माजी भारतीय क्रिकेटपटू आणि सध्याचा समालोचक आकाश चोप्राने ( Akash Chopra ) हार्दिक पांड्याचे कर्णधारपदबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्याने हार्दिकच्या संघाचे नेतृत्व करण्याच्या कौशल्याला रोहित शर्मापेक्षा चांगले असल्याचे म्हटले आहे. चोप्राने म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत हार्दिक पंड्याने सहाव्या गोलंदाजाचा सातत्याने वापर केला. मात्र दुसरीकडे टी-२० विश्वचषकात रोहित शर्माने सहाव्या गोलंदाजांचा फार कमी वेळा वापर केला होता.
नेपियर येथे झालेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील तिसरा आणि शेवटचा टी-२० सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा संघ डावाचे दोन चेंडू शिल्लक असताना १६० धावांवर सर्वबाद झाला. प्रत्युत्तरात भारतीय संघाने ९ षटकांत ४ गडी गमावून ७५ धावा केल्या होत्या. पावसामुळे खेळात व्यत्यय आला तेव्हा, डकवर्थ लुईसप्रमाणे स्कोअर ७५ पार होता आणि भारताचा स्कोअर देखील समान होता, ज्यामुळे हा सामना बरोबरीत संपला आणि भारताने १-० ने मालिका जिंकली.
संघर्ष! बॅट विकत घेण्यासाठीही पैसे नव्हते, आता ‘ती’ खेळणार थेट देशासाठी क्रिकेट
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेदरम्यान हार्दिक पंड्याने दीपक हुडाला सहावा गोलंदाज म्हणून सातत्याने गोलंदाजी दिली. बदल्यात हुडानेही संधीचे सोने करत चांगली कामगिरी केली. त्याने दुसऱ्या टी-२० सामन्यात ४ गड्यांना तंबूत पाठवले होते. आकाश चोप्राच्या ( Akash Chopra ) मते, सहाव्या गोलंदाजाला संधी देण्यासाठी हार्दिक पंड्याने आखलेली रणनीती भारतासाठी फायद्याचीच ठरली.
हार्दिक नेतृत्वाच्या बाबतीत रोहितला वरचढ
आकाश चोप्राने ( Akash Chopra ) त्याच्या यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटले की, “मला हार्दिक पंड्याची संघाचे नेतृत्व करण्याची शैली खूप आवडते. त्याने दीपक हुडाला गोलंदाजी करायला संधी दिली जी खूप चांगली रणनीती होती. रोहित शर्मा कर्णधार म्हणून हे काम करताना कधीच दिसला नव्हता. रोहितने व्यंकटेश अय्यर संघात असतानाही त्याला गोलंदाजी करायला संधी दिली नाही. त्याचबरोबर संघ निवडताना गोलंदाजीसाठी त्याला सहावा गोलंदाजही मिळाला नाही. तो आयपीएलमध्ये सहाव्या गोलंदाजांचा वापर करतो, पण भारतीय संघाकडून खेळताना त्याने असे केले नाही.”