– सुचित्रा पवार
आज 15 मे. कॅलेंडराचे पान फडफडले. सकाळी उठताच तिच्या गालावर मंद गोड हसू आलं.आजचा दिवस खास होता तिच्यासाठी, लग्नाचा पाचवा वाढदिवस होता तिच्या. तसे तर आदल्या दिवशीच ती पूर्ण तयारी करायची. पहाटे लवकर उठून आवरून नवऱ्याच्या आवडीचे पदार्थ करायची. वर्षभर खर्चाला दिलेल्या पैशातून केलेल्या बचतीतून नवऱ्यासाठी छोटस गिफ्ट. मग तो उठला की त्याच्या कपाळावर अलगद ओठ ठेवून लग्नदिवसाच्या शुभेच्छा देऊन हलकेच हातात सरप्राइज गिफ्ट ठेवायची. खूप खूप आनंद व्हायचा त्यालाही. मग तोही तिला जवळ घेऊन अलगद गालावर ओठ टेकवत त्यानं लपवलेला मोगऱ्याचा शुभ्र गजरा तिच्या मोकळ्या केसांत माळायचा आणि तिला शुभेच्छा द्यायचा.
आवरून मग तो ऑफिसला जायचा. संध्याकाळी थोडं लवकर परत येऊन दोघेही बाहेर जायचे; प्रथम गावातील मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेऊन एखाद्या भिकाऱ्याला खाऊ देत आणि मग त्यांच्या नेहमीच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये त्याच नेहमीच्या कोपऱ्यातल्या टेबलवर बसून आवडीचे पदार्थ खात. एकमेकांच्या डोळ्यांत डोळे मिसळून खूप गप्पा मारत, आठवणींना उजाळा देत, भविष्याची गोड स्वप्ने पाहात आणि एखादा सिनेमा पाहून उशिरा घरी परतत. खूप खूप आनंदी आणि खूश असायचे दोघेही. कारण, परस्परांवरील प्रेम आणि सामंजस्य अतूट होतं, अवीट होतं. एकमेकांना जपणं, एकमेकांच्या भावनांची कदर आणि एकमेकांविषयी आदर होता म्हणून तर हा दिवस अजूनच सोनेरी, सुगंधी होऊन जायचा; त्या भेटवस्तूतला आनंद द्विगुणित व्हायचा. तो स्वतःला खूप भाग्यवान समजायचा. तसे तो तिला नेहमीच बोलून दाखवायचा आणि तीही त्याच्याविषयीचे सारे कृतज्ञ भाव प्रेमळ डोळ्यांतून, प्रेमळ स्पर्शातून आणि त्याच्यासाठीच्या सेवाभावातून व्यक्त करायची. थोडेसे रुसवे फुगवे दिलगिरीच्या शब्दांतून संपून जायचे, ते तात्पुरते असायचे.
तिने पटपट आवरले आणि त्याच्या आवडीचा केशरी रव्याचा भरपूर तूप, बडीशेप, गूळ घालून मस्त शिरा बनवला व तो उठण्याची वाट पाहू लागली. पण..
“अगं निशू… मला आज लवकर जायचं आहे, उठवायचं नाहीस का लवकर? मी रात्री तुला सांगायला विसरलोच.’
असे म्हणत पांघरून दूर करत तो बाथरूमकडे पळाला. ओठांत दबके हसू घेऊन ती मागे मागे घुटमळत होती. तिला माहीत होते, काही झालं तरी आजचा दिवस तो विसरणार नाहीच. पण त्याने गडबडीत आन्हिक उरकले. तिने दिलेला नाश्ताही बिन शेऱ्याचाच गुपचूप खाल्ला आणि गडबडीत डबा घेऊन गेलाही. तिला जरा वाईटच वाटलं. “आजचा दिवस असा कसा विसरले बरं?’
ती कामाला लागली. कामाची भली मोठी लिस्ट आज होती ती उरकायची होती. दोन अंगडी टोपडी आणि दोन अर्धवट राहिलेले ब्लाऊज शिवून पूर्ण करून द्यायचे होते. त्याचे पैसे आजच मिळणार होते. दुपारी जाऊन त्याच्यासाठी कित्ती दिवस हेरून ठेवलेला चॉकलेटी शर्ट आणि तो सहाशे रुपयवाला त्याच्या आवडीचा सेंटही आणायचा होता. तिने कपाटातला पैशांचा डबा काढून बघितला. वर्षभराचे शिवणाचे, भाऊबीज आणि खर्चातले बाजूला निघालेले असे मिळून जवळ जवळ पाच-सहा हजार होते. गिफ्ट घेऊन उरलेले पैसे बॅंकेत भरायचे होते. “आता विसरले असले म्हणून काय झालं? संध्याकाळी किंवा दुपारीच नक्की लवकर येणार तोपर्यंत आपण आवरून बसू’ म्हणून तिने कामाला सुरुवात केली; मनात आणि नजरेत फक्त तोच आणि त्याचाच विचार होता.
सगळी कामे झाली. सगळी तयारी झाली. दुपार टळून गेली. संध्याकाळ झाली. त्याच्या आवडीची आकाशी निळ्या रंगाची साडी नेसून, हलकासा परफ्युम फवारून, अबोलीचा गजरा माळून, देवापुढं निरांजन उदबत्ती लावून ती तयार होऊन त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली. पण संध्याकाळ टळून गेली. सात, आठ वाजले तरी त्याचा पत्ता नव्हता. आता मात्र तिला काळजी वाटू लागली. काय झालं असेल? तिचं मन नाना शंकांनी भरून गेलं. ती अस्वस्थपणे आत-बाहेर फेऱ्या मारू लागली. बाहेर जाऊन दूरवरून कुठं गाडीची लाईट दिसते का पाहू लागली. भूकही खूप लागली होती. “हल्ली हल्ली तो दररोजच उशिरा येऊ लागलाय, कुठं पाऊल तर वाकडं पडलं नसेल ना?’ या विचाराने तिच्या घशाला कोरड पडली आणि ती अजूनच अस्वस्थ झाली.
इतक्यात गाडीचा हॉर्न वाजला. ती धावतच बाहेर गेली. पण तिच्याकडे लक्ष न देताच “निशू आपल्याला एकजणाला भेटायला जायचंय, मला चहा दे गं.’
म्हणत तो बाथरूमकडे वळला. आता मात्र तिला त्याचा राग येऊ लागला. नऊ वाजले, दिवस संपत आला तरी आजचा दिवस लक्षात नाही? नाही ते नाही, मी इतकं नटून बसलेय तरीही लक्षात काहीच आलं नाही? “नक्कीच बदललाय हा, आपल्यालाच कळलं नाही.’ विचारांच्या तंद्रीतच तिनं मूकपणे हातात चहा दिला न पर्स घेऊन तयार झाली. चहा पिऊन त्याने गाडीला किक मारली. काहीच न बोलता थोड्याशा गुश्शातच तीही पाठीमागे बसली पण आज अंतर ठेवूनच; इतकंच काय खांद्यावर हात पण टाकला नाही. कितीही राग आला तर आज राग व्यक्त करायची ही वेळ अन् दिवसही नव्हता; असं तिचं मन बजावत होतं पण तिच्या मनात नाना विचारांचे काहूर माजले होते.
थंडगार हवा झोंबू लागली. क्षणभर वाटले, “बिलगावे का त्याला?’ पण तिने स्वतःस सावरले कारण आज तिला तिचा प्रेमळ, हसरा, खोडकर, रोमॅंटिक नवरा वाटत नव्हता. कुणीतरी परका, खूप दूरचा माणूस वाटत होता. गाव संपले, काळोख दिसू लागला. आतापर्यंत दाबून ठेवलेला गुस्सा अश्रूवाटे तिच्या डोळ्यांतून वाहू लागला. सबंध रस्ताभर तो तिच्याशी एकही शब्द बोलत नव्हता, फक्त शांतपणे गाडी चालवत होता.
“एक लग्नाचा वाढदिवस लक्षात नाही राहिला म्हणून काय झालं? आजच्या एका दिवसासाठी आपण इतक्या दिवसांचे चांगुलपण, आनंदी क्षण विसरायचे? त्याचे प्रेम, आपुलकी, स्नेह सगळं विसरायचं? लगेच नाराज होऊन अबोला धरायचा? आजपर्यंत त्यानं कधीच आपल्याला दुखावलं नाही. त्याच्या लक्षात नसलं तर आपण द्यावे एखाद वेळी लक्षात आणून! काय कमीपणा आहे? आपण दोघे वेगळे का आहोत? परत येताना आपणच आठवण करू आणि नेहमीच्याच पद्धतीने करू साजरा लग्नदिवस त्यात काय?’ हा विचार तिच्या मनात येताच तिला हलकं हलकं वाटलं; इतक्यात गाडीचा वेग कमी झाला. डावीकडे आत एक रस्ता जात होता तिथंच कोपऱ्यावर गाडी थांबली.
देवीचं एक छोटंसं मंदिर होतं. देवीची प्रसन्न, हसरी तेजस्वी मुद्रा पाहून तिला थोडं बरं वाटलं. मनातले विचार थोडे हलके झाल्यासारखे वाटले. देवीला हळदी कुंकू वाहून, नमस्कार करून ती शांतपणे पुन्हा गाडीवर बसली. अंधारात स्पष्ट काहीच दिसत नव्हते पण नवीनच वसलेली ती एक छानशी वस्ती होती. स्वच्छ डांबरी रस्ते, रस्त्याकडेला चाफा, कागदी फुलं, प्राजक्त, रातराणी, बिट्टी, तगर नारळ अशी भरपूर झाडे-झुडे चांदण्यांच्या उजेडात दिसत होती. पाचच मिनिटांत ते दोघे दिव्याची रोषणाई केलेल्या एका छोट्याशा घरापुढं थांबले. “अच्छा! साहेब कुणाच्या वास्तुशांत कार्यक्रमाला घेऊन आलेत तर!’ ती मनातच पुटपुटली. तो गाडीवरून न बोलताच उतरला; पायऱ्या चढून हलकेच दरवाजा उघडला. तीही त्याच्या सोबत आत गेली. आत पाऊल पडताच दोघांच्या डोक्यावर मोगऱ्याच्या फुलांचा अचानक वर्षाव झाला. आणि तिला जवळ घेत तो म्हणाला,
“हॅपी मॅरेज ऍनव्हर्सरी! कसं वाटलं आपलं घर?’ आणि खो खो हसत सुटला.
“क… ककाय?’ तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडेना. मघापासून दाबून ठेवलेल्या भावना अन अनपेक्षित सुखद धक्क्यामुळे तिला काय करावं न काय बोलावं ते कळेनाच. ती भांबावून त्याच्या गळ्यात पडून रडू लागली.
“मला माफ करा…’ इतकेच कसेबसे बोलली. “मला मग बोलला का नाहीत?’
ती लटक्या रुसव्याने म्हणाली. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत तो म्हणाला, “मग सरप्राइज कसलं? कसं वाटलं माझं सरप्राइज? प्रत्येकवेळी तूच सरप्राइज द्यावस असं थोडंच असतं? तुझ्या सगळ्या सरप्राइजला कृतज्ञता म्हणून मी एखादं तर सरप्राइज द्यावं ना?’
“निशू अन्न, वस्त्र, निवारा माणसाच्या मुख्य तीन गरजा, या व्यवस्थित पूर्ण झाल्या की माणूस सुखी, समाधानी होतो. माणूस सुखी जीवनाची कल्पना करतो, स्वप्नं पाहतो आणि ते प्रत्यक्षात जेव्हा उतरतं तेव्हा जगण्याला एक वेगळी उंची प्राप्त होते, जगण्याला एक वेगळाच आनंद प्राप्त होतो.’
“पण मी नव्हती कल्पना केली की इतक्या लवकर आपलं घर होईल.’ ती म्हणाली. त्याने तिचे डोळे पुसले.
“चल, आता सगळी गंमत दाखवतो, म्हणत त्याने तिचा हात धरला. हा हॉल… तिने नजर फिरवली, अचूक रंगसंगती, प्रकाशनियोजन, आटोपशीर, शोकेस आणि त्यात चिमणीचं हुबेहूब घरटं आणि दोन हुबेहूब पिल्ली! ती हरकून घरट्याकडे गेली.
“आता आपण आपल्या पिलांना जन्म देऊ शकतो, होय ना?’ तो म्हणाला.
ती लाजून लाल झाली.
“इथं आपल्या प्रेमाच्या गुजगोष्टी आणि धुंद एकांत असेल.’
बेडरूमकडे बोट दाखवत तो म्हणाला. बेडरूम देखील तितकंच आकर्षक आणि हवेशीर होतं.
“इथं मात्र तुला हवे तसे फर्निचर करून घे बाई.’ म्हणत त्याने तिला किचनकडे नेलं. मग पाठीमागची छोटीशी गॅलरी दाखवून पुढं अंगणात आणलं. “निशू मागील वर्षी आमच्या ऑफिसच्या सहकाऱ्यांच्या मध्ये या नवीन घरकुलांची चर्चा चालू होती. काही रो हाउसेस आणि काही फ्लॅट्स होते. मी सहजच रो हाउसची किंमत आणि डिपॉझिट विचारलं, म्हणजे मलाही वाटलं नव्हतं की माझ्या पगारात आपलं दहा लाखांचे घर होईल! पण फक्त पन्नास हजार डिपॉझिट होते आणि बाकी हप्ते.
माझ्या बचतीत तीस हजार शिल्लक होते वरचे थोडे सहकाऱ्यांकडून उसने घेतले आणि तिघा चौघांनी मिळून ही रो हाऊसेस पटकन बुक केली. पगारावर थोडे कर्ज घेतलं आणि एक पार्टटाइम दोन-तीन तासांची नोकरी पकडली. गेले सहा सात महिने मी म्हणूनच उशिरा येतो घरी. उसने घेतलेले पैसे परत केले. आता घरखर्चाची थोडी ओढाताण झाली तर तुझ्या शिवण कामातून भागवशील ना? बघता बघता कर्ज फिटेल मग आपल्याला मुलांच्या शिक्षणाशिवाय जास्त खर्च राहणार नाही. “त्याने तिचा हात हलकेच हातात हात घेतला. ती निःशब्द होऊन फक्त ऐकत होती.
“झिलमिल सितोरों का आंगन होगा… तुला हे गाणं खूप आवडतं ना? मग बघ हे आपलं छोटंसं अंगण…’ त्याने तिची तंद्री भंग करत विचारले. आकाशात टिपूर चांदणं अन त्यात हसणारी चंद्राची कोर, ती भारावून गेली.
“तुला फुलं खूप आवडतात ना देवाला वाहायला? मग हवी तितकी फुलझाडं लाव अंगणात आणि मनसोक्त गजरे देखील माळ…’ तो मंद स्मित करत हळूच म्हणाला.
“तुमच्यासारखा नवरा प्रत्येक स्त्रीला मिळो…’ तिने त्याचे हात ओठांजवळ हलकेच नेले.
