– अक्षय भिंगारदिवे
लहानग्या श्रेयाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यादिवशी मोठा अनर्थ टाळला. आपली चिमुरडी नात टेक्नोसॅव्ही असण्याचा अभिमान त्यादिवशी आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर सहज पाहायला मिळत होता. आपल्या मुलाने व सूनबाईने श्रेयाला कमी वयात तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा घेतलेला निर्णय त्याक्षणी त्या दोघांनाही मनोमन पटला होता. मात्र, त्या दोघांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, त्यादिवशी त्यांच्यासोबत घडलेली भयंकर घटना फक्त एक लहानसा ट्रेलर होता.
आदित्य 38 वर्षांचा आणि 36 वर्षांची कार्तिकी हे दोघे 13 वर्षांपूर्वी लग्नबंधनात अडकले. दोघेही एकाच आयटी कंपनीत कार्यरत असल्याने, आधी त्यांचे प्रेम जडले आणि मग काही वर्षांनी त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. थोरली श्रेया आणि धाकटी भाग्यश्री या आदित्य आणि कार्तिकीच्या दोन गोंडस मुली. अगदी तापट स्वभावाची श्रेया 11 वर्षांची, तर बुद्धिमत्तेने अगदी कुशाग्र असणाऱ्या भाग्यश्रीचे वय 7 वर्षे. सकाळी 8 वाजता उंबरा ओलांडल्यावर थेट रात्री 9 वाजता दोघेही घरी परतत असल्याने, दोन्ही मुलींना दिवसभर सांभाळण्याची जबाबदारी आजी आणि आजोबांच्या खांद्यांवर. मात्र आजी हृदयविकार रुग्ण व आजोबा मधुमेहाच्या व्याधीने ग्रासलेले असल्याने, त्या दोघांनाही ठरलेल्या वेळेला गोळ्या घेण्याची आठवण करून देण्याचा टास्क, थोरली श्रेया अगदी काळजीपूर्वक पार पाडतेय.
आदित्य आणि कार्तिकी हे दोघेही पेशाने इंजिनिअर असल्याने सभोवताली असणारे मोबाइल, टॅब्लेट, लॅपटॉप, ब्ल्यूटूथ हेडफोन, इको डॉट, स्मार्टवॉच, व्हिडिओ डोअर बेल आणि इतर आधुनिक स्मार्ट डिव्हाइस पाहातच श्रेया लहानाची मोठी झाली. काळाची गरज ओळखून कार्तिकीनेही तिला सर्वच गॅजेट हाताळण्याची मुभा दिल्याने, वयाच्या अवघ्या पाचव्याच वर्षी ती स्मार्टफोन अनलॉक करण्यात पारंगत झाली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने पहिला सेल्फी क्लिक करण्याचा प्रयत्न केला, तर वयाच्या सातव्या वर्षी तिने वडिलांचा लॅपटॉप उघडून त्यात स्वतःचं नाव टाईप करून दाखवलं. आपली मुलगी झटपट तंत्रज्ञान अवगत करत असल्याचा एकीकडे कार्तिकी आणि आदित्यला अभिमान वाटत होता, तर दुसरीकडे त्या कारणाने नातेवाईकांच्या रोषालाही त्या दोघांना सामोरे जावे लागत होते. “एवढ्या लहान वयात मुलांना डिजिटल डिव्हाइसेसची ओळख करून देणे अत्यंत धोक्याचे आहे’, हे वाक्य ज्याच्या त्याच्या तोंडून ऐकण्याची तर त्या दोघांना जणू सवयच झाली होती. मात्र, असं असूनही आदित्य आणि कार्तिकीने आपल्या निश्चयात तसूभरही बदल केला नव्हता.
श्रेया आणि भाग्यश्रीला तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा कार्तिकीचा पुढाकार, मागील काही दिवसांपासून तिच्या सासू-सासऱ्यांनाही खटकत होता. कारण, व्हायरल व्हॉट्सऍप मेसेजद्वारे मोबाइल वापराचे तोटे वारंवार त्यांच्या मनावर बिंबवले जात होते. त्यामुळेच एक-दोनदा आदित्य आणि कार्तिकीला त्यांनी विरोध करण्याचाही प्रयत्न केला. तेव्हाही “तंत्रज्ञान हे एक दुधारी शस्त्र आहे,’ हे वाक्य उच्चारून कार्तिकी आपल्या सासू-सासऱ्यांची समजूत काढत असे. मात्र, तंत्रज्ञान हा शाप नसून मानवाला लाभलेले वरदान आहे, याची जाणीव त्यांना लवकरच झाली.
