– कौस्तुभ अरुण आठल्ये
…दिनकरच्या या वाक्यानं साहेबाचे डोळे लख्ख उघडले. तुकोबांच्या उपदेशाला आपल्यासारख्या सामान्यांनी अंगी बाणवणं अशक्य आहे असं वाटलं होतं, पण या वाक्यानं मात्र साहेबाच्या मनावर लागलेल्या टाळ्याची किल्लीच सापडली.
नदीच्या संथ शांत प्रवाही पाण्याचं रुपडं ज्या गावी आल्यावर पालटून जायचं, त्या गावाचं नाव सोनतळं. कांचनकाया नदीचा उगम सह्याद्रीच्या ज्या कडेकपाऱ्यांतून झाला, तिथल्या एका उंच कड्यावरचा देव, सप्तेश्वर म्हणे सोनतळ्याचा जावई. त्याची पत्नी असलेल्या भवानीमातेची मूर्ती तिकडच्या मंदिराच्या पुजाऱ्यांना एकदा स्वप्नी दिसली. त्यांनी खूप प्रयत्नांनी ती मूर्ती कुठं असावी, याचा छडा लावला नि सप्तेश्वरांशेजारी नेऊन विराजमान केली. म्हणून जेव्हा त्या नदीचं सगळ्या खाबणीखोबणी, सगळे डोंगर उतार, सगळे घाट माथे, सगळ्या सांदीपांदी पार करीत आजोळी येणं होतं, तेव्हा तिचं पाणी खळाळू लागतं. कधी ऊन्हं पिऊन उड्या मारायला लागतं. कधी धुक्याची दुलई ओढून निर्धास्तपणे चिक्कार उशिरापर्यंत निजतं. सांजेच्या लालीचं बोटं गालावर लावून रानफुलांशी गप्पा करतं.
याच नदीच्या काठावरची माती सोनतळ्यातल्या लोकांची लक्ष्मी. त्या लेकुरवाळ्या माऊलीनं इथल्या पिढ्यान्पिढ्यांना पोसलं. कधी साध्या साध्या भाज्यांपासून ते अगदी नगदी पिकांपर्यंत सगळं काही या मातीत रुजलं. पण लोकांच्या घराघरांत सोनतळ्याचं पाणी पोहोचलं, ते इथल्या गर्द जांभळ्या वांग्यामुळं. नदीकाठची सुरेख, कोवळी, ताजी वांगी अक्षरशः रोज ढिगाढिगानं बाजाराला जायची. हळूहळू इथं बाहेरच्या मंडळींनीही जमिनी घेऊन वांगी लावायला सुरुवात केली होती. अशाच एका शेतात काम करायचा दिनकर. दिवसभर आपलंच शेत राखलं, तर उत्पन्न पुरायचं नाही म्हणून वरकमाईसाठी त्यानं एका साहेबाच्या शेतात कुंपणाजवळच्या बंगल्याची निगा राखायची जबाबदारी अंगावर घेतली होती.
गाव तसं पुण्यापासनं फार लांब नव्हतं. साहेब कधीमधी यायचा. लेकराबाळांना घेऊन चार दिवस राहायचा. शहराकडे दुर्मीळ झालेली भाजी भाकरी खायची आहे म्हणायचा, त्याला शेतीतलं काहीच कळत नसे, तरी मित्रांना घेऊन येऊन जमिनीची नि शेतात डोलणाऱ्या वांग्यांची मिजास दाखवायचा, केव्हातरी घोटभर दारू गटाळायचा नि पुन्हा माघारी जायचा. बाकी पूर्णवेळ बंगला बंद. गावातलाच कुणी कष्टाळू, विश्वासपात्र मनुष्य इथं राहावा, म्हणून त्यानं दिनकरला आवारात एक तीन खोल्यांचं लहानसं घरही बांधून दिलं. चांगलं स्लॅबचं. पण दिनकरच्या कुटुंबाचा जीव इकडे रमत नसे. साहेब आला की सगळीजणं कामासाठी म्हणून तेवढी चार दिवस इकडे येत, बाकीवेळ गावातच राहात. दिनकराची कारभारीण, सुनंदा काय हवं नको ते सगळं पाही. सकाळचा चहा, नाश्ता, पाणचुलीचं पाणी, दुपारच्या जेवणात ताज्या वांग्यांची भाजी, गरम भाकऱ्या, पुन्हा संध्याकाळी चहा, कधीमधी मित्रमंडळी जमली असली, तर साहेबाच्या मागणीनुसार एखादं कोंबडं, झणझणीत चवीचं गावाकडचं पाणी दाखवणारं जेवण असं सगळं करे.
