पिंपरी – शहरामध्ये सध्या अतिसाराचे रुग्ण वाढले आहेत. गॅस्ट्रो, हगवण आदी आजारांची रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी त्याचेही रुग्ण आढळत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला होणाऱ्या या आजारांनी यावर्षीही डोके वर काढले आहे.
पावसाच्या साचलेल्या दूषित पाण्यामुळे अनेक साथीचे रोग उद्भवतात. नकळत दूषित पाणी प्यायले गेल्याने जुलाब, कॉलरा, उलटी, टायफॉइड (विषमज्वर), गॅस्ट्रो आदी आजार होतात. बाहेरील पाणी व थंड पेये, त्यामध्ये वापरलेले बर्फ याद्वारे दूषित पाणी पोटात जाऊ शकते. त्या माध्यमातून बॅसिलरी डिसेंट्री आणि कॉलरा हे आजार होतात. जुलाब होऊन काही तासांतच रुग्णाच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ शकते.
महापालिका वैद्यकीय विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या सहा महिन्यांमध्ये अतिसाराचे तब्बल 6012 रुग्ण आढळले. जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अतिसाराचे रुग्ण अनुक्रमे 1279, 1268, 1871 इतके राहिले. तर, एप्रिल आणि मे महिन्यात अतिसाराच्या रुग्णांची संख्या बरीच घटली. एप्रिल महिन्यात 389 तर, मे महिन्यामध्ये 265 रुग्ण आढळले. तर, मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये ही संख्या तिपटीने वाढली. जून महिन्यात अतिसाराचे तब्बल 940 रुग्ण आढळले आहेत.
तुलनेत कावीळ, विषमज्वर, कॉलरा आदी आजारांची साथ आटोक्यात आहे. हगवण या आजाराच्या रुग्णांचे प्रमाण जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात अनुक्रमे 186, 217 आणि 317 रुग्ण इतके होते. एप्रिल, मे आणि जून महिन्यामध्ये हे प्रमाण खूपच अत्यल्प आढळले आहे.
एप्रिलमध्ये 6, मे महिन्यात 3 तर, जून महिन्यात केवळ एकच रुग्ण आढळला आहे. गॅस्ट्रो या आजाराचे जून महिन्यात 6 रुग्ण आढळले आहेत. तर, गेल्या सहा महिन्यांत या आजाराची फक्त 18 रुग्णांना लागण झाली आहे. कावीळ आणि विषमज्वर या आजाराचा गेल्या दोन महिन्यांत एकही रुग्ण आढळलेला नाही. तथापि, गेल्या सहा महिन्यांमध्ये कावीळचे 8 आणि विषमज्वरचे 15 रुग्ण आढळले.