– मुकुंद फडके
भारतीय मनोरंजन सृष्टीतील सर्वोच् मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार यावर्षी ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना जाहीर झाला आहे. यानिमित्ताने अभिनय आणि सौंदर्य यांचे अनोखे मिश्रण असलेल्या वहिदा रेहमान यांचा आणि त्यांच्या 60 वर्षांपेक्षा जास्त कालावधीतील अभिनयाचा सन्मान झाला आहे असेच म्हणावे लागेल.
शंभर वर्षांपेक्षा जास्त वर्षांच्या इतिहास असलेल्या भारतीय चित्रपटसृष्टीमध्ये विविध प्रकारचे आणि लक्षणीय योगदान देणाऱ्या कलाकारांचा दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव केला जातो. गेल्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते आणि यावर्षी आशा पारेख यांची सख्खी मैत्रीण आणि समकालीन अभिनेत्री वहिदा रेहमान यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्काराची घोषणा झाली त्याच दिवशी वहिदा रेहमान यांचा सर्वात आवडता सहकलाकार आणि नायक देव आनंद यांची जन्मशताब्दी सुद्धा सुरू झाली होती. वहिदा रेहमान यांच्या पहिल्या हिंदी चित्रपटांमध्ये जो नायक होता त्या नायकाच्या जन्मशताब्दी वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांचा दादासाहेब फाळके पुरस्कार देऊन गौरव झाला ही सर्वात मोठी गोष्ट ठरली. “आज देव आनंद हयात नसले तरी त्यांनी त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा त्यांच्या वाढदिवसादिवशी उलट मला ही भेट दिली,’ अशा शब्दांत वहिदा रेहमान यांनी या योगायोगाचे वर्णन केले आहे, हे विशेष.
सुवर्णयुगाची साक्षीदार
वयाच्या 85व्या वर्षी वहिदा रेहमान यांना हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुग म्हणून ज्या कालावधीचा वर्णन केले जाते. त्या कालावधीतील आघाडीच्या प्रमुख अभिनेत्रींमध्ये नेहमीच वहिदा रेहमान यांचे नाव आघाडीवर घेतले जाते. खरे तर त्यांचा पहिला हिंदी चित्रपट सीआयडी ज्यामध्ये देव आनंद त्यांचा नायक होता पण वहिदा रेहमान यांना मात्र या चित्रपटात व्हॅम्पची म्हणजेच खलनायिकेची भूमिका मिळाली होती वयाच्या 17 व्या वर्षी. त्यांना नायिका किंवा खलनायिका म्हणजे काय असते याबाबत काहीच कल्पना नव्हती पण हिंदी चित्रपटसृष्टीत काम करायला मिळत आहे म्हणून त्यांनी ही भूमिका स्वीकारली आणि ती लोकप्रिय झाली याच भूमिकेच्या आधारे नंतर गुरुदत्तच्या सर्व चित्रपटांमध्ये त्या चमकल्या.
गुरुदत्त यांनी दिली संधी
“सीआयडी’ हा जरी वहिदा रेहमान यांचा पहिला चित्रपट असला तरी त्यांच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात मात्र तेलगू चित्रपटांपासूनच झाली होती वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी एका तेलगू चित्रपटांमध्ये डान्स केला होता. तो डान्स इतका लोकप्रिय झाला होता, की त्या नृत्यामुळे तो चित्रपटही गाजला होता. चित्रपटसृष्टीतील प्रख्यात निर्माता आणि दिग्दर्शक गुरुदत्त काही कामानिमित्त हैदराबाद येथे गेले असता ते एका डिस्ट्रिब्यूटरच्या कार्यालयात बसले होते. तेव्हा त्यांना कार्यालयाच्या बाहेर जरा गोंधळ झालेला दिसला. तेव्हा त्यांनी चौकशी केली असता त्या तेलगू चित्रपटाविषयी माहिती त्यांना मिळाली आणि नवोदित अभिनेत्रीचे नृत्य या चित्रपटांमध्ये खूप गाजले असल्याचे त्यांना सांगण्यात आले नाही. या अभिनेत्रीला म्हणजेच वहिदा रेहमानला हिंदी चित्रपटसृष्टीत संधी द्यावी असे त्यांना वाटले आणि त्यांनी वहिदा रेहमान आणि त्यांच्या आईबरोबर चर्चा केली. त्यानंतर काही महिन्यानंतर मुंबईहून निरोप आल्यानंतर वहिदा रेहमान आणि त्यांची आई मुंबईला गेले आणि मग त्यांना सीआयडी चित्रपटांमध्ये संधी मिळाली.
