविल्याने फुलगाव ग्रामस्थांचे परिसरातून कौतुक होत आहे.