संगमनेर – दूध उत्पादक शेतकऱ्यांची परवड ही भाजप सरकारचे पाप आहे. त्यामुळे त्यांना दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या नावावर आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार नाही. भाजपने आता स्व:च्या विरोधात आंदोलन करून पापक्षालन करावे, अशी टीका महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
ना. थोरात म्हणाले, गेल्या पाच वर्षांत केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले होते. दूध दराच्या प्रश्नावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी फडणवीस सरकारच्या मंत्र्यांना दिलेला प्रसाद महाराष्ट्र अजून विसरला नाही. करोनाचे गंभीर संकट असताना शहरांमध्ये दुधाची मागणी पूर्णपणे मंदावली आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर गंभीर संकट निर्माण झाले आहे. अशावेळी राज्य सरकारने शेतकऱ्यांचे दूध स्वत: खरेदी करून ते भुकटीच्या रूपात साठवण्याचा निर्णय घेऊन अंमलात आणला आहे.
राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात दूध भुकटी उपलब्ध असताना मोदी सरकारने 10 हजार मेट्रिक टन दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला, जो शेतकऱ्यांच्या मूळावर उठणारा आहे. दुधाचे भाव त्यामुळे 8 ते 9 रुपये प्रतिलिटर पडतील.
एके ठिकाणी दूध पावडर आयात करायची आणि दुसरीकडे दूध पावडरसाठी अनुदान मागायचे, हा दुटप्पीपणा भाजपच करू शकते, असेही थोरात म्हणाले. मोदी सरकारने या संकटकाळात केलेल्या इंधन दरवाढीचा मोठा फटका शेतकऱ्यांना आणि दूध संघांना बसला आहे.
दुधाला प्रतिलिटर 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय शेतकऱ्यांच्या प्रचंड संघर्षामुळे इच्छा नसताना त्यांना घ्यावा लागला. पण काही महिन्यांनंतर त्यांनी ही योजनाही गुंडाळून टाकली. त्यामुळे आज 10 रुपये अनुदान मागण्याचा नैतिक अधिकार त्यांना नाही. मागील पाच वर्षांतील भाजप सरकारच्या दूध दराबातच्या फसव्या घोषणा आणि भाषणांची एक पुस्तिका प्रकाशित करावी, जेणेकरून भाजपचा खरा चेहरा जनतेसमोर येईल, असेही ते म्हणाले.