भाटघर धरण परिसरात महावितरणचा कारभार : थंडीत शेतकऱ्यांची कसरत
भाटघर – येथील परिसरातील गावांना पसुरे फीडरमार्फत वीज पुरवठा केला जात आहे, तर शेती पाणी सिंचनासाठी वेल्हा फीडरमार्फत वीज पुरवली जात आहे. ही वीज आठवड्यातून चार दिवस दिवसा, तर तीन दिवस रात्रीच्या वेळी साडेदहानंतर असते. पाणी सिंचन योजना काही सदस्य एकत्र येऊन राबवली जाते.
या पथकामधील सदस्यांना क्रमवारीने शेतीसाठी पाणी घ्यावे लागते. रात्री वीज असेल त्या रात्री ज्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी नंबर असेल त्याला रात्री साडेदहानंतर पाणी घेण्यासाठी शेतात उतरावे लागत आहे. कडाक्याची थंडीही रात्री जागरण करून अंधारात पिकांना पाणी द्यावे लागत आहे.
भाटघर (ता. भोर) येथील परिसरात यावर्षी पावसाळा अधिक काळ असल्याने हिवाळा सुरू होण्यास उशीर झाला. गेल्या पाच-सहा दिवसांपासून परिसरात सकाळी आठ ते नऊपर्यंत धुके पसरत असून, हवेमध्ये गारवा निर्माण झाला आहे. यामुळे खेडेगावांत ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्याचे चित्र दिसत आहे.
परिसरातील नागरिक सकाळी व संध्याकाळी जेवण आटोपल्यानंतर शेकोट्या पेटवून थंडीपासून बचाव करीत आहेत. कंपनीतील रात्रपाळीचे सेक्युरिटी गेटच्या बाहेर येऊन शेकोट्या पेटवत आहेत; परंतु शेतकरी वर्गाला दिवसा विजेचा अभाव असल्याने रात्री-अपरात्री शेतातील पिकांना पाणी द्यावे लागत आहे.