- भंगार वाहनांमुळे डासांचा प्रार्दुभाव, सरपटणाऱ्या जीवांचा वावर वाढला
देहूरोड – देहूरोड पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये बिंधनी, अपघात तसेच विविध गुन्ह्यांमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांच्या मालकांनी आवश्यक कागदपत्रे सादर करून वाहने घेऊन जाण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस, भंगार, अपघातग्रस्त वाहनांमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून, सरपटणाऱ्या प्राण्यांचाही वावर वाढला आहे.
देहूरोड पोलीस ठाण्यासह सर्वत्र पोलीस ठाण्यातील आवारात बेवारस (बिनधनी), अपघातातील, कालबाह्य (स्क्रप) तसेच विविध गुन्ह्यातील दुचाकी, तीन, चारचाकी शेकडो वाहने धूळखात पडून आहेत. पोलिसांच्या दृष्टीने ही वाहने डोकेदुखी ठरत आहे. या वाहनांची विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया किचकट असल्याने वर्षानुवर्षे पडिक असलेली ही वाहने जपून ठेवण्याचीही वेळ पोलिसांवर आली आहे.
कालबाह्य (स्क्रप) झालेली वाहने चोरीला गेल्यानंतर वाहनांच्या तक्रारीही बहुदा अनेकजण देत नाही, अशी वाहने रस्त्याच्या व अन्य ठिकाणी बेवारस पडून असतात. ही बेवारस आढळणारी वाहने तक्रारीनंतर पोलीसी कारवाईने ठाण्यांमध्ये या वाहनांचा ढीग तयार होतो. अनेक जण चोरीला गेलेली वाहनांची इन्शुरन्स मिळाल्याने वाहने घेण्यास येत नाहीत तर विविध अपघातातील वाहने माणसे दगावल्याने अशी वाहने घेऊन जात नाहीत. विविध गुन्ह्यात वापरलेले तर गुन्ह्यातील वाहने सोडवत नसल्याने अशी वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात पडून आहेत.
न्यायालयाच्या आदेशानुसार कालबाह्य वाहनांचा वापरावर बंदी असल्याने अशा वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभागातर्फे कारवाई केल्यानंतर ती ठाण्याच्या आवारात लावली जातात. वाहन चालक त्यांची वाहने घेण्यास येत नसल्याने अशी ही वाहने वर्षानुवर्षे पोलीस चौकीच्या आवारात पडून राहतात. अशा शेकडो पडीक वाहनांनी देहूरोड पोलीस ठाण्याचा आवारासह परिसर वेढला आहे. या वाहनांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचप्रमाणे अशा उभ्या वाहनांच्या जवळपास कचऱ्यांचा ढीग साचल्याने दुर्गंधी पसरत आहे. तर किटक व डासांचा प्रादुर्भाव ही वाढत आहे. त्यामुळे अशा वाहनांजवळ सरपटणारे (साप), किटक खाणारे प्राणी फिरण्याचे प्रमाण वाढत आहे.
बिनधनी वाहने निकाली काढण्याची
प्रक्रिया दहा वर्षांनंतरही नाही
बेवारस (बिनधनी) वाहनांचे मूळ मालक आढळून येत नसल्यास पोलीस अशा वाहनांचा लिलाव करण्याची प्रक्रिया करू शकतात. त्यासाठी न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. नंतर प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक पोलिसांच्या मदतीने वाहने निकाली काढण्याची प्रक्रियाही केली जाते. अशी प्रक्रिया सुमारे दहा वर्षांपूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्या कारकिर्दीत करण्यात आली होती. त्यानंतर ही प्रक्रिया अद्यापही झालेली दिसून येत नाही, त्यामुळे देहूरोड पोलीस ठाण्याला वाहनांचा वेढा पडला आहे. न्यायालयीन आदेशाची सुलभ व सोपी प्रक्रिया होऊन पोलिसांना अधिकार दिल्यास अपघातातील, बेवारस, कालबाह्य आणि विविध गुन्ह्यातील वाहने ठाण्याच्या आवारात कमी होण्यास मदत होईल.
चारवर्षांपूर्वीच्या घटनेचे स्मरण…
सुमारे चार वर्षांपूर्वी (11 मार्च 2017) देहूरोड पोलीस ठाण्यातील दत्त मंदिरालगत उभ्या असणाऱ्या वाहनांना सायंकाळी अचानक आग लागली होती. तीन अग्निशमन बंबांनी आग आटोक्यात आणण्यात आला. या आगीत शेकडो वाहने जळून खाक झाली होती. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र मोठी दुर्घटना घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नव्हते.
स्मार्ट पोलीस ठाणे बनविण्याचे काम सुरू आहे. पोलीस ठाण्याच्या आवारातील बेवारस (बिनधनी) वाहने आणि अपघातातील तसेच विविध गुन्ह्यातील वाहनांचे मालक अथवा वारसदारांनी वाहनांची कागदपत्रे दाखवून वाहने घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहेत. वाहने घेऊन न गेल्यास वाहन मालकांना/वारसदारांना समन्स बजावण्यात येतील. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशाने या वाहनांचा लीलाव करण्यात येईल.
– विलास सोंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, देहूरोड पोलीस ठाणे