कराड – राज्याचा मुख्यमंत्री असताना मी कराडसाठी हजारो कोटींचा निधी दिला. त्या माध्यमातून कराडला विविध प्रशासकीय कार्यालये, बस स्थानक, आरटीओ कार्यालय, रस्ते, विश्रामगृह आदी. मोठी कामे झाली. नवीन कराड जिल्हा निर्माण करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणारी बहुतांश शासकीय कामे मार्गी लावली असून सर्वार्थाने कराडचे महत्व वाढवण्यासाठी प्रयत्न केला. तसेच भविष्याच्या दृष्टीने आणखीही काही कामे होणे आवश्यक असून त्यादृष्टीने आपण प्रयत्नशील असल्याची माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली.
कराड येथील त्यांच्या निवासस्थानी बुधवारी दि. २३ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष व माजी नगरसेवक राजेंद्र उर्फ आप्पा माने, इंद्रजित गुजर, प्रदीप जाधव, अशोकराव पाटील, फारुख पटवेकर, इंद्रजित चव्हाण, शिवाजीराव मोहिते, भानुदास माळी, झाकीर पठाण व कार्यकर्ते उपस्थित होते.
आ. चव्हाण म्हणाले, “”मुंबई येथे महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी पुनर्गठन करण्यात आलेल्या उच्चाधिकारी समितीची सोमवारी बैठक पार पडली. यावेळी मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कराडच्या प्रशासकीय कामांच्या उदघाटनाचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे.
शुक्रवार दि. २५ रोजी यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कृषी प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी ते कराडला येणार आहेत. त्यादिवशी कराड दक्षिणमध्ये झालेल्या विकासकामांमधील नवीन प्रशासकीय कार्यालयाचे लोकार्पण, तसेच नवीन विश्रामगृहाचे उदघाटन यासह कृष्णा नदीवरील पाचवडेश्वर ते कोडोली आणि रेठरे बुद्रुक येथील नवीन पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.