आधुनिक विचार
वहिदा रेहमान यांचे वडील आणि आई विचाराने आधुनिक होते. वहिदा रेहमान यांचे वडील हे प्रशासकीय अधिकारी होते. ठिकठिकाणी कामानिमित्त त्यांच्या बदल्या होत असत. वहिदा रेहमान साधारण दहा वर्षांच्या असतानाच त्यांनी त्यांना भरतनाट्यम आणि इतर नृत्यकला शिकण्यासाठी क्लासला घातले होते. त्याचवेळी स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर राजगोपालाचारी यांचा हैदराबाद येथे दौरा असताना त्यानिमित काही भारतीय संस्कृतीविषयक कार्यक्रम सादर करावा असे ठरले. तेव्हा वहिदा रेहमान आणि त्यांच्या मोठ्या बहिणीने चक्रवर्ती राजगोपालाचारी यांच्यासमोर एक नृत्य सादर केले. राजगोपालाचारी यांनीसुद्धा त्यांचे कौतुक केले.
स्वतःच्या अटी आणि शर्ती
चित्रपटसृष्टी जे काही मी काम केले ते माझ्या अटी आणि शर्तीवर केले, असे वहिदा रेहमान नेहमीच आपल्या मुलाखतीत सांगत असतात. सीआयडी चित्रपटाचा निर्माता गुरुदत्त आणि मुख्य कलाकार देव आनंद जरी असला तरी दिग्दर्शनाचे काम राज खोसला यांच्याकडे देण्यात आले होते. त्याचा करार करताना वहिदा यांनी थेटपणे दोन अटी घातल्या होत्या. एक म्हणजे माझे नाव बदलायचे नाही आणि दुसरे म्हणजे मला आवडणार नाहीत किंवा कम्फर्टेबल वाटणार नाहीत असे कोणतेही कपडे मी घालणार नाही. या अटींवरून राज खोसला आणि वहिदा यांच्यामध्ये वादविवादही झाला होता. वहिदा रेहमान हे नाव चित्रपटासाठी योग्य नाही व ते खूप मोठे आहे म्हणून एखादे चांगले नाव द्यावे, अशी राज खोसला यांची सूचना होती. पण माझ्या आई-वडिलांनी मला जे नाव दिले आहे ते मी मुळीच बदलणार नाही, अशी भूमिका वयाच्या 17 व्या वर्षी वहिदा रेहमान यांनी घेतली होती. त्यावर राज खोसला आणि वहिदा यांच्यामध्ये मोठा वादही झाला होता. पण गुरुदत्त यांनी मध्यस्थी करून ही दोन्ही कलमे करारामध्ये टाकली आणि वहिदा रेहमान यांना सीआयडी चित्रपटात काम करता आले. पण राज खोसला यांच्यासोबतचा त्यांचा वाद मात्र कायम राहिला.
त्यानंतर “सोलवा साल’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही राज खोसलाच करत होते. या चित्रपटाचा देव आनंद हाच नायक होता. तेव्हासुद्धा आक्षेपार्ह कपडे घालण्यास वहिदा यांनी नकार दिला होता आणि हे नकार देण्यामागे त्यांनी एक लॉजिकल कारणही सांगितले होते. या ठिकाणी कथेची अजिबात मागणी नाही. उलट कथेच्या विरोधात हे कपडे जात आहेत, असे त्यांनी राज खोसला यांना सांगितले होते. त्यावरून राज खोसला आणि त्यांचा मोठा वाद झाला होता आणि त्यांनी वहिदा यांना तुझे हिंदी चित्रपट करियर संपले असे समज असा दम दिला होता. पण तरी तो चित्रपट पूर्ण झाला आणि गाजलाही. त्यानंतर वहिदा यांनी कधीही राज खोसला यांच्यासोबत काम केले नाही.
