भारतीय जनता पक्ष देशातील अल्पसंख्याक समुदायाला स्वतःशी जोडून घेण्याचा प्रयत्न करीत आहे. एक राजकीय पक्ष म्हणून समाजातील विविध घटकांना जोडणे गैर नाही. ही 2024 ची रणनीती असू शकते.
सध्या कर्नाटक विधानसभेची निवडणूक होत असली तरी राजकीय वातावरण अशाप्रकारे रंगलं आहे जणू निवडणूक लोकसभेची होत आहे. आपला पक्ष केवळ आपल्या गृहराज्यापुरता मर्यादित राहिला नसून तो राष्ट्रव्यापी झाला आहे, असं दाखविण्याची होड क्षेत्रीय पक्षांमध्ये लागली असल्याचे दिसून येत आहे. उदाहरण द्यायचं झालं तर तेलंगणाचं देता येईल. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या पक्षाचं नाव “तेलंगणा राष्ट्र समिती’ असं होतं आता “भारत राष्ट्र समिती’ असं ठेवण्यात आलं आहे. अखिलेश यादव यांनीसुद्धा समाजवादी पक्ष वाढवायला सुरुवात केली आहे. यादव दक्षिणेकडील राज्यांचा दौरा करीत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी अलीकडेच इफ्तार पार्टीत भाग घेतला होता.
हा कार्यक्रम सध्या फार गाजत आहे. एवढा गाजत आहे की दस्तुरखुद्द देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना त्यावर भाष्य करावे लागले. मुळात, नितीशकुमार ज्या कार्यक्रमात सहभागी झाले होते त्याचे व्यासपीठ लाल किल्ल्याची प्रतिकृती होती. भारताच्या राजकारणात लाल किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. देशाचे पंतप्रधान दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्याहून देशाला संबोधित करतात. नितीशकुमार यांनी लाल किल्ल्याच्या नेपथ्यात कार्यक्रम घेतला. याचा अर्थ, 2024 च्या 15 ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून कोण भाषण देऊ शकतो, याचा तो संकेत होता. एम. के. स्टॅलिन, ममता बॅनर्जी आणि के. चंद्रशेखर राव ही सर्व मंडळी पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळातील संरक्षण मंत्री आणि कॉंग्रेसचे दिग्गज नेते ए. के. अँटोनी यांचे चिरंजीव अनिल अँटोनी यांनी भाजपात प्रवेश केला आहे. “हा चुकीचा निर्णय आहे. मी 82 वर्षांचा असून मरेपर्यंत कॉंग्रेसमध्येच राहणार. माझे आयुष्य शेवटच्या टप्प्यावर आहे. मुलाच्या भाजप प्रवेशावर आता आपल्याला काहीही बोलायचं नाही’, अशा शब्दात ए. के. अँटोनींनी प्रतिक्रिया दिली.
अलिगड मुस्लीम विद्यापीठाचे (एएमयू) माजी कुलगुरू आणि अल्पसंख्याक नेते प्रा. तारिक मन्सूर यांना उत्तर प्रदेश विधान परिषदेसाठी उमेदवारी देण्यात आली आहे. पंतप्रधान पशमांदा समुदायाला भेटत आहेत. गृहमंत्री अमित शहा यांनीसुद्धा मुस्लीम नेत्यांसोबत बैठक केली. शहा यांच्याबाबत जसे ऐकले होते तसे अजिबात नाही, अशी प्रतिक्रिया या नेत्यांकडून व्यक्त करण्यात आली. कर्नाटकचे बिद्री कारागीर शाह रशीद अहमद कादरी यांना सरकारने पद्मश्री पुरस्कार दिला आहे. हा पुरस्कार मिळाल्यापासून कादरी पंतप्रधानांची सारखी स्तुती करीत आहेत.
सांगायचं एवढंच की, अँटोनी यांच्या मुलाचा भाजपप्रवेश, पंतप्रधानांनी पशमांदा समुदायाची भेट घेणे, अमित शहा यांनी मुस्लीम समाजासोबत बैठक करणे, मुस्लीम समाजातील कलाकाराला पद्मश्री आणि एकाला विधान परिषदेची उमेदवारी देणे या सर्व गोष्टी नेमक्या काय इशारा करीत आहेत?
