राहाता -“श्रद्धा और सबुरी’ची शिकवण देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी अनेक साईभक्तांनी शिर्डीत हजेरी लावल्याचे पहायला मिळाले. दरम्यान, साई मंदिर दर्शनासाठी खुले नसले तरी, भक्तांनी मंदिराच्या कळसाचे दर्शन घेवून करोना मुक्तीसाठी साईबाबांकडे प्रार्थना केली.
महिन्याचा दुसरा शनिवार व रविवारची सुट्टी असल्यामुळे या दोन दिवशी जनता कर्फ्यू असतानाही श्री साईबाबांची मंदिराच्या कळसाचे दर्शनाचा मोह अनेक साई भक्तांना आवरता आला नाही. शिर्डीत या दोन दिवशी शेकडो साई भक्तांनी कळस दर्शनाचा लाभ घेतला. सध्या करोनाचा प्रभाव वाढू नये, यासाठी सर्व मंदिराचे दरवाजे बंद आहेत. गेल्या दीड वर्षापासून करोनाने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. गर्दीमुळे संसर्ग वाढतो.
यामुळे रोगाचा फैलाव अधिक होतो. शिर्डी तर देशात दुसऱ्या क्रमांकाचे तीर्थक्षेत्र समजले जाते. या ठिकाणी सर्व धर्मातील नागरिक बाबांसमोर नतमस्तक होण्यासाठी येतात. काकडी विमान सेवा सुरू झाल्याने परदेशातील साईभक्तही मोठ्या प्रमाणात शिर्डीत दर्शनासाठी दाखल होतात. परंतु, करोना संसर्ग वाढू नये, यासाठी शासनाने अनेक महिन्यापासून हे मंदिर बंद ठेवले आहे.
त्यामुळे बाबांचे किमान कळसाच्या दर्शनातून लाभ मिळावा, याकरिता अनेक भक्त व्याकुळ झाले आहेत. त्यामुळेच साईबाबांचे मंदिर बंद असतानाही दररोज शेकडो साईभक्त शिर्डीत दिसतात.
राहाता तालुक्यातील जवळपास 60 गावांची अर्थव्यवस्था साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांवर अवलंबून आहे. परंतु मंदिर बंद असल्यामुळे शिर्डीतील हॉटेल, लॉजिंग व्यवसाय पूर्णतः मोडकळीस आला आहे. शिर्डीबरोबरच शिर्डी ते शिंगणापूर तसेच नाशिक पासून ते शिर्डीपर्यंत या भक्तांवर अवलंबून असलेले हॉटेल व लॉंजिंग व्यवसायही आर्थिक संकटात सापडले आहे.
शिर्डीत नोवेल्टी, प्रसाद, फुल, हार दुकाने बंद आहे. त्यामुळे या व्यवसायापासून हातावर पोट असणाऱ्या कामगारांचे मोठी हाल होत आहे. फुलांपासून रोजगार मिळावा, यासाठी अनेकांनी फुलांची शेती फुलवली आहे. परंतु मंदिर बंद असल्यामुळे फुलाला मागणीच नाही, परिणामी फुलांची शेती करणारे शेतकरी अडचणीत आले आहेत.
गेल्या अनेक महिन्यापासून साईबाबांचे मंदिर बंद असल्यामुळे अनेकांचा हा अर्थचक्राचा गाडा थांबला आहे. करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊन साई मंदिर लवकरात लवकर सुरू व्हावे, यासाठी साईभक्त बाबांना साकडे घालताना दिसत आहेत.