रशियाची युद्धनौका मोस्कवा काळ्या समुद्रात बुडाल्यानंतर रशियाला आणखी एक झटका बसला. युक्रेनच्या सैन्यानं रशियन नौदलाला दिलेला हा दुसरा धक्का आहे.
रशियाच्या तिसऱ्या रॅंकचे कप्तान आणि रशियन नौदलाचे लॅंडिग शीप सीजर कनिकोवचे कमांडर अलेक्झांडर चिर्वा यांना मारण्यात युक्रेनला यश आलं आहे. युक्रेनच्या संरक्षण दलाच्या वतीनं सीझर कुनिकोवला बर्दियास्क शहराजवळ दुर्घटनाग्रस्त केलं होतं.
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाच्या पहिल्या दिवसापासून मोस्कवा युद्धनौका चर्चेत होती. मोस्कवा युद्धनौकेचा वापर करून युक्रेनच्या 13 सैनिकांना मारण्यात आलं होतं. 13 सैनिकांच्या स्मरणार्थ वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी एक पोस्टल तिकीटदेखील जारी
केलं होतं.
रशियन सैनिकांनी वेढा घातलेले युक्रेनचे मारियुपोल शहर आता रशियाच्या ताब्यात आहे. या युद्धामध्ये दोन्ही नौदलाच्या अनेक जहाजांना बुडवण्यात आले आहे. गेल्या दोन महिन्यांमध्ये सागरी लढाईमध्ये नेमके काय झाले? युक्रेन आणि रशियाच्या नौदलाची कारवाई कशी होती आणि येणाऱ्या काळात नौदलाचे युद्ध कशा प्रकारे होऊ शकते, याविषयी चर्चा करणे महत्त्वाचे आहे. युक्रेनची ब्लॅक समुद्राला लागलेली किनारपट्टी ही दोन हजार सातशे किलोमीटर आहे आणि यामध्ये अझोव्हचा समुद्र एक छोटा समुद्र आहे जो ब्लॅक समुद्राचा भाग आहे.
ब्लॅक समुद्राला मेडिटरेनियन समुद्राशी जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव आहे, बॉस्फोरस आणि डार्डेनेल सामुद्रधुनी. मात्र या सामुद्रधुनीवरती तुर्कस्तानचे कंट्रोल आहे. तुर्कस्तान कुठल्याही लढाऊ जहाजाला तिथून जाण्याची परवानगी देत नाही. यामुळे लढाई संपेपर्यंत रशियाला इतर कुठूनही जहाजे आणून, बुडालेल्या जहाजाची बदली करता येणार नाही. 20 हजार टन वजनाच्या जहाजाच्या बुडण्यामुळे विश्लेषकांमध्ये एक चर्चा सुरू झाली आहे की, मोठी जहाजे विरुद्ध क्षेपणास्त्र ज्यामध्ये प्रिसिजन गाइडेड क्षेपणास्त्र किंवा क्रुझ मिसाइल्स किंवा हाइपर्सोनिक मिसाइल असतील, यामध्ये कोण जिंकेल? खरंतर मिसाइल्स जिंकण्याची शक्यता फार जास्त आहे.
युक्रेन आणि रशियन नौदल तैनात
रशियाच्या नौदलाची जहाजे ही चार महा समुद्रामध्ये पसरलेली आहेत, परंतु जानेवारी 2022 मध्ये युद्ध सुरू व्हायच्या आधी रशियाने ब्लॅक समुद्रामध्ये किंवा काळ्या समुद्रामध्ये आपली अनेक शक्तिशाली जहाजे तैनात केली. त्यांचे काम होते रशियन सैन्याला किनाऱ्यावरून समुद्रातून दुसऱ्या शहराच्या दिशेने घेऊन जायचे किंवा ज्या लढाया जमिनीवरती सुरू आहेत त्यांना फायर सपोर्ट द्यायचा आणि समुद्रावरती गस्त घालून आपला व्यापार चालू ठेवायचा. रशियन नौदलाने या भागामध्ये सहा लॅंडिंग शिप आणले होते. उद्देश होता की, समुद्राच्या बाजूने जमिनीवरती हल्ला करून युद्ध लवकर संपवायचे. युक्रेनच्या नौदलाची संख्या 6500 नाविक आणि 90 ते 120 वेगवेगळ्या प्रकारची छोटी जहाजे आहेत. युक्रेनच्या सैन्याने त्यांच्याकडे असलेले सर्वात मोठे लढाऊ जहाज हेडमनवर रशिया कब्जा करेल म्हणून आधीच बुडवून टाकले. युक्रेनची नौदल हे केवळ रक्षात्मक कारवाई करू शकते आणि काही वेळा त्यांनी कमांडो रेड किंवा मिसाइल फायर करण्याकरता त्यांचा वापर केला गेला आहे. सध्या रशियाची 12 ते 24 जहाजे ब्लॅक समुद्रामध्ये आहे. या जहाजांचा मुख्य वापर मिसाइल लॉन्चर म्हणून करण्यात आला आहे. रशियन नौदलाने क्रुझ मिसाइल फायर करून, तोफांचा मारा करून, किनाऱ्यावरती हल्ला करणाऱ्या आपल्या सैन्याला फायर सपोर्ट दिला.
