पिंपरी -आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व जागांवर उमेदवार देणार आहे. तसेच आपसाठी कार्य करणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकीत संधी देण्यात येणार आहे. मतदारांनी शहराच्या विकासासाठी “आप’ला संधी द्यावी, असे आवाहन आम आदमी पार्टीचे पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारी अध्यक्ष चेतन गौतम बेंद्रे यांनी केले आहे.
दै. प्रभातच्या पिंपरी कार्यालयात गणरायाच्या आरतीसाठी आपचे पदाधिकारी आले होते. तेव्हा बेंद्रे यांनी डिजिटल प्रभातशी संवाद साधला. या वेळी बोलताना बेंद्रे म्हणाले, शहराच्या सर्व प्रभागांमध्ये आपचे कार्यकर्ते तयार होत आहेत. त्यामुळे आम्हाला उमेदवार आयात करण्याची गरज पडणार नाही. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे सध्या इतर पक्षांतून आपमध्ये येण्यास अनेकजण इच्छुक आहेत. परंतु स्वच्छ प्रतिमेच्या व्यक्तींचाच विचार केला जाईल. शहराचा विकास करण्यासाठी प्रस्थापित पक्षांमध्ये राष्ट्रवादी, भाजप, कॉंग्रेस, शिवसेना यांना शहराचा विकास करायचा नाही. त्यामुळे अनेक वर्षांपासून शहराचे प्रश्न जैसे-थे आहेत. विकासासाठी कोट्यवधींचा खर्च होत आहे. सर्वसामान्यांचा कररूपी पैसा पाण्यासारखा वाया जात आहे. परंतु सर्वसामान्य नागरिकांना सुविधा मिळताना दिसून येत नाही. त्यामुळे शहराचा विकास करायचा असेल तर शहरवासीयांनी आपचा झाडू हाती घेणे गरजेचे आहे.
देशपातळीवर आप सर्वांत वेगाने वाढणारा पक्ष आहे. ज्या राज्यांत, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपची सत्ता आहे त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून मूलभूत सुविधा तसेच लाइट, पाणी, शिक्षण आदी गोष्टी मोफत पुरविल्या जात आहेत. त्या तुलनेत पिंपरी चिंचवड महापालिकेचा सात हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक असताना शहरातील समस्या तशाच आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रस्थापित पक्षांचा विचार सोडून शहराचा विकास साधण्यासाठी “आप’ला संधी देणे गरजेचे आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत सत्ताधारी आणि विरोधक सर्वसामान्य नागरिकांचा कररुपी पैसा वाटून खात आहेत.
एकाच कामाची स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या विकासकामातून बिले काढण्यात येत आहेत. महापालिकेच्या शाळांमधील परिस्थित सुधारणे गरजेचे आहे. दिल्लीच्या धर्तीवर शहरात जिजाऊ क्लिनिक उभारणार दिल्ली येथे आप सरकारने मुहाल्ला क्लिनिक ही संकल्पना राबविली आहे. त्याच धर्तीवर पिंपरी चिंचवड शहरात 21 जिजाऊ क्लिनिक उभारणार आहे. एकंदरीत शहराचा विकास साधायचा असेल शहरवासीयांनी राष्ट्रवादी, कॉंग्रेस आणि भाजपाला संधी देऊन पाहिले आहे. परंतु त्यांनी विकास साधलेला नाही. त्यामुळे शहरातील मतदारांनी आता आपचा झाडू हाती घेणे आवश्यक आहे.