कन्हेरीत 18 हेक्टरवर काम सुरू : शेतकऱ्यांना दर्जेदार कलमी रोपे मिळणार
बारामती – अलिकडे फुले आणि फळझाडांची शेती किफायतशीर होत असल्यामुळे फळझाडांची मागणी वाढत आहे. शेतकऱ्यांना तयार आणि दर्जेदार प्रतीची रोपे मिळावीत, हे धोरण लक्षात घेऊन बारामती तालुक्यातील मौजे कन्हेरी येथे कृषी विभागाकडून अत्याधुनिक फळरोपवाटिका तयार केली असून तिचे काम अंतिम टप्प्यात आहे.
येथे खडकाळ असलेल्या ठिकाणचे सपाटीकरण करुन लागवडी योग्य जमीन तयार केली आहे. यावर हा प्रकल्प उभा राहत आहे. ही फळरोपवाटिका एकूण 18 हेक्टर क्षेत्रावर आहे. प्रक्षेत्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी, फळपीकांचे मातृवृक्ष 9.5 हेक्टरवर, पुष्पोत्पादन आणि औषधी वनस्पतीच्या लागवडीखाली 2.89 क्षेत्र प्रस्तावित असून 5.59 हेक्टर क्षेत्र फळरोपवाटिकेचे कार्यालय, शेतकरी निवास, 120 लोकांच्या आसन क्षमतेचे प्रशिक्षण सभागृह, कर्मचारी निवास व अंतर्गत रस्ते आदीसाठी वापरले आहे. संरक्षण भिंत तयार केली आहे.
क्षेत्रावर तीन पॉलीहाऊस आहेत. त्यापैकी एक पॉलीहाऊस अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित फॅन व पॅड प्रकारचे आहे तर दुसरा पॉलीहाऊस वायुव्हिजन पद्धतीचे आहे. शीतगृहाचा उपयोग भाजीपाला कलमे/रोपे व फुलांचे उत्पादन घेण्यासाठी केला जातो. याठिकाणी 2 शेडनेट व एक मिस्ट चेंबरही आहे. शेडनेटचा वापर मातृवक्षापासून केलेली कलमे हार्डनिंगसाठी करण्यात येतो. मत्स्यपालनासाठी एक शेततळेही निर्माण केले आहे. सिंचन सुविधेसाठी एक विहिर व एक कोटी लिटर पाण्याची क्षमता असलेल्या चार आरसीसी टाक्या बांधलेल्या आहेत. नीरा डावा कालव्यातून पाणी उचलण्याची परवानगी प्राप्त झाली असून या कालव्यातून टाक्यांमध्ये पाणी साठविण्यात येते.
फळरोपवाटिकामध्ये चिकू, आंबा, पेरु, डाळिंब या फळपिकांचे मातृवृक्ष लागवड केली असून त्यापासून दर्जेदार रोपे तयार केली जात आहेत. कृषी विज्ञान केंद्र, माळेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली 7.81 हेक्टर क्षेत्रावर आंबा, चिकू, डाळींब, पेरू, जांभूळ, कागदी लिंबू, अंजीर, सीताफळ, द्राक्ष डॉग्रीज रूट स्टॉक आदींचे मातृवृक्ष लागवड केली आहे. याठिकाणी आंब्याचे 11, चिकूचे 1, डाळिंब, पेरू, सीताफळाचे प्रत्येकी 3 वाण आहेत.
काही दिवसांत संत्रा, फणस, काजू, करवंद, नारळ, सुपारी, कोकम, आवळा, दालचिनी, जायफळ, काळीमीरी, औषधी वनस्पती व फुलझाडांची लागवड करणार आहे, अशी माहिती उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी दिली आहे. विविध फळझाडांची रोपे उपलब्ध होणार आहे. लाखोंच्या संख्येत रोपे देणारी ही रोपवाटिका लाखमोलाची ठरणार आहे.
सर्व सोयीसुविधेसह अत्याधुनिक फळरोपवाटिकेची निर्मिती करण्यासह येथे शेतकऱ्यांच्या प्रशिक्षणाची सोय केली आहे. फळरोपवाटिकेतून येत्या तीन वर्षांत शेतकरी बांधवांना चांगल्या वाणांची दर्जेदार फळरोपे, कलमे मिळतील.
-वैभव तांबे, उपविभागीय कृषी अधिकारी, बारामती.
तालुक्यातील कन्हेरी येथील अत्याधुनिक रोपवाटिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. आगामी काळात ही रोपवाटिका शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार आहे. डाळींब, पेरू, सीताफळ, आंबा आदी फळझाडांची दर्जेदार रोपे तसेच कलमे शेतकऱ्यांना मिळतील. शासकीय दरात अत्याधुनिक कलमे उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक विकास साधला जाईल.
– सुप्रिया बांदल, तालुका कृषी अधिकारी, बारामती.