नवी दिल्ली -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव हे विरोधकांचे एकमेव टार्गेट आहे. पण, विरोधकांना ते शक्य होणार नाही. मोदींचा पराभव करणे हा काही पोरखेळ नव्हे, अशा शब्दांत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी विरोधकांना लक्ष्य केले.
सोमवारी हैदराबाद दौऱ्यावर असणाऱ्या आठवले यांनी पत्रकारांशी बोलताना मोदींवर स्तुतिसुमने उधळली. देश मजबूत करण्यासाठी मोदी कार्यरत आहेत. मोदी केवळ देशातच नव्हे; तर संपूर्ण जगात क्रमांक एकचे लोकप्रिय नेते आहेत. ते तिसऱ्यांदा पंतप्रधान बनतील.
पुढील लोकसभा निवडणुकीत एनडीए 350 पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांनी विरोधकांना पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याचेही आव्हान दिले.
मोदी यांच्या रूपाने एनडीएकडे पंतप्रधानपदाचा एकच चेहरा आहे. बंगळुरूमधील बैठकीत अनेक विरोधी पक्ष सहभागी झाले. आमच्यात एकी असल्याचे ते सांगतात. तसे असेल तर त्यांनी पंतप्रधानपदाचा एक चेहरा जाहीर करावा, असे ते म्हणाले. मोदींना विरोध हा विरोधकांचा एकमेव अजेंडा आहे. त्याउलट, देशाचा विकास हा आमचा अजेंडा आहे, असेही आठवले यांनी म्हटले.