मुंबई – राष्ट्रपती भवनाच्या दरबार हॉलमध्ये बुधवारी केंद्र सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. यावेळी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी तब्बल 43 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यामध्ये, नारायण राणे यांना प्रथम स्थान देण्यात आले होते. राणे यांची मोदी मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर शिवसेनेला शह देण्यासाठी ही भाजपची खेळी असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळामध्ये रंगल्या आहेत.
नारायण राणे व शिवसेना यांच्यातील वैमनस्य सर्वश्रुत आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेने काडीमोड घेतल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यावर कडवी टीका करण्याची एकही संधी सोडलेली नाही. अशातच भाजपने त्यांचा उपयोग आगामी मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेनेविरोधात करता यावा यासाठी त्यांना ताकद दिली असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळामध्ये सुरु आहे.
अशातच महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत भाष्य केले आहे.
“चर्चांवर कोणतेही निर्णय होत नसतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भरपूर चर्चा होत असतात. राणेंना मंत्री बनवताना त्यांच्या क्षमतेचा विचार केला गेला असून बाकी कोणताही विचार केलेला नाही.” असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं. ते नाशिक येथे बोलत होते.
पंकजा मुंडे पक्षावर नाराज? फडणवीस म्हणतात…
मंत्रिमंडळ विस्तारामध्ये भगिनी प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात न आल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जातंय. तसेच मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांनी कोणत्याही मंत्र्याचे अभिनंदन करणेही टाळल्याने या चर्चांना आणखीनच हवा मिळाली आहे. मात्र फडणवीस यांनी या चर्चा स्पष्टपणे नाकारताना, “तुम्हाला कुणी सांगितलं त्या नाराज आहेत. कृपा करून त्यांना बदनाम करू नका. भाजपामध्ये आमचे सर्वोच्च नेते निर्णय करत असतात. योग्य वेळी सगळे निर्णय होतात. अकारण कोणतीही नाराजी नसताना त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका” असं म्हणाले.