पंतप्रधानांनी ईशान्येकडील राज्यांतील विधानसभेच्या निवडणुकीत ख्रिश्चनांची मने जिंकली. ख्रिश्चन मतदारांच्या मानसिकतेत झालेल्या बदलाची तुलना करून मोदी आपला संदेश केरळमधील ख्रिश्चन बंधू-भगिनींना देण्याचा प्रयत्न करीत आहेत. मोदींनी व्हॅटिकनमध्ये पोप पॉल यांचीही भेट घेतली होती. दुसरीकडे, दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी अलीकडेच राहुल गांधींवर पक्ष सोडल्याचा ठपका ठेवला आणि त्या पक्षात रहायचे असेल तर निर्जीव होऊन रहावे लागते, असे म्हटले आहे. त्यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनानंतर त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अल्पसंख्याकांमधील कॉंग्रेसचा जनाधार कमी होत चालला आहे.
प्रा. मन्सूर हे बुक्कल नवाब आणि दानिश आझाद यांच्यानंतर उत्तर प्रदेशच्या वरिष्ठ सभागृहात भाजपकडून निवडून आलेले चौथे मुस्लीम असतील. उत्तर प्रदेश विधान परिषदेत समाजवादी पक्षाचे नऊ एमएलसी आहेत, त्यापैकी दोन मुस्लीम आहेत- शाहनवाज खान आणि जसमीर अन्सारी. तर भाजपकडे यापेक्षा जास्त आहे. हे काय सूचित करते? उत्तर प्रदेशात सध्या भाजप मुस्लिमांवर भर देत आहे.
पंतप्रधान कार्यालयाने 45 सेकंदांचा व्हिडिओ जारी केला आहे. यात रशीद अहमद कादरी पद्मश्री मिळाल्यानंतर ते पंतप्रधानाचे खूप कौतुक करीत आहेत.
“आपल्या कलाकारीचा सन्मान व्हावा म्हणून पद्म पुरस्कार मिळावा यासाठी कॉंग्रेसच्या काळात आपण खूप प्रयत्न केले होते. परंतु, सर्व निष्फळ ठरले. केंद्रात भाजपचे सरकार आले आणि आता आपल्याला कधीही पुरस्कार मिळणार नाही, असे माझे मत होते. परंतु, मोदी यांनी मला खोटे ठरविले’, असे कादरी यांनी म्हटले आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला शिवाय राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांवरही चर्चा झाली. अल्पसंख्याकांना आकर्षित करण्याचा भाजपचा निर्धार स्पष्ट आहे. त्यामुळे भाजपच्या धोरणात काही बदल झाला आहे का?
भाजप अल्पसंख्याकांच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करत असताना, तृणमूल कॉंग्रेस, समाजवादी पार्टी, जेडी(यू), बीआरएस आणि अगदी आप यांसारखे पक्ष हनुमान जन्मोत्सव साजरा करत आहेत. ममता बॅनर्जी यांनी हरेकृष्ण मंदिराला भेट दिली. पण द्रमुक हिंदूंना दिवाळीच्या शुभेच्छा न देण्यावर ठाम आहे, त्यामुळे तामिळनाडूतील उजव्या विचारसरणीला मोठा त्रास होत आहे. व्यापक दृष्टिकोनातून पाहता, 2024 च्या निवडणुका धर्माच्या अवतीभोवती फिरताना दिसू शकतात.
राजकीय पक्षांकडून हनुमानाच्या नावाचा उपयोग राजकारणात करण्याचा प्रकार काही पहिल्यांदाच घडतो आहे असे नाही. पूर्वीपासून हा प्रकार सुरू आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी हनुमानाचे नाते कर्नाटकशी जोडले, त्याआधी राहुल गांधींनीही हनुमानाची आठवण काढली आहे. भाजप स्वतःला हनुमानाच्या अलौकिक शक्ती आणि त्यांच्या वैशिष्ट्यांशी जोडत आहे, तर कॉंग्रेसही सोशल मीडियावर हनुमान भक्तीत तल्लीन झालेली दिसली. भाजपच्या स्थापनादिनानिमित्त जिथे पंतप्रधान मोदींनी हनुमानाचा “हनुमान दादा’ असे संबोधले, तिथे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही हनुमानाच्या गदेचा फोटो टाकून त्यांची श्रद्धा आणि गदेचा प्रतिकात्मक अर्थ शेअर केला. कॉंग्रेसपासून भाजप आणि आम आदमी पक्षापर्यंत सर्व राजकीय पक्षांनी हनुमान जन्मोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र राजकीय क्षेत्रातील महारथींनी दिलेल्या शुभेच्छांमध्ये असे राजकीय संदेश होते, ज्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
वंदना बर्वे