नवी दिल्ली – त्रिपुरात तृणमूल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांवर तेथील भाजप सरकारच्या पुरस्काराने हल्ले केले जात असल्याचा आरोप करीत तृणमूल कॉंग्रेसच्या खासदारांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्रालयाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे.
यावेळी तृणमूलच्या खासदारांनी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. आम्हाला त्रिपुरात आमच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांमार्फत कसे अत्याचार सुरू आहेत त्याविषयीचे निवेदन गृहमंत्र्यांना द्यायचे आहे, त्यामुळे त्यांनी आम्हाला वेळ द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
त्रिपुरातील हिंसाचाराबद्दल पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी उत्तर द्यावे अशी आमची प्रमुख मागणी आहे असे तृणमूल नेते सुखेंदु शेखर रे यांनी म्हटले आहे. पक्षाचे लोकसभेतील नेते सौगत रॉय यांनी म्हटले आहे की, आमचे त्रिपुरातील युवा नेते सयानी घोष यांना पोलिसांनी अमानुष मारहाण करून त्यांना बेकायदेशीररित्या अटक केली आहे. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा खोटा गुन्हा नोंदवण्यात आला आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
…..