तो सोमवारचा दिवस होता, जेव्हा कार्तिकी आणि आदित्य नेहमीप्रमाणे ऑफिसला जाण्यासाठी सकाळीच घराबाहेर पडले होते. आजारी असल्याने श्रेयाने त्यादिवशी शाळेला दांडी मारली होती, तर धाकटी भाग्यश्री अजूनही बिछान्यात लोळत होती. रोजच्याप्रमाणे श्रेयाची आजी किचनमध्ये नाश्ता बनवण्यात मग्न असताना, अचानक हॉलमधून एक किंकाळी तिच्या कानावर आली. आवाजाचा मागोवा घेत श्रेयाही धावत हॉलमध्ये पोहोचताच, समोर बेशुद्ध आजोबा तिच्या नजरेस पडले. नवऱ्याची ती अत्यवस्थ अवस्था पाहून, श्रेयाच्या आजीचे तर अवसान गळाले. आणीबाणीच्या त्या प्रसंगातही, का कोण जाणे, पण श्रेया अगदी खंबीर दिसत होती.
तिने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्वात आधी बाजूला पडलेला आजोबांचा फोन उचलून आजोबांच्या अंगठ्याच्या ठशाने अनलॉक केला. त्यानंतर वेळ न दवडता मदतीची आर्जव करणारा व्हिडिओ रेकॉर्ड करून तो झटपट व्हॉट्सऍप स्टेटसला ठेवला. आईच्या मार्गदर्शनानुसार श्रेयाने घेतलेला निर्णय व दाखवलेले धाडस खरोखर वाखाणण्याजोगेच होते. कारण श्रेयाचा तो व्हिडिओ स्टेटस पाहून शेजारी आणि सोसायटीचे सिक्युरिटी गार्ड लगेचच मदतीला धावले. सर्वांनीच तत्परता दाखवल्याने अगदी पंधरा मिनिटांत ऍम्ब्युलन्सही सोसायटीच्या गेटमध्ये येऊन उभी राहिली.
आजोबांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात झालेला क्षणाचाही विलंब कदाचित त्यांच्या जीवावर बेतू शकला असता. मात्र, लहानग्या श्रेयाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे त्यादिवशी मोठा अनर्थ टाळला. आपली चिमुरडी नात टेक्नोसॅव्ही असण्याचा अभिमान त्यादिवशी आजी-आजोबांच्या चेहऱ्यावर सहज पाहायला मिळत होता. आपल्या मुलाने व सूनबाईने श्रेयाला कमी वयात तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा घेतलेला निर्णय त्याक्षणी त्या दोघांनाही मनोमन पटला होता. मात्र, त्या दोघांनी कधी स्वप्नातही विचार केला नसेल की, त्यादिवशी त्यांच्यासोबत घडलेली भयंकर घटना फक्त एक लहानसा ट्रेलर होता.
असे म्हणतात की, लहानगे घरातील मोठ्यांचे अनुकरण करतात. त्यामुळेच त्यांची बोलण्याची, वागण्याची व हातवारे करण्याची लकब खूपदा घरातील वडीलधाऱ्यांशी मिळतीजुळती असते. घरातील सर्वात लहान लेकरू असणारी भाग्यश्रीही कधी आपल्या आईवडिलांची, तर कधी आजी-आजोबांची नक्कल जरी करत असली, तरी तिच्यावर मोठ्या बहिणीचा अधिक प्रभाव होता. म्हणूनच श्रेयाच्या संगतीने तीही आपोआप स्मार्टफोन व लॅपटॉप हाताळायला शिकली. विशेष म्हणजे कोरोनानंतर श्रेयाकडेही तिचा एक स्मार्टफोन असायचा, ज्याचा वापर ती गरजेनुसार करायची. कार्तिकीने शिकवल्याप्रमाणे शाळा सुटल्यावर ती न चुकता स्वतःचं लाइव्ह लोकेशन आजोबांशी शेअर करायची, ज्यामुळे आजोबा अगदी वेळेत स्कूलबससमोर दरवेळी उभे दिसायचे. कधी आजीची तब्बेत ठीक नसेल, तर श्रेयाच ऑनलाइन फूडही ऑर्डर करत असायची. इंटरनेटचा वापर करून कोणतीही माहिती शोधणे, जणू श्रेयाच्या डाव्या हाताचा खेळ असल्याने, आजोबाही ऑनलाइन बॅंकिंगसाठी तिची मदत घेत असत. मोठ्या बहिणीला अगदी सराईतपणे स्मार्ट डिव्हाइस वापरताना बघून, भाग्यश्रीलाही आपोआप त्यांचे आकर्षण वाटू लागले. म्हणूनच कदाचित लहानाची मोठी होताना तीही श्रेयाच्या पावलांवर पाऊल ठेवायला लागली.