गाइड चित्रपट
अर्थात जेव्हा देव आनंद “गाइड’ या चित्रपटाची जुळणी करत होता तेव्हा या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीचे दिग्दर्शन सर्वात प्रथम राज खोसला यांच्याकडेच आले होते आणि देव आनंदला नायिका म्हणून वहिदा रेहमान हवी होती. पण दिग्दर्शन राज खोसला करणार असल्यामुळे वहिदा रेहमान यांनी ही चांगली भूमिका करण्यास नकार दिला होता. त्यानंतर काही कारणाने राज खोसला या प्रोजेक्टपासून बाजूला पडले. नंतर हे दिग्दर्शनाचे काम चेतन आनंद यांच्याकडे गेले व त्यांनी सुद्धा बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर देव आनंदचा धाकटा भाऊ विजय आनंद यांच्याकडे गाइड चित्रपटाचे दिग्दर्शन आले. वहिदा रेहमान यांना त्यांच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट भूमिका करता आली. या चित्रपटातील “आज फिर जिने की तमन्ना है…’ हे गीतही लोकप्रिय ठरले.
वहिदा रेहमान यांचा सर्वात आवडता कलाकार देव आनंद हाच होता. देव आनंद सोबत वहिदा रेहमान यांनी सात चित्रपट केले. त्यापैकी पाच चित्रपट तुफान चालले. देव आणि वहिदा यांची केमिस्ट्री वेगळीच होती. सीआयडी चित्रपटाच्या निमित्ताने सर्वात प्रथम जेव्हा वहिदा यांनी त्यांचा उल्लेख देव साहेब असा केला त्यावरून देव आनंदने त्यांना इथे कोणीही साहेब नाही, तुम्ही मला देव असेच म्हणा असे दोन-तीनदा सांगितल्यावर वहिदा त्यांना नंतर आयुष्यभर देव या नावानेच हाक मारू लागल्या. गाइड चित्रपटासाठीसुद्धा वहिदा सर्वात योग्य असल्याचे देव आनंद याने विजय आनंद याना पटवून दिले होते आणि वहिदा रेहमान यांनी या चित्रपटाचे अक्षरशः सोने केले. त्या नेहमीच चोखंदळ पद्धतीने आपल्या भूमिकांची निवड करत होत्या. त्यामुळे कधीही त्या टाइप कास्ट झाल्या नाहीत किंवा एकाच प्रकारच्या भूमिका त्यांनी कधीही केल्या नाहीत.
गुरुदत्तची नायिका
वहिदा रेहमान यांच्या अभिनयाला खरे कोंदण चढले ते गुरुदत्त यांच्या कॅम्पमध्ये. गुरुदत्त यांनी आपल्या अल्पशा कारकिर्दीमध्ये जे उत्कृष्ट चित्रपट निर्माण केले त्या सर्व चित्रपटांची नायिका वहिदा रेहमान हीच होती. क्लासिक समजला जाणारा प्यासा चित्रपट असो किंवा दिग्दर्शकाची करूण कहाणी मांडणारा कागज के फूल असो या चित्रपटांमधील वहिदा रेहमान यांचे काम आजही लक्षात राहते. साहिब, बीबी और गुलाम या चित्रपटांमध्ये मीनाकुमारी सारखी सशक्त अभिनेत्री समोर असतानाही वहिदा यांनी आपल्या अभिनयाची ओळख दाखवून दिली होती. जेव्हा वहिदा स्वतःहून आपल्या आवडत्या चित्रपटांची यादी सांगतात तेव्हा त्यामध्ये गुरुदत्त यांचे सर्व चित्रपट पहिल्या क्रमांकावर असतात. जरी भूमिकेचा विचार करता त्यांची सर्वात आवडती भूमिका गाइड चित्रपटातील असली तरी फक्त चित्रपट म्हणून विचार करताना त्या नेहमीच प्यासा, कागज के फूल आणि साहिब, बीबी और गुलाम या चित्रपटांचे नाव घेतात.
