पारनेर – सरकारने आम्हाला कायद्याने खेटायचे ठरवले आहे. आम्ही मराठा बांधवही आपणास कायद्यानेच खेटणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यातून हजारो निवडणूक फॉर्म भरून आमच्या आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्यांना सरकारला जागा दाखवणार आहोत.मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही, असा इशारा मराठा संघर्षयोध्दा मनोज जरांगे यांनी दिला.
पारनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने आयोजित महासंवाद मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. पारनेर शहरात जरांगे पाटील यांचे आगमन होताच जेसीबीमधून त्यांच्यावर पुष्पांचा वर्षाव करण्यात आला. प्रथमतः जरांगे पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर स्मारक येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे अर्धाकृती पुतळ्यासमोर नतमस्तक होत पुष्पहार अर्पण केला. हनुमान मंदिरलगत असलेल्या दर्ग्याला मुस्लिम बांधव यांच्यावतीने चादर चढविण्यात आली. वेशीजवळ असलेल्या महत्मा ज्योतिबा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार घालण्यात आला. यानंतर जरांगे एतिहसिक बाजारतळ येथे उपस्थित मराठा समाजाला संबोधित करण्यासाठी प्रस्थान केले.
जरांगे म्हणाले, मराठा समाजाची शेवटची आरक्षणासाठी लढाई आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही.आमच्या लेकरांचे स्वप्न साकार करण्यासाठी आम्ही कोणतीही किंमत मोजायला तयार आहे. सरकारने आम्हाला कायद्याने खेटायचे ठरवले आहे. आम्ही मराठा बांधवही आपणास कायद्यानेच खेटणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यातून हजारो निवडणूक फॉर्म भरून आमच्या आरक्षणविरोधी भूमिका घेणाऱ्यांना सरकारला जागा दाखवणार आहोत. आम्ही आमच्या मराठा जातीच्या आमदार, खासदार यांना मोठे केले पण त्यांनी जातीलाच सोडून दिले आहे. मराठा समाजाचा जिवावर मोठे झाले तेच राजकारणी मंत्री आता मराठ्यांचे विरोधात बोलत आहेत. आता आमचा मराठा समाजही मराठ्यांची ताकत किती आहे ते दाखवून देणार आहे. मराठा समाजाने एकजुटीने संघर्ष करावयाचा आहे.जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मी एक इंचही मागे हटणार नाही, असा इशारा दिला.