औरंगाबाद – औरंगाबाद ते पुणे या दोन शहरांच्या दरम्यान एक्स्प्रेस वे बांधला जाईल अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. या कामासाठी दहा हजार कोटी रूपये खर्च अपेक्षित आहे. या रस्त्यामुळे दोन शहरांमधील प्रवासासाठी कमी वेळ लागेल असे ते म्हणाले.
गडकरी यांनी रविवारी राष्ट्रीय महामार्ग क्र.52 वरील 86 किमीचे रस्ते राष्ट्राला समर्पित केले. 2,253 कोटी रुपयांच्या चार अन्य रस्ते प्रकल्पांची पायाभरणीही त्यांनी केली त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की औरंगाबाद आणि पुणे दरम्यानचे अंतर सुमारे 225 किमी आहे. आम्ही या दोन शहरांमध्ये प्रवेश-नियंत्रित एक्स्प्रेस वे तयार करू जिथे कोणतेही वळण नसेल आणि वाहने ताशी 140 किमीच्या वेगाने जाऊ शकतील.
यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल. दोन शहरांमधील प्रवासाचा वेळ या नवीन रस्त्यामुळे 1 तास 15 मिनीटांनी कमी होईल. हा रस्ता पैठण आणि अहमदनगर क्षेत्रांमधून जाईल,असे त्यांनी सांगितले.
वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी औरंगाबादच्या जालना रस्त्यावर डबल डेकर पूल बांधण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.