वहिदा यांनी सांगितल्याप्रमाणे गुरुदत्त हे अतिशय वेगळ्या प्रकारचे दिग्दर्शक होते. त्यांच्याकडे नेहमीच कोणत्याही प्रसंगाचा प्लॅन बी तयार असायचा त्यामुळे एखाद्या अभिनेत्याला किंवा अभिनेत्रीला एखादा प्रसंग साकार करणे जमत नसेल तर त्याबाबत कोणतीही आरडाओरड न करता तोच प्रसंग वेगळ्या प्रकारे त्याच ताकदीने कशाप्रकारे साकार करता येऊ शकेल याचा प्लॅन गुरुदत्त यांच्याकडे तयार असायचा. प्यासा चित्रपटामध्ये जेव्हा चित्रपटाचा नायक विजय म्हणजेच गुरुदत्त याच्या निधनाची बातमी पेपरमध्ये येते तेव्हा ती बातमी वाचून वहिदा यांनी जोराने किंकाळी मारावी असे गुरुदत्त यांनी सुचवले होते. पण काही केले तरी वहिदा रेहमान यांच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडत नव्हती पण गुरुदत्त यांच्याकडे या दृश्यासाठी प्लॅन बी तयार असल्यामुळे त्यांनी वहिदा यांना जो पेपर त्या वाचत होत्या त्याचा चोळा मोळा करून तो खाली टाकावा आणि पटकन खाली बसावे असे सुचवले त्यामुळे ते दृश्य तेवढ्याच परिणामकारकपणे पडद्यावर दिसून आले.
अनेक नायकांसोबत अभिनय
वहिदा रेहमान यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये देवआनंद शिवाय दिलीप कुमार, राज कपूर, मनोजकुमार, अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, राजेंद्र कुमार या सर्वच आघाडीच्या अभिनेत्यांसोबत काम केले. राज कपूर यांच्यासोबत त्यांनी तिसरी कसम आणि एक दिल सौ अफसाने हे दोन चित्रपट केले. तिसरी कसम हा चित्रपटही खूप गाजला. त्याच्या शूटिंगच्या निमित्तानेच जेव्हा राज कपूर वहिदा रेहमान आणि सर्व युनिट एका ठिकाणी गेले होते त्यांना रेल्वेने प्रवास करायचा होता. पण एका ठिकाणी रेल्वे थांबली असतानाच मोठ्या प्रमाणात जमाव जमला आणि त्यांनी या कलाकारांना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. राज कपूरने स्वतः बाहेरून सगळ्यांची भेट घेतली तेव्हा लोकांनी वहिदा रेहमान यांना भेटायचे आहे अशी मागणी केली. पण यातील धोका लक्षात घेऊन राज कपूर यांनी त्याला विरोध दर्शवला आणि कोणत्या परिस्थितीत कोणताही महिला कलाकाराला भेटता येणार नाही अशी भूमिका घेतली. त्यामुळे जमाव चिडला आणि त्या रेल्वेवर तुफान दगडफेक करण्यात आली. रेल्वेच्या सगळ्या काचा आणि खिडक्या फोडून टाकण्यात आल्या. ही रेल्वे जेव्हा मुंबईमध्ये पोचली तेव्हा वहिदा रेहमान यांच्या शब्दातच वर्णन करायचे झाल्यास त्या रेल्वेची एक बाजू पूर्णपणे तोडून मोडून गेली होती. खरंतर वहिदा रेहमान यांची तेव्हा आपल्या चाहत्यांना भेटण्याची इच्छा होती पण राज कपूर यांनी आग्रही भूमिका घेतल्यामुळेच जमाव जास्त संताप झाला.
शतकाचा महानायक असलेला अमिताभ बच्चन यांच्या सोबतही वहिदा रेहमान यांनी काही चित्रपट केले आहेत. अमिताभ बच्चन यांनी स्वतः अनेक मुलाखतीमध्ये वहिदा रेहमानही आपली सर्वात आवडती अभिनेत्री असल्याचे सांगितले आहे. केवळ अमिताभ बच्चन नव्हे तर अभिषेक बच्चन यांनी सुद्धा आपली सर्वात आवडती अभिनेत्री वहिदा रेहमान आहे असेच सांगितले आहे.
