मुंबई :- राज्यातील पावसाळी अधिवेशनाला सुरूवात झाली असून शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत झालेल्या बंडखोरीनंतर सभागृहातील संख्याबळाचे आकडे बदलले आहे. विरोधी बाकांवर ज्या पक्षाचे संख्याबळ सर्वाधिक, त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता बनतो. सध्या कॉंग्रेसकडे संख्याबळ सर्वाधिक असल्याने विधानसभेत कॉंग्रेसचाच विरोधी पक्षनेता होणार असल्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. कॉंग्रेसकडून लवकरच विरोधी पक्षनेतापदी नावाची घोषणा करण्यात येणार आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेचे अधिवेशन सुरू होऊन चार दिवस उलटले असले तरी विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाचा पेच कायम असल्याने त्यावर तातडीने निर्णय घेण्यात आला आहे. सध्या 44 जागा असलेला कॉंग्रेस पक्ष हाच सर्वाधिक संख्या असलेला विरोधी पक्ष आहे.
विरोधी पक्षनेता हा विरोधी बाकावरच्या सर्व पक्षांचे प्रतिनिधित्व करत असतो. देशाच्या संसदेत एकूण संख्याबळाच्या एकदशांश तरी संख्या पूर्ण करणारे पक्ष या पदावर दावा करु शकतात, अशी अट आहे. त्यात सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्षाला हे पद मिळते.
विरोधी पक्षनेतेपदाचे दावेदार?
कॉंग्रेसमध्ये नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, संग्राम थोपटे यांची या पदासाठी चर्चा आहे. नाना पटोले हे सध्या प्रदेशाध्यक्ष आहेत. प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांच्या बदलांची चर्चा थंडावलेली असतानाच आता या नव्या पदावर त्यांची वर्णी लागणार का हा प्रश्नच आहे.
दुसरीकडे संग्राम थोपटे यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत असताना शेवटच्या क्षणी हुकलेले होते. यामुळे आता या संधीसाठी आपला विचार व्हावा यासाठी त्यांनी अध्यक्षांना पत्र लिहिले आहे. याशिवाय विरोधी पक्षनेता देताना ज्येष्ठांचा विचार होणार का तरुण नेतृत्वाला कॉंग्रेस संधी देणार हेही पाहावे लागेल.