शिवसेनेची सामानातून भाजपवर खोचक टीका
मुंबई : राज्यात महाविकास आघाडीची सत्ता येवून आता एक महिना उलटून गेला आहे. परंतू, शिवसेना आणि भाजप यांच्यातील शाब्दिक आणि शीत युद्घ काही केल्या थांबत नाही. त्यातच शिवसेनेच्या सामानामधून रोज भाजपवर टीका केली जात आहे. आजही शिवसेनेने भाजपवर निशाणा साधला आहे. सरकार पडेल आणि आपण पुन्हा सत्तेत येऊ असे विरोधी पक्षाला वाटत असते. मेहक प्रभू या मुलीने झळकविलेल्या फ्री कश्मीर फलकाबाबतही विरोधी पक्षनेत्यांनी सारासार विचार न करता सरकारवर टीका केली आणि नंतर मेहक प्रभूने नेमके काय केले, हे स्पष्ट झाल्यावर ते तोंडावर आपटले. विरोधी पक्षाने प्रतिष्ठा गमावणे, स्वतःची विश्वासार्हता घालवून बसणे महाराष्ट्राला परवडणारे नाही. आम्हाला विरोधी पक्षाची काळजी वाटते असे म्हणत विरोधी पक्षाला समुपदेशनाची गरज असल्याची टीका शिवसेनेनं भाजपावर केली आहे.
महाराष्ट्रातील विरोधी पक्ष रोज स्वतःचे हसे करून घेत आहे याचे आम्हाला अतीव दुःख होत आहे. विरोधी पक्षाचे इतके अधःपतन किंवा बेइज्जती गेल्या पन्नास वर्षांत कधीच झाली नव्हती, पण माजी मुख्यमंत्री फडणवीस हे जेव्हापासून विरोधी पक्षनेतेपदावर विराजमान झाले आहेत तेव्हापासून विरोधी पक्ष दिशाहीन आणि भरकटलेला झाला आहे. लोकशाहीसाठी हे चित्र चांगले नाही, असे म्हणत शिवसेनेने फडणवीसांवरही निशाणा साधला. शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
सामनातील काही मुद्दे……
फडणवीस सत्ताधाऱ्यांवर रोज एक भंपक, बिनबुडाचा आरोप करतात व नंतर तोंडावर आपटतात याचे आमच्याइतके वाईट कुणालाच वाटत नसेल. नागरिकता सुधारणा कायदा व जेएनयूतील निर्घृण हल्ला प्रकरणानंतर देशभरातील तरुण वर्ग संतापून रस्त्यावर उतरला आहे. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोर तरुणांनी आंदोलन, धरणे वगैरे धरली. त्यात एका मुलीच्या हातात फ्री कश्मीर असा कागदी फलक घेतलेला फोटो प्रसिद्ध झाला. यावर विरोधी पक्षनेत्यांना धक्का बसला. त्यांच्यातला राष्ट्रभक्त उसळला व त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकारलाच धारेवर धरले. काय तर म्हणे, पहा, पहा, उद्धव ठाकरे यांच्या नाकासमोर कश्मीरातून फुटून निघण्याचे फलक नाचवले जात आहेत. हा देशद्रोह मुख्यमंत्री ठाकरे यांना मान्य आहे काय?वगैरे वगैरे वगैरे. विरोधी पक्षनेत्यांच्या सुरात सूर मिसळण्यास इतर भगतगणही पुढे आले, पण त्यांचा हा आरोप म्हणजे भंपकपणाचा कळसच ठरला.
ज्या मुलीने फ्री कश्मीरचा फलक झळकवला ती मुलगीच तासाभरात वृत्तवाहिनीच्या कॅमेऱ्यासमोर आली व तिने विरोधी पक्षाच्या ढोंगाचा बुरखाच फाडला. मुळात ही मुलगी मुसलमान किंवा कश्मिरी नव्हती. शुद्ध मराठीत तिने आपले नाव मेहक प्रभू असे सांगितले. त्यामुळे पहिल्या फटक्यातच भगतगण कोलमडले. मेहक असे म्हणाली की, जेएनयूतील विद्यार्थ्यांवरील हल्ले पाहून मी अस्वस्थ झाले व एका कर्तव्यभावनेने गेट वे ऑफ इंडियासमोरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले. ही माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. आंदोलनाच्या ठिकाणी अनेक फलक पडले होते. त्यातला एक फलक उचलून मी कॅमेऱयासमोर झळकवला. त्यावर फ्री कश्मीरचा उल्लेख होता. माझ्या दृष्टीने फ्री कश्मीर म्हणजे देशातून फुटून निघणे असा होत नाही, तर आज कश्मीरच्या नागरिकांवर जी बंधने लादली आहेत, त्यांना देशापासून तोडले आहे.
कश्मिरी जनतेची वेदना एका मुंबईकर मराठी मुलीने मूकपणे मांडली. यावर विरोधी पक्ष म्हणतो हा देशद्रोहच आहे. विरोधी पक्षाच्या बेजबाबदारपणाचे यापेक्षा घाणेरडे उदाहरण दुसरे नसेल. देशाचा जो नागरिक निर्भयपणे भावना व्यक्त करील तो देशद्रोही, असा प्रचार मोदी-शहांचे भगतगण करीत असतील तर ते स्वतःबरोबरच देशासाठी खड्डा खणत आहेत. फडणवीस यांच्या काळजात घुसलेला बाण व त्यानंतरची वेदना आम्ही समजू शकतो. तरीही त्यांनी त्या वेदनेवर संयमाचा बाम चोळून काही काळ शांत राहायला हवे. त्यांनी एक लक्षात घेतले पाहिजे की, असे भन्नाट आरोप करून ठाकरे सरकार पडणार नाही. उलट तीन पक्ष अधिक घट्ट होतील. हे सर्व करण्यापेक्षा त्यांनी विरोधी पक्षाची जबाबदारी व कर्तव्य अशा विषयांवर रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये मार्गदर्शन शिबीर आयोजित करून त्यात सहभागी व्हायला हवे. ज्याला कौन्सिलिंग म्हणतात अशा समुपदेशनाची आज विरोधी पक्षाला गरज आहे; कारण रोज त्यांना वाटते की, सरकार पडेल व आपण पुन्हा येऊ!