श्रीगोंदा -‘लॉकडाऊनच्या आधी ठरलं पण कोरोनामुळे घोडं अडलं..’ मुहूर्त मिळाला, हात पिवळे होण्याची आतुरता, घरात लगीनघाई, मोठ्या उत्साहाचे अन् आनंदाचे वातावरण, कुटुंबीयांसाठी उत्सवाचा क्षण, पण कोरोना आला अन् या सगळ्या आनंदावर विरजण पडले, असा बाका प्रसंग आला तो लग्न ठरलेल्या नियोजित वधू-वरांवर. श्रीगोंदा तालुक्यातील नियोजित शेकडो लग्नसमारंभ स्थगित झाले आहेत.
लॉकडाऊनमुळे सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. यात सर्वाधिक हिरमोड झाला तो लग्नतिथी काढलेल्या नियोजित वधू-वरांच्या कुटुंबीयांचा. लग्न तिथीच्या काळात लॉकडाऊन आला. त्यामुळे लग्नविधी स्थगित झाले. त्यासाठी केलेली सर्व तयारी धुळीस मिळाली.
शहरात सुमारे सात मंगल कार्यालये, एक सांस्कृतिक हॉल आहे. जवळजवळ 150 लग्नसोहळ्यांसाठी ही मंगल कार्यालये बुक झाली होती. मात्र हे सर्व लग्नसोहळे रद्द झाल्याने सर्वांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. शिवाय बाहेरगावी, दारापुढे, शाळेत, अन्यत्र प्रांगणात होणारे लग्न वेगळेच. हे सर्व नियोजित लग्नसोहळे पुढे गेले आहेत. शिवाय सोशल डिस्टन्सिंग अजून काही दिवस पाळावे लागणार आहे. त्यामुळे स्थगित झालेले लग्नसोहळे नेमके कधी होणार, याचा अंदाज दोन्ही पक्षांना लावता येत नाही.
एका कार्यालयाचे 15 लाखांचे नुकसान : गोरे
एका मंगल कार्यालयाचा लग्नसराईचा टर्नओव्हर 15 लाखांच्या आसपास होतो. लग्न साहित्य व कार्यक्रमाशी निगडित लहान-मोठ्या व्यावसायिकांना याचा फटका बसला आहे. मंडप, बॅंड पथकातील कलाकार, कापड दुकानदार, आचारी, फोटोग्राफर, फुलविक्रेते, केटरिंग कामे करणारे मुले, डेकोरेटर्स, पार्लर, फटाके विक्रेते, घोडा मालक, इलेक्ट्रॉनिक दुकाने, फर्निचर विक्रेते, भांडी दुकानदार, ज्वेलर्स, प्रिंटिंग प्रेस या दुकानदारांसह अनेक गरीब कामगार व छोटे-मोठे व्यवसायिक यांचे पूर्ण वर्षाचे अंदाजपत्रक कोलमडले आहे
प्रशांत गोरे , (लॉन्स चालक, श्रीगोंदा)