पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहराच्या उशाला तब्बल ३० टीएमसी पाण्याची क्षमता असलेली चार धरणे आहेत. तरीही, पुण्यातील जवळपास २० टक्के लोकसंख्येला पाण्यासाठी टॅंकरचा आसरा घ्यावा लागत आहे. गेल्या वर्षभरात महापालिकेने सुमारे ४ लाख ३४८ टॅंकर फेऱ्या उपनगरे आणि समाविष्ट गावांना पाणी पुरविले आहे. एका टॅंकरसाठी २ हजारांचा खर्च गृहीत धरला, तर या टॅक़र फेऱ्यांवर तब्बल ८० कोटी रूपयांचा खर्च पुणेकरांना मोजावा लागला आहे.
महापालिका हद्दीत २०१७ पासून आतापर्यंत ३४ गावे समाविष्ट झाली आहेत. ही गावे त्यापूर्वी “पीएमआरडीए’हद्दीत होती. त्यामुळे गावांना त्यांच्याकडूनच पाणी देणे अपेक्षित होते. मात्र, पाण्याचे नियोजन न करता येथे “पीएमआरडीए’ने पाण्याची जबाबदारी बांधकाम व्यावसायिकांकडे देत मोठमोठ्या बांधकामांना मान्यता दिली.
मात्र, बांधकामे पूर्ण झाल्यानंतर आणि घरांचे हस्तांतरण झाल्यानंतर व्यावसायिकांनी पाणी देण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर आता ही गावे पालिकेत आली आहेत. त्यामुळे पाणी देण्याची जबाबदारी महापालिकेवर येऊन पडली आहे. त्यामुळे पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या टॅंकरची संख्या लक्षणीय वाढली आहे.
१९ वर्षांत एक टीएमसीने वाढला कोटा
महापालिकेस २००५ पासून जलसंपदा विभागाकडून केवळ ११.५० टीएमसी पाणी देण्यात येत आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा १२.४२ टीएमसी करण्यात आला. प्रत्यक्षात गेल्या दोन दशकांत शहराची लोकसंख्या, नागरीकरण दुपटीने वाढले आहे. मात्र, तुलनेत पाण्याचा कोटा नगण्य वाढला. शहराला ३४ गावांसह पुरेसे पाणी द्यायचे झाल्यास महापालिकेस प्रत्यक्षात २० टीएमसी पाण्याची गरज आहे.
त्यामुळे महापालिका आहे त्याच पाण्याची काटकसर करत या गावांनाही याच पाण्यातील हिस्सा टॅंकरद्वारे देत आहे. पण, महापालिकेने दिलेले पाणीही कमी पडत असल्याने नागरिकांना खासगी टॅंकरचा आधार घ्यावा लागत आहे. महापालिकेने दर निश्चित केलेले असले, तरी हे टॅंकरचालक महापालिकेकडूनच पाणी घेऊन नागरिकांना मनमानी दराने देत आहेत. परिणामी, महापालिकेवर पाण्याचा मोठा ताण आला आहे.
वर्षनिहाय टॅंकरचा आकडा
२०२१-२२ – ३ लाख ६ हजार ८२४
२०२२-२३ – ३ लाख ५४ हजार २५४
२०२३-२४ – ४ लाख ३४८
…तर परिस्थिती आणखी गंभीर
त्यामुळे वेळीच शहराची हद्दवाढ रोखली जाणे आवश्यक आहे. तसेच पाण्याची उपलब्धता न पाहताच बांधकामांना राजरोसपणे परवानगी दिली जात आहे. हे असेच सुरू राहिल्यास शहरावर पुढील काही वर्षांत गंभीर पाणी संकट ओढावण्याची चिन्हे आहेत. तसेच एका बाजूला महापालिकेस नियमितपणे मिळकतकर भरूनही नागरिकांना पुन्हा टॅंकरसाठी भरमसाठ पैसेही मोजावे लागत आहेत.