नगर (प्रतिनिधी) – रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांना रोजगार उपलब्ध होत आहे. आता पावसाळ्याच्या दिवसात जिल्ह्यात रोजगार हमीची 2288 कामे सुरू असून या कामांवर 9 हजार 326 मजूर काम करत आहेत. सध्या बेरोजगारीची समस्या वाढत असताना रोजगार हमीच्या माध्यमातून सरकार रोजगार उपलब्ध करून देत आहे.
जिल्ह्यात ठिकठिकाणी रोजगार हमी योजनेतील कामे सुरू आहेत. यामध्ये वृक्षारोपण, घरकुल बांधकाम, रस्त्यांचे बांधकाम अशी कामे सुरू आहेत. या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांना निश्चित रोजगार उपलब्ध होत आहे. सध्या जिल्ह्यात कामे आणि मजुरांची संख्या वाढली आहेत. या संख्येत आणखी वाढ करण्याचे प्रशासनाचे उद्दीष्ट आहे.
कामांचा असाही सुकाळ
जिल्ह्यात सध्या 2288 कामे सुरू आहेत. भविष्यात कामांमध्ये वाढ होणार आहे. त्यामुळे वेळेचा अपव्यय होणार नाही यादृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. प्रशासनाने आधीच 17 हजार 390 कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे ही कामे केव्हाही सुरू करता येतील. यासाठी आवश्यक कार्यवाहीचा वेळ आता कमी होणार आहे. कारण, प्रशासनाने आधीच सर्व कार्यवाही पूर्ण केली आहे.
कामांची स्थिती (कंसात मजूर संख्या)
अकोले 194 (589), जामखेड 288 (1628), कर्जत 239 (1287), कोपरगाव 200 (427), नगर 231 (848), नेवासा 105 (433), पारनेर 122 (887), पाथर्डी 180 (597), राहाता 83 (345), राहुरी 58 (171), संगमनेर 128 (536), शेवगाव 211 (679), श्रीगोंदा 190 (709), श्रीरामपूर 59 (190)
पगार मात्र कमीच..
केंद्र सरकारने रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ केली आहे. ही पगारवाढ करताना सध्याच्या वाढलेल्या महागाईचा कोणताही विचार सरकारने केलेला नाही. मजुरीत फक्त 8 रुपये वाढ केली आहे. मजुरांना आता दर दिवशी 256 रुपये इतकी मजुरी मिळत आहे. याआधी 248 रुपये मिळत होते.