नगर -देशात सध्या कोळशाची टंचाई निर्माण झाली असताना विजेच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे वीज निर्मिती कमी प्रमाणात होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा विजेच्या मागणीत 8.2 टक्के वाढ झाली आहे. 5 एप्रिल रोजी 28 हजार मेगावॅट इतकी विजेची मागणी महावितरणकडे होती. विजेची वाढती मागणी आणि कोळशाची टंचाई यामुळे मागील दोन दिवसांपासून भारनियमन करण्यात येत असल्याचे ऊर्जा व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत तनपुरे बोलत होते. मंत्री तनपुरे म्हणाले, की तीन ते चार हजार मेगावॅटची तफावत खाजगी लोकांकडून वीज घेऊन, वेळ पडल्यास वाढीव दराने खरेदी करुन भारनियमन होऊ न देण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहेत. 5 एप्रिलपर्यंत 28 हजार मेगावॅट विजेची मागणी होती.
मात्र, अचानक विजेच्या मागणीत 8.2 टक्के वाढ झाल्याने नियोजन करताना कसरत करावी लागत आहे. वीज पुरवठा खंडित होऊ नये म्हणून दुसऱ्या राज्यांकडून जादा दराने कोळसा खरेदी केला जात होता. पण, आता देशात कोळसा टंचाई निर्माण झाली आहे. ज्या कंपनीबरोबर करार केला होता त्या कंपनीने 760 मेगावॅट वीज घेणे आवश्यक आहे, अशी अट टाकली आहे मात्र, त्यांच्याकडेही कोळसा राहिला नसल्याने हे संकट निर्माण झाले आहे. राज्य सरकार बाहेरुन वीज खासगी तत्वावर मिळेल का, याबाबत नियोजन करत आहे.
मात्र, सध्या विजेची वाढती मागणी लक्षात घेता भारनियमनाला पर्याय नाही, येत्या एक ते दोन दिवसात राज्यात भारनियमन सुरू होईल, असे त्यांनी सांगितले. वीज कंपनीबरोबर करार करुन 700 मेगावॅट वीज घेण्याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार महावितरण कंपनीला दिला आहे.