एप्रिल महिन्यात मुलींच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतर दरवर्षीप्रमाणे कार्तिकी व आदित्यने उन्हाळी सहलीचा प्लॅन आखला. मात्र, आरोग्याचं कारण देत आजी-आजोबांनी सोबत येण्यास ऐनवेळी असमर्थता दर्शवल्याने, श्रेया आणि भाग्यश्रीचा हिरमूस झाला. शिवाय सहलीला रात्री निघण्याच्या निर्णयावर आदित्य ठाम असल्याने, कार्तिकीही मनोमन नाराज होती. मात्र टोकाचा विरोध करूनही, अखेरीस तिला आदित्यच्या हट्टापुढे माघार घ्यावी लागली. तरी बरं की, आदित्यच्या आई-वडिलांनीही त्याला कार हळू चालवण्याबाबत बजावून ठेवलं होतं. रात्री 8 वाजता आजी-आजोबांच्या पाया पडून हसतमुखाने घराबाहेर पडणाऱ्या त्या चौघांना जाणीवही नव्हती की, त्यांना येणाऱ्या काही तासांमध्ये एका मोठ्या अग्नदिव्यातून जावे लागणार आहे.
विशेष म्हणजे नेहमीच्या सवयीप्रमाणे श्रेयाने आपल्या मोबाइलचे लाइव्ह लोकेशन आजोबांशी शेअर केले होते. सलग 4 तास ड्रायव्हिंग केल्याने आलेला थकवा दूर करण्यासाठी आदित्यने रात्री 12 वाजता एका हॉटेलवर गाडी थांबवली, जिथे त्याने आणि कार्तिकीने चहा घेतला. गाडीच्या अर्धवट काचेमधून बाहेर डोकावणाऱ्या श्रेयाने त्याच संधीचा फायदा घेत हॉटेलचा फोटो काढून तो गुपचूप स्टेटसला ठेवला आणि खाली “ऑन द वे’ असं कॅप्शन टाइप केलं. अंदाजे 15 मिनिटांनी आदित्य कार्तिकीसोबत गाडीत येऊन बसला आणि त्याने कार स्टार्ट केली. इच्छित स्थळी पोहोचून सूर्योदय पाहण्याचे ध्येय मनात ठरवून आदित्य त्यावेळी सुसाट गाडी चालवत होता. मात्र, अवकाळी पाऊस सुरू झाला आणि अंधारात रस्ता दिसणे कठीण झाले. त्याही परिस्थितीत हट्टी स्वभावाचा आदित्य गाडी थांबवायला तयार नव्हता. त्यातच एका वळणावर समोरून भरधाव वेगाने येणारा ट्रक आदित्य आणि कार्तिकीच्या नजरेस पडला आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्या निर्मनुष्य रस्त्यावर आदित्यच्या कारने भलताच वेग पकडल्याने, त्याच्या एसयूव्ही कारला आवरणं एक मोठं आव्हान होतं. त्यातच समोरचा ट्रकही अगदी बेफाम वेगाने त्याच्या दिशेने येत असताना, आदित्यने धडक टाळण्यासाठी कारचे स्टिअरिंग पूर्ण ताकदीनिशी डाव्या दिशेला फिरवले. कर्मधर्मसंयोगाने धडक तर वाचली, मात्र आदित्यची कार रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या मोठ्या झाडाला जाऊन धडकली.