दिनकराचा मालक बाकी कितीही निराळ्या सवयी बाळगून असला, तरी माणूस चांगला होता. कधी बेईमानी करून छदाम कमावला नाही. कुणाच्या लेकीबाळींवर वाईट नजर टाकली नाही. कधी कुण्या म्हातार्याकोतार्याला नाडलं नाही. पोराटोरांना बदडलं नाही. देवधर्म अव्हेरला नाही. सगळं साधत राहिला होईल त्या पद्धतीनं. पण साहेबाची संगत फार वेगवेगळ्या प्रकारची. कधी कलाकार मंडळींचे जथ्थे, कधी श्रद्धाळू, पापभिरू, देवदेव करणाऱ्या कुटुंबांची ये-जा, कधी मोठ्या गाड्याघोडे घेऊन फिरणारे कोडगे राजकारणी, तर कधी साहेबाच्याच बरोबरीची पण फार उर्मट वाटावीत अशी चार-सहाजणं.
एकदा असाच साहेबाच्या कुण्या पाहुण्यानं सुनंदेचा हात धरला. साहेब कुठंतरी उभा राहून गप्पा झोडीत होता. त्याच्यापासून ही घटना बऱ्याच अंतरावर घडली. साधीभोळी सुनंदा फार बावरली. किंचाळली. दिनकर लगेच त्या दिशेनं धावला. बायकोचा त्रास पाहताक्षणी याचा हात उगारला गेला. पाहुण्याच्या श्रीमुखात चांगले आठ-दहा महाप्रसाद उमटले. कुणी काही बोलायच्या आत ती दोघंही नि पाहुणाही तिथून निघून गेले. झाला प्रकार दिनकरानं पुढच्या फेरीवेळी साहेबाला सांगितला नि नोकरी सोडत असल्याचं कानावर घातलं. साहेब खजिल झाला. आपल्यामुळं या साध्या गरीब लोकांच्या पदरी नाही ती वेळ का यावी, या भावनेनं पार हिरमुसला. पण रात्री चार घोट गटाळले नि सगळं विसरला. सकाळी नवीन माणसाची व्यवस्था करेपर्यंत थांब इतकंच सांगून शहराकडे परतला. पुन्हा संध्याकाळी एका अशाच कुटुंबाला घेऊन गावात आला. दिनकराकडनं सगळ्या चाव्या ताब्यात घेतल्या. सगळी लहानसहान कामांची यादी नव्या माणसांना सांगायला सांगितली. थोडे पैसे दिले नि वाट धरली.
आता दिनकर स्वतःच्या शेतातली वांगी शहराकडे नेई, कधी चार पैसे अधिक मिळत, कधी चार पैसे कमी. पण समाधानी असे. कुटुंबाची भूक भागवण्याइतकं, चार सणासुदीला हौसमौज करण्यापुरेसं बळ त्यानं एकवटलं होतं. असाच एके दिवशी शहराकडनं वांगी विकून खुशीत परत येता येता भवानीआईच्या देवळापाशी दिनकर थांबला.’
नेहमीप्रमाणं पायावर पाणी घेऊन तो आत गेला. समोर पाहतो तर काय… साहेब देवीच्या गाभाऱ्यासमोर बसलेला. डोळ्यातनं घळाघळा पाणी.
न राहवून दिनकरनं साहेबाला विचारलं, “काय झालं?’
“एक मोठ्ठं कॉन्ट्रॅक्ट हातचं गेलं. चिक्कार कर्ज काढून बसलो आहे. कामात काहीही कसूर केली नाही. तिसऱ्याच कुणाच्या चुकीचा फटका आपल्याला मिळाला. कायमचा कर्जबाजारी होऊन बसलो ते निराळंच. लोकांच्या राजकारणापायी माझा बळी गेला रे!’
“साहेब एका पराभवानं हिंमत हरायची असते व्हय?’ दिनकरनं विचारलं.
“हा पराभव खूप मोठा आहे. यातून वर यावं तरी कसं?’
“का? पदरी पैसे आहेत नव्हं? का संपले?’
“आहेत की. इस्टेटही आहे चिकार!’
“मग हो? नवीन काम मिळंल की.’
“पण त्यात वेळ जाईल. खूप काही अगदी सहज हाताशी येईलसं वाटलं होतं. अचानक हा घाव. आता पुन्हा शून्यातून सुरुवात केल्यासारखं आहे.’
“म्हणून घाबरालाय का काय मालक?’
“घाबरत नाही रे. पण माणूस आहे ना शेवटी. इच्छाआकांक्षांच्या फांद्या छाटून टाकल्या जातात अवेळी आलेल्या वाऱ्यापायी नि आपण मात्र काहीही करू शकत नाही.’
