मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, ‘झेड’ श्रेणीची सुरक्षा असणारे भाजपचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांना संरक्षण देण्यात मुंबई पोलिसांना अपयश आल्याने या प्रकरणात आम्ही केंद्रीय गृहसचिवांकडे तक्रार करणार आहेत.
शनिवारी रात्री, काही शिवसेना समर्थकांनी सोमय्या यांच्या एसयूव्हीवर पादत्राणे आणि पाण्याच्या बाटल्या फेकल्याचा आरोप आहे. ते खार पोलिस ठाण्यात राणा दाम्पत्यांना भेटण्यासाठी गेले असताना त्यांच्यावर हा कथित हल्ला झाल्याचे सांगण्यात येत आहे. शिवसेनेच्या गुंडांनी केलेल्या हल्ल्यात आपण जखमी झाल्याचे सोमय्या यांनी ट्विट केले होते.
या संबंधात आज पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले, ‘झेड’ श्रेणीचे सुरक्षा कवच लाभलेल्या सोमय्या यांना संरक्षण देण्यात मुंबई पोलिस अपयशी ठरल्याचा मुद्दा आम्ही केंद्रीय गृहसचिवांकडे मांडू. एकतर मुंबई पोलिसांनी अप्रत्यक्षपणे या कृत्याचे समर्थन केले किंवा ते हल्लेखोरांविरुद्ध कोणतेही पाऊल उचलण्यास असमर्थ ठरले.
मुंबई पोलिसांची सध्याची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी आहे, असा दावा फडणवीस यांनी केला. अशा हल्ल्यांना आम्ही घाबरत नाही, हे मी स्पष्ट करतो. आम्ही तत्परतेसाठी सक्षम आहोत, असेही फडणवीस यांनी नमूद केले. आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार पत्नी नवनीत राणा यांच्याशी ज्याप्रकारे वागणूक दिली गेली त्याबद्दल आपल्याला आश्चर्य वाटल्याचेही फडणवीस म्हणाले.