पिंपरी -शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रांची पडताळणी करून घेण्यासाठी आकुर्डी येथील केंद्रात पालकांनी गर्दी केली होती. महापालिकेच्या वसंतदादा पाटील प्राथमिक शाळेतील या केंद्रात मंगळवारी दुपारी दोन तास अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने पालकांचा खोळंबा झाला.
“आरटीई’ विद्यार्थ्यांसाठी 4 एप्रिलला सोडत काढण्यात आली. विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळण्यासाठी महापालिका शिक्षण विभागाच्या वतीने आकुर्डी आणि पिंपरी अशा दोन ठिकाणी कागदपत्रे पडताळणी केंद्र सुरू करण्यात आले. “आरटीई’ प्रवेशासाठी दिलेली मुदत बुधवारी संपत असल्याने आकुर्डीतील केंद्रावर पालकांची कागदपत्र पडताळणीसाठी गर्दी झाली होती.
त्यातच केंद्रातील वीज पुरवठा दुपारी दीड ते साडेतीन या वेळेत खंडित झाला. त्यामुळे कागदपत्रे पडताळणीसाठी आलेल्या पालकांची गैरसोय झाली. दरम्यान, महावितरणच्या अभियंत्यांशी याबाबत संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आकुर्डीत वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला नव्हता. येथील फीडर चालू होते. “आरटीई’ केंद्रावर खंडित झालेल्या वीज पुरवठ्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी महावितरणला फोन करणे आवश्यक होते.