मुंबई – राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (ता.05) आपल्या पदाचा राजीनामा दिला. 100 कोटीचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडून केली जाणार असल्याने गृहमंत्रीपदावर राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याचे सांगत त्यांनी राजीनामा दिला. त्यांच्याजागी गृहमंत्रीपदी दिलीप वळसे-पाटील यांची वर्णी लागली आहे. आज त्यांनी गृहमंत्रीपदाची सुत्रे हाती घेतली आहेत.
राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, सध्याचा काळ अत्यंत अवघड आणि चॅलेंजिंग आहे. पण गृहमंत्रीपदाची जबाबदारी मी पार पाडण्याचे काम करेन, त्याचबरोबर प्रशासकिय कामात कोणताही राजकीय हस्तक्षेप करणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
“मी आजच पदभार स्विकारला आहे. ही जबाबदारी पार पाडण्याचे काम मी करेल. सध्याचा काळ अवघड आणि चॅलेंजिंग आहे. करोना संसर्गामुळे पोलीस फोर्स रस्त्यावर आहेत. फिल्डवर काम करताहेत. पोलीस दलाचे काम कायदा व सुव्यवस्था राखणे आहे, तरीही त्यांना करोनामुळे ही ड्युटी करवी लागतेय. त्यातच आता पुढचे काही दिवस सण उत्सवाचे आहेत. गुढीपाडवा, रामनवमी, आंबेडकर जयंती, रमजानसारखे सण आहेत. प्रत्येक धर्मीयांच्या दृष्टीने हे महत्वाचे दिवस आहेत त्यामुळे या महिन्यात आपल्यासमोर आणखी चॅलेंजिग परिस्थिती असणार आहे,” असे वळसे पाटील म्हणाले.