“यालाच जिंदगी म्हणतात ना हो!’
“कशाला? या सततच्या अशाश्वततेला?’
“तर काय!’
“मग समाधान कधी गवसायचं?’
“गवसायला त्ये काय कुणी लपविलेलं हाय का काय जी?’
“म्हणजे अहो, आपल्याला तुमच्याइतकं शिकायला घावलं नाय, पण वारी न चुकता केली. तुकोबांच्या नि माऊलींच्या शाळंत येकामागनं येक चिक्कार यत्ता शिकलो. त्येंचा शब्द प्रमाण मानायचा, तर गणित सोप्पं हाय बगा…’
“जरा कळंल असं बोलतोस का दिनकरा?’
“म्हणजे तुकोबांनी गाथेत लिहून ठेवलंया की,
चित्त समाधानें ।
तरी विष वाटे सोनें ।।
आणि
मनाच्या तळमळें ।
चंदनें ही अंग पोळे ।।
तुमीच ठरवलायसा की ह्योच माझा शेवट. यातनं वर यायला जमायचं नाय. तुमी येखांद्यावेळी उलट्या बाजूला वळून बगा तरी. लई शिकल्यामुळं तुमाला मोट्या लोकांना नजर पार वावरापल्याड नेताच येत नाय. आभाळाकडं बगा. पानी त्येच देतंय. वावर हायेच ना व्हं गाठीला? नाही लागली वांगी. फुलकोबी लावा. नाही रुजली कपाशी, तर मका, बाजरी काढा. दुबारपेरणीला घाबराय लागलात तर उगवायचं कसं हो?’
“इतकं सोप्पं असतं आयुष्य?’ साहेबानं दिनकरला विचारलं.
“सोप्पं कायच नसतं हो. तुमी आमीच काय, माऊलीचं आविष्यबी सोप्पं नव्हतं. बारा वर्षांचं पोरगं हो. लोकांनी झोळीत श्याण टाकलं दारावर आल्यावर. आई-बाप न्हाईतच. पदरी दोन धाकली भावंडं. त्ये असे देवापुढं यिऊन बसून ऱ्हाले असते, तर भागलं असतं काय? हरीपाठ कुणी लिवला असता मंग?’
“सगळेच ज्ञानेश्वर नसतात रे पण. आपण तर नाहीच नाही.’
“अहो म्हणूनच आपल्या वाट्याला तेवढी मोठी दुःखबी येत नसतात मालक. जी येतात तीच पार डोंगराएवढी करून घेतो आपली आपुणच.’
“मग काय करू म्हणतोस?’
“काय करता? जमीनजुमला विकाय लागला, तरी मागंपुढं बगू नका. पाय रोवून उभारा येकदाच. हरून गेलात तर दुनिया काय वाटच बघतिया कवा तुमाला नाडता येतंय याची.’
“कष्टानं कमावलेलं सारं काही हातचं जातं, तेव्हा दुःख तर वाटणारच.’
“वाटायचंच हो… पण हे दुःख म्हंजी शेवट नव्हं, सुरुवात हाय इतकंच ठरवून घ्या की!’
दिनकरच्या या वाक्यानं साहेबाचे डोळे लख्ख उघडले. तुकोबांच्या उपदेशाला आपल्यासारख्या सामान्यांनी अंगी बाणवणं अशक्य आहे असं वाटलं होतं, पण या वाक्यानं मात्र साहेबाच्या मनावर लागलेल्या टाळ्याची किल्लीच सापडली. साहेब आणि दिनकर दोघंही देवळाबाहेर आले.
साहेबानं दिनकरला विचारलं,
“इतकं सहजसोप्पं कसं काय वाटतं तुला आयुष्य?’
“न्हाई हो. सोप्पं न्हाई वाटत. कठीण हाये. पण एक दिवस ना या डोळ्यांवरच्या पापण्या उघडायचीबी ताकद ऱ्हात नाय म्हणतात देहात. त्यो दिवस येत नाय, तोवर काय काळजी करायची नाय; इतकं मात्र पक्कं झालंय डोक्यात.’
दिनकरसारख्या अगणित तत्त्वज्ञानाच्या विहिरींवाचून साहेबासारखे कितीतरी जीव तहानेनं व्याकूळ आहेत आज आपल्यात. कांचनकायेसारख्याच सुखांच्या नदीकाठी वस्ती करून राहिले, तरी त्यांना समाधानाचं वारं गवसत नाही. या दिवाळीत आपल्या घरासमोर तेवणारा दिवा असाच साधासोपा, पण जीवनाचं रहस्य उलगडणाऱ्या ज्ञानाचा ठरो हीच सदिच्छा!