म्हसवड – म्हसवड ही माण तालुक्यातील मोठी बाजारपेठ असून येथील बसस्थानक दहिवडी आगारांतर्गत आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र व इतर काही राज्यांमधील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या श्री सिद्धनाथाचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे.
त्यामुळे येथे बाहेरून सतत मोठ्या संख्येने लोक येत असतात; परंतु दहिवडी आगाराने म्हसवडमधून लांब आणि मध्यम पल्ल्याच्या मार्गांवरील बसफेऱ्या बंद केल्या आहेत. त्या लवकरात लवकर सुरू कराव्यात, अशा मागणीचे पत्र सिद्धनाथ देवस्थान समिती व माण तालुका ग्राहक पंचायत समितीच्यावतीने आगारप्रमुखांना देण्यात आले आहे.
म्हसवड हे तीर्थक्षेत्र व माण तालुक्यातील मध्यवर्ती बाजारपेठेचे ठिकाण आहे. लगतच्या 30-40 गावातील नागरिकांची नेहमी म्हसवडला ये-जा असते. त्याचबरोबर सिद्धनाथ व माता जोगेश्वरीच्या दर्शसाठी राज्यातून आणि राज्याबाहेरूनही भाविक येतात. मात्र, म्हसवडमधून सुटणाऱ्या अनेक बसफेऱ्या दहिवडी डेपोने बंद केल्या आहेत.
बाहेरून येणाऱ्या भाविकांना याचा त्रास होतो. सकाळी 9.45 ला सुटणारी म्हसवड- नाशिक, 11 वाजता सुटणारी म्हसवड-मुंबई (सातारामार्गे), म्हसवडमधून कराड, सातारासाठी एकही बस नाही. दहिवडी आगाराने लवकरत लवकर या बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. त्याचबरोबर सकाळी 6 वच दुपारी 4.30 वाजता म्हसवड-स्वारगेट या बसफेऱ्या पुन्हा सुरू कराव्यात. सकाळी 6.30 वाजता निघणारी वल्लभनगर-गोंदवले बस म्हसवडपर्यंत न्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा सिद्धनाथ देवस्थान समितीने दिला आहे.