बीड – वीषबाधा होऊन तीन मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याची मन हेलावणारी घटना अंबाजोगाई तालुक्यातील बागझरी येथे घडली आहे. साधना (वय 6), श्रावणी (वय4), नारायण (8 महिने) अशी मृत्यू पावलेल्या चिमुकल्यांची नावे आहेत. तर आई भाग्यश्री धारासुरे या अत्यवस्थ असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शुक्रवारी रात्री आई व मुले एकत्र जेवली मात्र मुले सकाळी उठलीच नाहीत. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री काशीनाथ धारासुरे यांची पत्नी आणि मुले यांनी एकत्र जेवण केले. मुलांना अंडी खायची असल्याने भाग्यश्री यांनी तीनही मुलांना अंड्याच्या पोळा बनवून दिल्या. त्यानंतर रात्री हे सर्वजण झोपी गेले. पण सकाळी चौघांनाही अत्यवस्त वाटू लागले. काही वेळातच तीनही मुलांचा एकामागोमाग एक मृत्यू झाला.
आसपासच्या लोकांनी या चौघांनाही रुग्णालयात दाखल केले, पण त्याआधीच तीनही मुलांचा मृत्यू झाला होता. तर या मुलांची आई मृत्यूशी झुंज देतेय. अंबाजोगाईतील स्वाती रामानंद तीर्थ रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु आहेत. या मुलांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होईल, मात्र वीषबाधा झाल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.