महाराष्ट्रात तसे काही घडणार नाही
मुंबई -महाराष्ट्रातील सरकारचे नेतृत्व करणाऱ्या शिवसेनेने राज्यात सत्ताबदलाची शक्यता स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली आहे. तसेच, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागण्याचे उपहासात्मक आवाहनही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले आहे.
फडणवीस यांच्यामागची माजी ही बिरूदावली लवकरच जाईल, अशा आशयाचे भाकीत नुकतेच संघाचे ज्येष्ठ नेते भय्याजी जोशी यांनी केले. त्याचा आधार घेऊन शिवसेनेने आपले मुखपत्र असणाऱ्या दैनिकातील अग्रलेखातून फडणवीस आणि भाजपवर निशाणा साधला आहे. जोशी यांच्या हवाबाज वक्तव्यामुळे विरोधकांना (भाजप) मानसिक गुदगुल्या झाल्या असतील. पण, महाराष्ट्रात तसे काही घडणार नाही, असा ठाम विश्वास अग्रलेखातून व्यक्त करण्यात आला आहे. विधिमंडळ अधिवेशन सुरू होण्याआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमावर भाजपने बहिष्कार टाकला. त्याचे समर्थन करताना फडणवीस यांनी राज्यातील सत्तारूढ पक्षांची खिल्ली उडवली. सरकारमधील पक्षांतच सुसंवाद नाही. त्यांच्याशी विरोधकांचा संवाद कसा होणार, असा सवाल फडणवीस यांनी केला.
त्याचा समाचार शिवसेनेकडून घेण्यात आला. फडणवीस दोनवेळा मुख्यमंत्री बनले. पहिल्यांदा 5 वर्षांसाठी आणि दुसऱ्यांदा 80 तासांसाठी. त्या 80 तासांत राष्ट्रपती भवन, राज भवन, केंद्रीय गृह मंत्रालय, ईडी आणि सीबीआय यांच्यामार्फत संवाद साधूनही महाविकास आघाडीचा एकही आमदार फुटला नाही. त्यामुळे तुमच्यापेक्षा आमच्यातील संवाद मस्त आहे. भाजपचे 105 आमदार आहेत. त्यातील किमान 50 आमदार विचाराने उपरे आहेत. विरोधी पक्षात राहून काम करण्याची त्यांची भूमिका नाही. सत्ताधाऱ्यांनी विरोधी बाकांवरील आमदारांशी संवाद साधायचे ठरवले तर विरोधी पक्षनेत्यांचे काय होईल, असा सवाल करत शिवसेनेने अप्रत्यक्षपणे फडणवीस यांना इशारा दिला आहे.