त्या अपघाताची तीव्रता एवढी अधिक होती की, झाडाचं खोड अक्षरशः कारच्या बोनेटमध्ये घुसलं. नशीब बलवत्तर म्हणून 3 एअर बॅग्ज उघडल्या आणि कर्कश आवाज करणारे गाडीचे इंडिकेटर एकाएकी बंद झाले. लहानग्या भाग्यश्रीने जेव्हा आजूबाजूला पाहिले, तेव्हा बेशुद्ध अवस्थेतील बहीण, आई आणि वडील तिच्या नजरेस पडले. स्टिअरिंगमुळे आदित्य रक्तबंबाळ झाल्याने रक्ताचे शिंतोडे गाडीभर पसरले होते. भाग्यश्रीने जोरजोरात हाक देऊनही कुणीच साद न दिल्याने ती सुरुवातीला प्रचंड घाबरली. मात्र, देवाच्या कृपेने श्रेयाचा मोबाइल नेमका तिच्या पायाजवळ पडल्याचे तिने पाहिले. क्षणाचाही विलंब न करता, तिने मोबाइल उचलला आणि स्क्रीनवर दिसणारा शेवटचा नंबर डायल करण्याचा प्रयत्न केला.
जेव्हा जखमी खांद्याला होणाऱ्या वेदनांकडे दुर्लक्ष करून भाग्यश्रीने पुन्हा एकदा नंबर डायल केला तेव्हा घड्याळात रात्रीचे दीड वाजले होते. सुदैवाने शेवटचा डायल नंबर आजोबांचा असल्याने, तिकडे घरी त्यांच्या रिंगटोनच्या आवाजाने आजीची झोप मोडली. पलीकडून हुंदके देऊन रडणाऱ्या नातीचा आवाज ऐकून काहीतरी अघटित घडल्याची चाहूल एव्हाना आजी-आजोबांनाही लागली होती. म्हणूनच कशीबशी भाग्यश्रीची समजूत काढून तिला आधार देत, त्यांनी कॉल कट केला. लागलीच श्रेयाच्या मोबाइलचे लाइव्ह लोकेशन चेक केल्यानंतर, त्यांना अपघाताचे अचूक ठिकाणही समजले. सर्वात आधी त्या सर्वांना तातडीची मदत व प्रथमोपचार मिळणे आवश्यक होते. तीच गरज ओळखून आजोबांनी आदित्यच्या जवळच्या मित्रांशी संपर्क साधून घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. माहिती देत असतानाच त्यांनी श्रेयाने स्टेटसला ठेवलेल्या हॉटेलचा फोटो व लाइव्ह लोकेशनही शेअर केले. तंत्रज्ञानाच्या कृपेने हॉटेलचा व जवळच्या हॉस्पिटलचा संपर्क क्रमांक सहज उपलब्ध झाला. सोशल मीडियामुळे संपर्क सोपा झाल्याने, अपघातस्थळाच्या परिसरात राहणाऱ्या नातेवाईकांना अपघाताची माहिती देण्यात आली. त्यामुळेच आदित्य व त्याच्या परिवाराला अगदी अर्धा तासात प्रथमोपचार मिळाले. वेळेत सर्वांनाच दवाखान्यात दाखल केल्याने, जखमांचे निदान व उपचार करण्यात कुठलीही दिरंगाई झाली नाही.
दुर्दैवाने त्या अनपेक्षित अपघाताच्या निमित्ताने का होईना, पण सर्वांना तंत्रज्ञानाचे महत्त्व कळले. स्वतःच्या मुलींना तंत्रज्ञानाचा योग्य वापर शिकवल्याने त्यादिवशी आदित्य व कार्तिकीचे प्राण वाचले. तसे तर “तंत्रज्ञान शाप की वरदान?’ या प्रश्नाचे उत्तर शोधतच आपण लहानाचे मोठे झालो. मात्र कार्तिकी म्हणते त्याप्रमाणे, “तंत्रज्ञान हे एक दुधारी शस्त्र आहे’. ज्याचा आजच्या डिजिटल युगात सकारात्मक तसाच नकारात्मक वापर सहज शक्य आहे. मात्र, विचारपूर्वक तंत्रज्ञानाचा अचूक वापर केला, तर ते नक्कीच मानवाला लाभलेले सर्वश्रेष्ठ कल्याणकारी वरदान ठरू शकेल.