श्रीकांत कात्रे
मूळ सातारा जिल्ह्यातील एकनाथ शिंदे यांची राज्याच्या मुख्यमंत्रिपदी गुरुवारी निवड झाली. राज्यातील सत्तांतराच्या नाट्यात बुधवारी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी अवघ्या देशाला धक्का दिला. कुणाच्याच कल्पनेतही नसेल, असा हा निर्णय भविष्यातील राजकारणाला वेगळीच कलाटणी देणारा ठरण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडून येणारे सच्चे शिवसैनिक एकनाथ शिंदे यांना राज्यातील सर्वोच्च पद मिळाले. शिंदे यांची कर्मभूमी ठाणे, असली तरी मातृभूमी सातारा जिल्ह्यात आहे. महाबळेश्वर तालुक्यातील दरे तर्फ तांब हे कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयापलीकडे असलेले शिंदे यांचे छोटे गाव. शिंदे अधूनमधून आपल्या गावात येऊन राहतात. आपल्या गावाशी त्यांचा सातत्याने संपर्क असतो. त्या अर्थाने शिंदे हे सातारा जिल्ह्यातील चौथे मुख्यमंत्री ठरले आहेत. यापूर्वी यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले आणि पृथ्वीराज चव्हाण हे तीन मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याने दिले. आता एकनाथ शिंदे यांच्या रुपाने पुन्हा एकदा सातारा जिल्ह्याला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे.
शिंदे महाराष्ट्राच्या यापूर्वीच्या मंत्रिमंडळात नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) या खात्यांचे कॅबिनेट मंत्री होते. 2015 ते 2019 पर्यंत एकनाथ शिंदे सार्वजनिक बांधकामचे कॅबिनेट मंत्री होते. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते सलग तीन वेळा आणि तत्पूर्वी पूर्वीच्या एकत्रित ठाणे विधानसभा मतदारसंघातून एकदा, असे चार वेळा ते विधानसभेवर निवडून गेले आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रभावामुळे ते शिवसेनेत दाखल झाले. रिक्षाचालक म्हणून काम करत, एका साध्या शाखाप्रमुखापासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरु झाली. समाजात होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या हितासाठी आक्रमक भूमिका घेणारी संघटना म्हणून शिवसेनेचा दबदबा निर्माण झाला होता. अशा वातावरणात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा झेंडा हाती घेतला.
आनंद दिघे यांनी 1984 मध्ये किसननगर येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली. तेव्हापासून दिघे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनांमध्ये एकनाथ शिंदे यांनी भाग घेतला. सीमाप्रश्नी 1986 मध्ये झालेल्या आंदोलनात एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांसह भाग घेतला होता. त्यावेळी बेल्लारीच्या तुरुंगात त्यांना 40 दिवस कारावास झाला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना विधानसभा निवडणुकीसाठी ठाणे विधानसभा मतदारसंघातून प्रथम उमेदवारी दिली.
या निवडणुकीत ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्यानंतर पुढल्याच वर्षी शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. जिल्हाप्रमुख आणि आमदार या दोन्ही पदांवर नियुक्ती झालेले ते शिवसेनेतील पहिलेच नेते होते. जनतेच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडत राहिल्यामुळे लोकांमध्ये राहिलेला हा नेता प्रबळ आणि विश्वासार्ह बनत गेला. भाजपने राज्यातील सत्ता उलथवून टाकण्याची संधी दवडली नाही आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. अनपेक्षित आणि धक्कादायक निर्णयानंतर सातारा जिल्ह्यातही जल्लोष करण्यात आला. अर्थातच शिंदे मुख्यमंत्री होण्याचा फायदा सातारा जिल्ह्याला अधिक होणार असल्याची अपेक्षाही व्यक्त होऊ लागली आहे.
एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव दरे तांब कोयना धरणाच्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शिवसागर जलाशयापलीकडे आहे. कोयनेच्या (सह्याद्री) व्याघ्र प्रकल्पात वाघांची नोंद आहे. याच कोयनेतील एकनाथ शिंदे हा सर्वसामान्य कुटुंबातील कार्यकर्ता ठाण्यात जाऊन शिवसेनेचा वाघ बनला. साताऱ्याचा हा “ठाण्या’ वाघ आता महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि विकासाला नवी दिशा देणार आहे.
एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन! महाराष्ट्राच्या हिताची जपणूक त्यांच्याकडून होईल अशी सार्थ अपेक्षा व्यक्त करतो. यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब भोसले, पृथ्वीराज चव्हाण यांच्यानंतर अजून एका सातारकरांची मुख्यमंत्रीपदी वर्णी लागली याचा आनंद आहे.
शरद पवार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष