– विशाखा गंधे
“ही इमारत धोकादायक असून येथील रहिवाशांना कळविण्यात येते की त्यांनी त्वरित इमारत खाली करावी, अन्यथा होणाऱ्या अपघातास शासन जबाबदार नाही.’
मंदानी नोटीस वाचली आणि कपाळाला हात लावत ती चौथ्या मजल्यावरच्या आपल्या घरी आली. तिचा नवरा दारू पिऊन कोपऱ्यात पडला होता.
एकूण साठ बिऱ्हाडांपैकी आता केवळ सात-आठ कुटुंब तिथे शिल्लक राहिली होती. बाकीचे कधीच आपली जागा सोडून इतरत्र गेले होते. दोन मुलं आणि पिणारा नवरा यांना घेऊन कुठे जाणार हे मंदाला माहीत नव्हतं.
घरात काम करता करता तिची बडबड सुरू झाली. “एक दिवस मुलांसकट इथेच बिल्डिंग खाली गाडले जाणार आपण! मी एकटी हातपाय चालवणार आणि तुम्ही बसणार ढोसत!’
इमारत पाडून परत बांधण्यासाठी इतर लोकांनी प्रयत्न चालवले होते. प्रत्येकी सात-आठ लाख भरले तर एक मोठी खोली द्यायला बिल्डर तयार झाला होता. पण मंदा त्याचा विचारही करू शकत नव्हती.
मंदाचा नवरा बरळला, “त्या कामाला जातेस ना आहुजाकडे, त्याचा मर्डर करतो म्हणजे हवे तेवढे पैसे मिळतील!’
“स्वतःला दोन पायावर उभं राहता येत नाही आणि चालले मर्डर करायला!’ मंदा चिडून म्हणाली. घरातली कामं आटपून मंदा कामाला निघाली. त्यांच्या इमारतीजवळ बंगल्यांची वसाहत होती तिथे स्वयंपाकाची कामं करून मंदा घर चालवत होती. आहुजा, शर्मा, केळकर आणि देव या चार घरची कामं करून, दोन वेळचं पोटभर जेवण आणि मुलांचं शिक्षण भागत होतं.
बंगल्याच्या दिशेनी चालत जाताना मंदाच्या डोक्यात घराचाच विचार होता. “दहा-पंधरा हजार उसने मागणं वेगळं आणि एवढे लाख मागणं वेगळं! कामवाल्या बाईला एवढे पैसे कोण देईल?’
तेवढ्यात आहुजा साहेबांची गाडी जाताना तिने पाहिली.
“मर्डर? छे छे! काहीही बोलतायेत मालक.’ विचार झटकून मंदा पुढे चालू लागली.
कामावर वेळेत पोहोचणं गरजेचेच होते. देव बाईंना ऑफिसला जायचं असायचे. थोडाही उशीर चालायचा नाही त्यांना. त्यांची बडबड ऐकण्यापेक्षा त्यांच्याकडच्या चार पोळ्या लाटून मोकळं होणं मंदासाठी सोपं होत. देवबाई मनाने तशा चांगल्या होत्या. मंदाचा पडलेला चेहरा दिसला की, मंदाचे दुखणं ओळखून घ्यायच्या. एखाद्या पेनकिलर सोबत थोडं काही खायला द्यायच्या. अगदी काही नाही तर चहा बिस्किट तरी द्यायच्या.
“का गं मार सहन करतेस त्याचा? खायला काळ अन् भुईला भार आहे तो. तू ही चार फटके देत जा. नाहीतर दे पोलिसात.’ मंदाच्या अंगावर माराचे वळ दिसले की देवबाई म्हणायच्या. आणि मंदा नेहमीच म्हणायची,
“माझं नशीब फुटकं त्याला कोण काय करणार. अन् ताई कसाही असला तरी कुंकू ते. जगण्याचा आधार. चार लोक या कुंकवाकडे बघून दूर राहतात.’
मंदाला देवबाईंचे अन् देवबाईंना मंदाचे बोलणे पटायचे नाही. पण शेवटी दोघी एकमेकींची नड भागवत होत्या, घ्यायच्या सांभाळून एकमेकींना.
“ताई, उशीर तर नाही ना झाला? चार पोळ्या अन् दोन भाकरी टाकू ना नेहमीसारखी.’ मंदाने धुतलेला हात तिथल्या नॅपकिनला पुसत विचारलं अन् कामाला लागली. नेहमीसारखे हात पटापटा चालत होते अन् त्याच्या दुप्पट वेगाने विचार चालू होते. घराचे कसं करायचं अन् काय करायचे? पैसे तर उभे नाही करता येणार, मग काय करायचे? दोन पोरांना घेऊन जायचं तरी कुठे? काय करू? कसं करू? प्रश्न तरी कसले ते, उत्तर न मिळणाऱ्या प्रश्नांची मालिकाच होती ती. कसले कसले विचार तिच्या डोक्यात फेर धरून नाचत होते. माहेरचा आधार तर नव्हता. तसंही आई-वडिलांच्यामागे माहेर उरतच नसता म्हणा. अशा ना ना विचारांनी मंदाला पार भंडावून सोडलं होतं.
मंदाचे काम संपले तसे देवबाई आणि मंदा एकदमच घराबाहेर पडल्या. अजून तीन घरची कामे होती. पण केळकर बाईंकडे आज कसलीशी पूजा होती. शर्माभाभी केळकर मावशींची अगदी जीवलग मैत्रीण. त्यामुळे त्या आज केळकरांकडेच असल्याने शर्माभाभींचे काही काम नव्हते. त्यामुळे आहुजांकडचे काम झाले की मग केळकर मावशींकडे जायचे होते.
आहुजा… लक्ष्मी त्यांच्या घरी जणू पाणी भरत होती. पापाजींनी सुरू केलेला व्यवसाय आहुजा साहेबांनी स्वतःच्या हिमतीवर खूप मोठा केला होता. हां म्हणजे आहुजा अगदी प्रामाणिक होते असे नव्हे; परंतु स्वतःचा फायदा बघताना दुसऱ्याचे नुकसान होत नाही ना याकडे लक्ष असायचे. हे जणू त्यांचे तत्त्वच होते. शिवाय कुबेराचे वास्तव्य असणाऱ्या त्यांच्या घरातील सगळीजण लोकांच्या मदतीला धावून जाणारी. “नानकजीका आशीष है’ “वाहे गुरू की मेहरबानी’ “बस बाकी कुछ नही’ “उपरवालेने दिया है और ये सब वोही हमसे करवाता है’ कोणी त्यांच कौतुक केलं की न चुकता वाहे गुरूच्या चरणी अर्पण करणे हा त्यांचा स्वभाव. मंदालासुद्धा त्यांनी कितीदा तरी मदत केली होती. उलट तिचे कोण कौतुक त्यांना. अशा परिस्थितीमध्येही हातपाय गाळून न जाता झगडते, त्याला तोंड देते याचे.
मंदाला आहुजांकडे जाताना त्यांनी वेळोवेळी केलेली मदत आठवत होती आणि दुसरीकडे नवऱ्याचे बरळणे. क्षणभर मनात एकदम भीती स्पर्शून गेली. आहुजासाहेबांना सांगावे का? सावध करावे का त्यांना? नशेत नवऱ्याने काहीबाही पाऊल उचलले तर? पण लगेचच तिने मनातील विचार झटकून टाकला, दारू पुढे काही सुचायचं नाही मेल्याला. एवढा अंगात दम असता तर ही वेळ थोडीच आली असती आपल्यावर? आज पहिल्यांदाच चार कचकचीत शिव्या नवऱ्याला घालाव्यात असं मंदाला वाटून गेलं. पण शिव्या घालून काय होणार, प्रश्न थोडेच सुटणार होते.
“अरे बेटी! तू तो आज जल्दी आ गयी? अच्छा हो गयों देख जोगी बेटा तुझसे कुछ बात करना चाहता थों’ आहुजासाहेबांच्या या वाक्याने मंदा गडबडलीच. गडबडली कसली खरंतर घाबरलीच. मगाशी आहुजासाहेबांना येताना पाहिले होते, नवऱ्याने काही उद्योग तर केला नाही ना? काही सुचेना तिला. थरथरत्या पायाने ती कशीबशी जोगी साहेबांसमोर गेली.
“काय काम आहे भैय्या?’, मंदाच्या आवाजातील भीती लपत नव्हती.
“अरे बेटी तू डरती क्यों? तुमने तो कुछ नही किया हेैं बल्की हमे तुम्हारी मदद चाहीयें करोगी ना?’
मांजींच्या या वाक्याने मंदाने सुटकेचा निःश्वास टाकला. अजून पिऊन पडलेला दिसतोय या विचाराने कधी नव्हे ते मंदाला हायसे वाटले. पण मग आपली काय मदत हवी असणार? हा प्रश्न मंदाच्या आवाक्याबाहेरचा होता.
“सुनो मंदा, वो सब छोड दे. तुझी घराची काय अडचण आहे सांग बरं?’ आहुजासाहेबांनी अचानक विषय बदलला. सकाळपासून घराच्या विचाराने टेंशनमध्ये असणाऱ्या मंदाला या आपुलकीच्या स्वराने रडू कोसळले. मांजींच्या पाठीवरून फिरणाऱ्या प्रेमळ स्पर्शामुळे तिला भडभडून आले. तिने त्या दोघांसमोर आपलं मन मोकळं केल. अगदी सकाळी नवरा दारूच्या नशेत जे काही बडबडला तेही. विचारांनी थकलेल्या मंदाला मन मोकळं झाल्याने जरा हलकं वाटू लागलं होतं.
“मंदा, सुनों जरा ध्यान देकर सुनों अगर तुम हम लोगों की मदद करोगी ना, तो तेरा ये जो घर का प्रॉब्लेम छुटकी में चला जाएगा’
मंदा न कळून त्या दोघांकडे फक्त टकामका बघत राहिली. आहुजासाहेबांनी पुढं बोलणं सुरू केलं, “मंदा तुला माहीत आहे ना, तुझी भाभी किती नाजूक आहे ते.अजूनसुद्धा काही गोष्टी आहेत. त्यामुळे ती आमच्या बाळाला नाही जन्म देऊ शकणार. म्हणून तुझी मदत हवी आहे आम्हाला.’
मंदाला तर हे सारं माहीत होतं; पण तिला कळत नव्हतं ती कशी काय मदत करू शकणार यामध्ये. आणि हे सगळं तिच्या चेहऱ्यावर दिसत होते. आहुजासाहेबांनी तिच्यासमोर त्या सगळ्यांच्या मनातला प्रस्ताव ठेवला.
“तू आमच्या दोघांच्या बाळाची जन्मदात्री होशील का मंदा? तू मुझे भाई मानती हैं ना? तो “ना’ मत करना प्लीज! तुझ्या घराची अडचण मी सोडवेन. एवढेच नाही तर तुझ्या मुलांच्या शिक्षणाचीही जबाबदारी मी घेतो.’
“मंदा सुनो ना ये बातें हमारे घर को, इस परिवार को संतान मिलेगी और तेरी घर की जो परेशानी है वो भी नही रहेगीें मानोगी ना?’ मांजी डोळ्यात पाणी आणून मंदाची विनवणी करत होत्या.
आणि मंदा सुन्न होऊन डोक्याला हात लावून बसली. “मांजी लोग क्या कहेंगे? थुकेंगे मुझ परें तोंड कसं दाखवू शकेन मी जगाला? आणि असं काही केलं तर, माझा नवरा… तो तर जीवच घेईल माझा.’ भानावर येत मंदा मांजीशी बोलू लागली.
“अगं, आत्ता लगेच काही नको सांगूस. दोन चार दिवस विचार कर. मग सांग आम्हाला. आणि तू काहीही निर्णय घेतला तरी चालेल. हां, पण हो म्हणालीस तर मात्र आमच्यासारखे नशीबवान आम्हीच असू.’ आहुजासाहेबांनी मंदाला दिलासा दिला.
मंदाच्या अस्वस्थतेत तर आता चांगलीच वाढ झाली. सकाळपासून घराच्या प्रश्नाने घेरलं होतं. पण म्हणून या प्रश्नाचे हे असं उत्तर? सोडव रे देवा या मला. या विचारांच्या तंद्रीतच मंदा कशीबशी काम आटोपून घरी पोचली. घरी काय नेहमीचेच चित्र होते. परिस्थितीची जाणीव नसणारी, न कळत्या वयाची मुलं खेळात दंग होती. त्यांना पाहून मंदाच्या चेहऱ्यावर हलकं हसू आलं. पण घरात गेल्यावर नेहमीप्रमाणेच दारूच्या नशेत कोपऱ्यात बरळत पडलेल्या नवऱ्याला पाहून परत मनात खिन्नता दाटून आली.
इतका वेळ कोपऱ्यात पडलेल्या नवऱ्याला, मंदाची चाहूल लागली. धडपडत भिंतींचा आधार घेत तो उठला,
“ए चल, पैसे दे मला’ म्हणत मंदाच्या अंगावर धावला.
“अहो, कुठून देऊ तुम्हाला पैसे? विचार करून डोकं फुटायची वेळ आली आहे माझी. तुम्हाला कळत कसं नाही? घराचा हा प्रश्न समोर आहे. त्याचं काही नाही का तुम्हाला? सारखी दारू… दारू… नासलं आयुष्य माझं त्याने. जरा हातपाय हालवले असते तर गाठीशी चार पैसे नसते का राहिले? निघाला असता ना काहीतरी तोडगा.’
“तू कोण गं मला बोलणारी? अन् तू नाही ना पैसे देणार, तर मग मर्डरच करतो त्या साल्या आहुजाचा’ असं म्हणत त्याने मंदाच्या कमरेत एक जोरदार लाथ घातली. दिवसभराच्या श्रमाने थकलेल्या मंदाच्या डोळ्यासमोर या लाथेने अंधारी आली. खाली पडलेल्या मंदाची पर्वा न करता, तिला परत एकदा लाथाडून तो घराबाहेर पडला.
जरा वेळाने मंदाचे डोळे उघडले तर, भेदरलेले चार डोळे तिच्याकडेच बघत होते. पाठीतून अजूनही कळ येत होती. नवरा तर कधीचाच बाहेर निघून गेला होता. आणि शेजारीही. त्यांच्यासाठी तर काय हा नेहमीचाच तमाशा होता.
दाताखाली ओठ दाबत तिने कशीबशी कळ जिरवली. “कुणाचा तरी जीव घेण्यापेक्षा एखाद्या जीवाला जन्म दिलेला केव्हाही चांगलाच की. निदान माझ्या या लेकरांचे तरी आयुष्य मार्गी लागेल,’ असं पुटपुटत तिने लेकरांना जवळ केले. तिच्या डोळ्यात आता कसला तरी ठाम निश्चय दिसत होता.