सिडनी – क्वीन्सलॅंड राज्यात करोनाचे नियम कठोर असल्याने तसेच अमिरातीत झालेल्या आयपीएल स्पर्धेदरम्यान बायोबबलमध्येच राहिल्यामुळे पुन्हा विलगीकरण कशासाठी असा प्रश्न विचारत असलेल्या बीसीसीआयच्या भूमीकेचे विक्रमादीत्य सुनील गावसकर यांनी समर्थन केले आहे.
बीसीसीआयदेखील भारतीय खेळाडूंच्या सुरक्षेची जबाबदारी घेण्यासाठी बांधील आहे. त्यामुळे खेळाडूंचा विचार करून बीसीसीआयची मागणी चुकीची नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
करोनाच्या वाढत्या धोक्यामुळे ब्रिस्बेनमधील लॉकडाऊन नागरिकांसाठी आवश्यक असले तरीही खेळाडूंसाठी ते त्रासदायक ठरेल.
भारताच्या खेळाडूंनी दिवसातील किमान 9 ते 10 तास मैदानावर घालवल्यावर त्यांना हॉटेलमध्ये एकमेकांसह वेळ घालवणे संघहिताच्या दृष्टीने गरजेचे आहे. बीसीसीआयला आपल्या खेळाडूंची काळजी असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे किमान हॉटेलमध्ये तरी खेळाडूंवर बंधने लावली जाऊ नयेत, असेही गावसकर म्हणाले.