88व्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष गणेश थिगळे यांची माहिती
राजगुरूनगर – प्रभावी कर्ज वसुली मोहीम, सभासद लाभांश, संचालक रजेवर जाण्याची कारणे, वाहन कर्जतील गडबड, सभासद लाभांश, सर्वसामान्य नागरिकांना कर्ज आदी मुद्द्यावर राजगुरुनगर सहकारी बॅंकेची 88 वी वार्षिक सभा रविवारी (दि. 8) झाली. या सभेसाठी मोठ्या संख्येने सभासद उपस्थित होते.
पुणे जिह्यात सहकार क्षेत्रातील अग्रणी असलेल्या राजगुरुनगर सहकारी बॅंकेची 88 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 8) रोजी येथील चंद्रमा गार्डन मंगल कार्यालयात बॅंकेचे अध्यक्ष गणेश थिगळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला उपाध्यक्ष अरुण थिगळे, ज्येष्ठ संचालक प्रताप आहेर, किरण आहेर, राजेंद्र सांडभोर, मुकुंद आवटे, विजया शिंदे, हेमलता टाकळकर, राजू वाळूंज, डी के गोरे, परेश खांगटे, राहुल तांबे, दिनेश ओसवाल, सतीश नाईकरे, सागर पाटोळे, सरव्यवस्थापक शांताराम वाकचौरे, संजय ससाणे, वसुली व्यवस्थापक सम्राट सुपेकर यांच्यासह बॅंक अधिकारी, कर्मचारी आतापर्यंतच्या बॅंक सर्वसाधारण सभेच्या इतिहासातील सर्वाधिक बॅंकेचे सभासद उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष गणेश थिगळे म्हणाले, राज्याचे कार्यक्षेत्र असलेल्या राजगुरुनगर सहकारी बॅंकेची प्रगतीचा आलेख वाढत आहे. 1100कोटीपर्यंत ठेवी झाल्या आहेत. बॅंकेने सहकार क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळवले आहेत. विमा क्षेत्रात बॅंकेने सुरुवात केली आहे वसुली विभागाच्या कामगिरीमुळे थकीत कर्ज वसुलीचे प्रमाण वाढून तब्बल 30 कोटींचा ढोबळ नफा मिळाला आहे. सभादास 10 टक्के लाभांश देण्याचे यावेळी अध्यक्ष थिगळे यांनी जाहीर केले.
बॅंकेची प्रभावी कर्ज वसुली मोहीम, सभासद लाभांश, संचालक रजेवर जाण्याची कारणे, वाहन कर्जतील गडबडी, सर्वसामान्य नागरिकांना कर्ज वाटप, सभासदांना वार्षिक अहवाल न पोहोचणे, आदि विषयांवर सभासद बॅंक अध्यक्ष सरव्यवस्थापक यांच्यात प्रश्न उत्तरे झाली. बॅंकेचे सभासद प्रा. पांडुरंग होले, कोंडीभाऊ टाकळकर, विजय डोळस, प्रकाश पाचारणे, प्रा महादेव घुले, हिरामण सातकर, खंडूशेठ थिगळे, चंद्रकांत इंगवले, भाऊ भालेकर, शरद मुऱ्हे आदींनी सभासदांच्यावतीने सर्वसाधारण सभेत महत्वाचे प्रश्न मांडले. त्यास बॅंकेचे अध्यक्ष गणेश थिगळे, सरव्यवस्थापक शांताराम वाकचौरे यांनी उत्तरे दिली. सभेपुढे ठेवलेल्या सर्व विषयांना सभागृहाने मान्यता दिली. बॅंकेचे मागील सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त बॅंकेचे सरव्यवस्थापक शांताराम वाकचौरे यांनी वाचून दाखवले. उपाध्यक्ष अरुण थिगळे यांनी आभार मानले.
कर्ज वसुलीबाबत धडक मोहीम राबविताना अनेकांच्या भावना दुखावल्या; मात्र कर्जवसुली होणे गरजेचे आहे. सर्वसामान्य माणसांची बॅंक आहे. त्यांनी ठेवलेल्या ठेवी सुरक्षित राखण्याचा बॅंकेचा प्रयत्न आहे. म्हणून थकीत कर्जे वसूल करणे गरजेचे होते. कर्जवसुली धडक कारवाईत तब्बल 102 कर्ज खाती बंद झाली आहेत.
-गणेश थिगळे, अध्यक्ष, राजगुरूनगर सहकारी बॅंक