मुंबई – राज्यातील करोनाबाधितांची संख्या आता नियंत्रणात आल्याचे दिसून येत आहे. राज्यात गेल्या 24 तासात 656 नव्या रुग्णांची नोंद झाली असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 768 रुग्ण करोना मुक्त झाले आहेत.
राज्यात आतापर्यंत एकूण 64,76,450 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. करोनातून बरे होण्याचे प्रमाण हे 97.68 टक्क्यांवर पोहोचले आहे. राज्यातील करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही कमी झाली असून त्याचे प्रमाण हे 2.12 टक्के इतकं झाले आहे. राज्यातील 96,042 रुग्ण हे होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1033 रुग्ण हे संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. राज्यात सध्या 9,678 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे.
गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 230 करोना रुग्णांची नोंद झाली असून केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासात एकूण 204 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील करोना रुग्ण दुप्पटीचा काळ आता 2187 दिवस इतका झाला असून रुग्णवाढीचा दर हा 0.03 टक्के इतका झाला आहे. मुंबई शहरात एकूण 2845 इतके सक्रिय रुग्ण, तर रुग्ण बरे होण्याचा दर हा 97 टक्के इतका झाला आहे.