पुढे अजून काय होऊ शकते?
असे वाटते की, ओडिसा हे बंदर कब्जा करण्याकरता रशियन नौदलाचा एमफीबीएस लॅंडिंग करून वापर केला जाईल. तसे झाले तर पूर्ण किनारपट्टी ही रशियाच्या ताब्यात जाईल जे युक्रेनसाठी घातक ठरेल.
भारताने काय शिकावे?
तंत्रज्ञानामध्ये झालेल्या प्रगतीमुळे दूरवर असलेल्या जहाजावरती क्षेपणास्त्रांच्या मदतीने आकाशातून, जमिनीवरून आणि समुद्रामधून फायर करून त्यांना नष्ट करणे शक्य झालेले आहे. क्षेपणास्त्रांची मारक क्षमता अतिशय अचूक झाली आहे, कारण ते जीपीएस, लेझर गाइडन्स आणि इनरशियल नेव्हिगेशन सिस्टीम सारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करतात. तिन्ही प्रकारची क्षेपणास्त्रे जी एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती हलू शकतात. म्हणून आपल्याला नेमकी किती क्षेपणास्त्रे पाहिजे, याकरता तिन्ही दले म्हणजे भूदल, नौदल आणि हवाई दलांना एकत्रित विचार करावा लागेल. त्यानंतर क्षेपणास्त्रे बनवण्याकरता लागणारे बजेट आणि तंत्रज्ञान गरजेचे असेल.
चिनी सीमेवरती येणाऱ्या कुठल्याही आव्हानांना तोंड देण्याची आपली क्षमता असायला पाहिजे. ज्याप्रमाणे रशियाचे मोठे युद्ध जहाज बुडवले गेले त्यामुळे मोठी जहाजे नौदलात आल्यामुळे फायदा होईल की नुकसान, यावरती चर्चा सुरू झाली आहे. मोठी जहाजे विरुद्ध क्षेपणास्त्रे या लढाईमध्ये क्षेपणास्त्रांना सध्या आघाडी मिळालेली आहे. जगातले सर्व देश चीन, रशिया, अमेरिका आणि भारत वेगवेगळ्या प्रकारच्या क्रुझ क्षेपणास्त्रं वरती संशोधन करून त्यांना आपल्या सैन्यात सामील करत आहे.
भारताला सात हजार सहाशे किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि आपल्याकडे दोन द्वीप समूह आहेत. अंदमान आणि निकोबार द्वीपसमूह हा बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागरावर चांगले लक्ष ठेवू शकतो. याच प्रमाणे लक्षद्वीप आणि मिनिकॉय ही अरबी समुद्र, हिंदी महासागरवरती आपले लक्ष ठेवते. लांबलचक किनारपट्टीमुळे आपण इंडो पॅसिफिक समुद्रावर लक्ष ठेवण्याची क्षमता प्राप्त करू शकतो. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे ज्यामध्ये बॅलेस्टिक मिसाइल किंवा क्रुझ मिसाइल किंवा हाइपर्सोनिक मिसाइल सामील आहेत त्यावर वेगाने काम सुरू आहे.
थोडक्यात, रशिया आणि युक्रेन नौदलाच्या लढाईच्या पार्श्वभूमीवर भारताला आपल्या नौदलाच्या रचनेवर, डावपेचावर पुनर्विचार करावा लागेल. याशिवाय क्षेपणास्त्र विरुद्ध मोठी जहाजे, सॅटेलाइटच्या मदतीने समुद्रावर ती पूर्ण लक्ष ठेवणे, या वेगवेगळ्या बाबींचे विश्लेषण करून नौदला करता किती क्षेपणास्त्रे किती छोटी किंवा मोठी जहाजे याचा अभ्यास करावा लागेल.