नवी दिल्ली – केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान १५ वर्षानंतर पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात परतलेले आहेत. त्यांनी आज पुरी येथील जगन्नाथ मंदिरात जाऊन दर्शन घेऊन आपल्या प्रचाराला सुरूवात केली, यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्राही होते. प्रधान संबलपूरमधून भाजपचे उमेदवार असतील, तर पात्रा यांना पुरीमधून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
पुरीत दर्शन घेतल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटले आहे की, भगवान जगन्नाथ हे आमच्या सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग आहेत. त्यांचा आशीर्वाद नेहमीच आमच्यावर राहिला आहे. समलाई आईची पवित्र भूमी असलेल्या संबळपूरमधून लोकसभेसाठी उमेदवार जाहीर झाल्यानंतर, सर्वप्रथम भगवान जगन्नाथाचा आशीर्वाद घेणे माझ्यासाठी खूप मोठे सौभाग्य आहे.
भगवान जगन्नाथाच्या आशीर्वादाने भाजप ओडिशात सरकार स्थापन करेल आणि केंद्रात सत्ता राखेल, असे प्रधान यांनी ठामपणे सांगितले. ओडिशात बदलाची लाट स्पष्टपणे दिसत आहे, असे ते म्हणाले.
२००९ मध्ये भाजप आणि बीजेडी यांच्यातील युती संपुष्टात आल्यावर त्यांनी शेवटची निवडणूक लढवली होती.प्रधान २००० मध्ये ओडिशा विधानसभेवर आणि २००४ मध्ये देवगड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. तथापि, २००९ मध्ये विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. ते २०१२ मध्ये बिहारमधून राज्यसभेवर निवडून गेले आणि२०१८ मध्ये मध्य प्रदेशमधून पुन्हा निवडून आले.