पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत 1997 मध्ये चऱ्होली, मोशीसह आदी गावांचा महापालिकेत समावेश झाला. महापालिकेत राष्ट्रवादीची 15 वर्षे सत्ता होती. सत्तेच्या माध्यमातून समाविष्ट गावांमधील एकही आरक्षण विकसित झाले नाही. नवीन रस्ता झाला नाही. मी राष्ट्रवादीत असताना समाविष्ट गावांच्या विकासासाठी पुरेसा निधी मिळाला नाही. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतरच खऱ्या अर्थाने समाविष्ट गावांचा विकास झाल्याचे माजी महापौर नितीन काळजे म्हणाले.
दै. प्रभातच्या पिंपरी-चिंचवडच्या विभागीय कार्यालयामध्ये श्रीं ची प्रतिष्ठापणा करण्यात आली आहे. गणरायाच्या आरतीसाठी आणि दर्शनासाठी भाजपचे माजी महापौर नितीन काळजे आले होते. त्या वेळी काळजे यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला.
काळजे पुढे म्हणाले, समाविष्ट गावांतील विविध प्रश्न प्रलंबित होते. मात्र, 2017 मध्ये महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर समाविष्ट गावांच्या विकास कामांचा खऱ्या अर्थाने अनुशेष भरून काढला आहे. तसेच आगामी महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक नगरसेवक निवडून येणार असून, महापालिकेत भाजपचीच एकहाती सत्ता येईल, असा विश्वासही काळजे यांनी व्यक्त केला.