जीवनसाथी
वहिदा रेहमान यांनी जे अनेक चित्रपट केले त्यापैकी एक चित्रपट म्हणजे “शगुन’ या चित्रपटात त्यांचा नायक होता कमलजीत, हा नंतर त्यांचा वैवाहिक जोडीदार झाला. कमलजीत ऊर्फ शशी रेखी यांना अभिनयाच्या क्षेत्रामध्ये यश मिळाले नाही पण व्यावसायिक क्षेत्रामध्ये मात्र त्यांनी चांगले यश मिळवले होते. अभिनयापासून फारकत घेतल्यानंतर काही वर्षांनंतर त्यांनी वहिदा रेहमान यांना लग्नाची मागणी घातली आणि 1973 मध्ये दोघे विवाहबंधनात अडकले. त्यानंतर काही काळ बेंगलोर येथे स्थायिक झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी डेअरी उद्योग सुरू केला. त्या व्यवसायामध्ये त्यांना चांगले यश मिळाले. एवढेच नाही तर त्याच कालावधीमध्ये भारतीयांसाठी तेव्हा नवा असलेला ब्रेकफास्ट सिरीयलचा उद्योगही वहिदा रेहमान यांनी सुरू केला होता, तो उद्योग आजही सुरू आहे.
सौंदर्य आणि अभिनयाचे मिश्रण
हिंदी चित्रपटसृष्टीत काही अभिनेत्री आपल्या सौंदर्याने लोकप्रिय झाल्या तर काही अभिनेत्री आपल्या अभिनयाने गाजल्या पण वहिदा रहमान यांच्यात सौंदर्य आणि अभिनय याचे अनोखे मिश्रण होते. वहिदा रहमान यांच्या सौंदर्याला सोज्वळपणाचा साज होता ते भडक किंवा उत्तान सौंदर्य नव्हते. या जोडीला त्यांची अभिनयाची शैली सशक्त आणि वेगळी असल्याने पडद्यावरचा त्यांचा वावर सुखद आणि प्रेक्षणीय असायचा. कोणालाही हेवा वाटावा अशा स्त्रीप्रधान भूमिका म्हणूनच वहिदा रेहमान यांना करता आल्या. असे म्हणतात की ससुराल चित्रपटातील “तेरी प्यारी प्यारी सूरत को किसी कि नजर ना लगे, हे प्रसिद्ध गाणे गीतकार हसरत जयपुरी यांनी वहिदा रेहमान यांना डोळ्यासमोर ठेवूनच लिहिले. खरेतर या चित्रपटाची नायिका बी सरोजादेवी एक दाक्षिणात्य अभिनेत्री होती पण तिला डोळ्यासमोर ठेवून हसरत यांना एकही शब्द सुचेना. एकदा सायंकाळी समुद्रावर फिरायला गेले असताना हसरत याना वहिदा रेहमान दिसल्या आणि त्यांना गीताची स्फूर्ती आली. त्यातूनच हे गीत निर्माण झाले, असे सांगितले जाते.
वहिदा रेहमान यांची आणि त्यांच्या सौंदर्याची चर्चा इतकी होती की प्रसिद्ध मराठी लेखक व. पु. काळे यांनी आपल्या एका कथेचे नावच “मीच तुमची वहिदा’ असे ठेवले होते आणि कथेत वहिदा रेहमान यांचे संदर्भही होते.
मैत्री जपणारी अभिनेत्री
खरेतर समकालीन अभिनेत्रींमध्ये सहसा स्पर्धा मत्सर आणि हेवेदावे असतात पण वहिदा रेहमान यांनी मात्र आपल्या समकालीन अभिनेत्रींसोबत जीवाभावाची मैत्री जपली आहे. आशा पारेख, हेलन आणि वहिदा रेहमान यांची मैत्री प्रसिद्ध आहे. यामध्ये अभिनेत्री नंदा यांचेही नाव होते; पण नंदा यांच्या मृत्यूमुळे ती मैत्री तुटली पण आशा पारेख, हेलन आणि वहिदा रेहमान यांची मैत्री आजही कायम आहे. देशात आणि परदेशात एकत्र पर्यटन करून या तिघीही आपली मैत्री उजळून टाकत असतात. इतरांच्या यशाने जळून जाण्याची सवय असलेल्या या क्षेत्रातील हे एक आदर्श उदाहरण मानावे लागेल.
एकूणच वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाल्याने नवीन पिढीलाही एका निखळ सौंदर्याच्या आणि सशक्त अभिनयाच्या कलाकाराची ओळख झाली आहे. प्यासा, गाइड, साहिब बीबी और गुलाम, तिसरी कसम असे अनेक चित्रपट पुनःपुन्हा पाहून या निखळ सौंदर्याचा आणि सशक्त अभिनयाचा पुनःपुन्हा अनुभव घेऊन “आज फिर जिने की तमन्ना हैं…’ असे आपसूक आपल्या ओठांवर शब्द येतील.