मुंबई : विधान परिषद निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांचा प्लान यशस्वी ठऱला असून भाजपचे चार उमेदवार विजयी झाले असून प्रसाद लाड विजयासमीप आहेत. श्रीकांत भारतीय, राम शिंदे, प्रविण दरेकर, उमा खापरे हे चार उमेदवार विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर, एकनाथ खडसे, शिवसेनेचे आमशा पाडवी, शिवसेनेचे सचिन अहिर हे चार उमेदवार विजयी झाले. तर काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप यांचा निकाल अद्याप लागलेला नाही. प्रसाद लाड हे विजयाच्या समीप आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टीमने हा चमत्कार घडवून आणल्याचं म्हटलं जात आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली.
याआधी राज्यसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी चमत्कार घडवत भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आणले होते. त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार संजय पवार पराभूत झाले होते. त्यानंतर विधान परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्व सूत्र आपल्या हातात घेतली होती. त्यांनी सर्व आमदार आपल्याच देखरेखीखाली ठेवली होती. मतदानाच्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी सर्व आमदारांशी चर्चा करूनच मतदानाला पाठवले होते. मात्र या निवडणुकीत काँग्रेसच्या वाट्याला निराशा आली आहे.