“निशू, तुम्ही बायका कित्ती कित्ती करता गं नवऱ्यासाठी, संसारासाठी, कुटुंबासाठी! खरं तर संसार, कुटुंब दोघांचेही असते पण त्यात जीव ओतून सर्वांना सुखी आनंदी ठेवण्याचे काम मात्र स्त्रीच करते. बघ ना, कालपर्यंत होस्टेलवर राहून स्वतःची कामे स्वतः करणारा तो लग्न होताच किती निर्धास्त होतो! हक्काची पत्नी म्हणून मग प्रत्येक वस्तू जागेवर पोहोच करायला लावतो. जणू काही पत्नी म्हणजे हक्काचा नोकर. तीही बिचारी त्याच्या प्रेमाखातर सारे आपुलकीने करते. प्रेमाचा हक्क जबरदस्तीच्या, स्वामित्वाच्या भावनेत कधी परावर्तित होतो ते लक्षातच येत नाही; कधी कळत देखील नाही. बऱ्याचदा पुरुष स्वतःच्या आईवडिलांची सेवा स्वतः करत नाही मात्र पत्नीने ते केलं पाहिजे म्हणून आग्रह धरतो.
परिस्थिती कशीही असो स्त्रिया ऍडजस्ट करत राहतात, सारे काही पचवत पुरुषांच्या जीवनात आनंद निर्माण करतात. माहेर घरी वडील, भाऊ यांना तर सासरी सासरे, दीर आणि नवरा, मुलगा सगळेच पुरुष स्त्रियांच्या जीवावर सुखी आनंदी होतात मात्र आम्ही त्या बदल्यात काय देतो? एखादा दागिना, चार चांगल्या साड्या तेही हजारदा बोलून दाखवतो “तुला काय कमी आहे? तुला मी इतकं करतो!’ एखादीच्या नशिबी तेही नसतं. साधे चार प्रेमाचे गोड शब्ददेखील नसतात; बिचाऱ्या तेही उपकार मानून त्याच उपकाराखाली निमूट जगतात. लग्न झालं की तिच्या इच्छा, आकांक्षा, स्वप्न सारे काही लग्नाच्या वेदीत स्वाहा होते. याहून वाईट स्थिती व्यसनी नवऱ्याच्या बायकांची असते.
कष्टकरी, श्रमजीवी महिला राब राब राबतात आणि त्यांच्या कष्टावर नवरे चैनीत जगतात. किती लाजिरवाणे आहे हे! पण कोण विचार करतो? नवरा म्हणजेच सर्वस्व आणि तो कसला जरी असला तरी त्याचंच भल करायचं, चिंतायचं असं पिढ्यान्पिढ्या बाईच्या मनावर, मेंदूवर ठासून ठासून कोरलं जातं. यापलीकडे तिच्या स्वतःच्या अस्तित्वाला काडीमात्र किंमत नसते. एखाद्या घरी स्त्री नसेल तर त्या घराला घरपण रहात नाही. पत्नी, आई, बहीण कुणाचेच ऋण पुरुष कधीच चुकवू शकत नाही. आता हे बघ ना, मी सकाळी उठायच्या आत तू सगळं आवरून माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना करतेस. असेल तशा परिस्थितीत घरखर्च चालवतेस सगळं जिथल्या तिथं! आणि घर आनंदी ठेवतेस म्हणूनच मी निर्धास्त पुढे जातो, कुठल्याच विवंचनेशिवाय, कटकटीशिवाय. खऱ्या अर्थाने तू माझी अर्धी शक्ती-अर्धांगिनी आहेस. मी तुझ्या जीवावर निर्धास्त असतो. निवांत उठतो, आवरतो अन ऑफिसला जातो. सुखी जीवन यापेक्षा अजून काय असेल? मी खूप खूश आहे तुझ्यावर, तुझ्या सोबतीवर…’ तो बोलतच राहिला अन् ती निःशब्द होऊन फक्त ऐकत राहिली …आपल्या नवऱ्याचे विचार ऐकून तिचं काळीज अभिमानाने फुलून आलं होतं… डोळ्यांतून आनंदाश्रू वाहात होते… दुरून कुठूनतरी गाण्याची हलकी लकेर कानी पडत होती…
“तेरा साथ है तो… मुझे क्या कमी है…’
मघाची ढगात लपलेली अर्धचंद्रकोर आता पूर्णपणे तेजाळली होती…