कांदा मुळा भाजी। अवघी विठाई माझी।। हे उद्गार आहेत पहिल्या वारकरी शेतकरी संताचे. वारकरी संप्रदायातील कर्मयोगाचा पहिला आदर्श असलेल्या संत सावता माळी यांचे! जे देवाला भेटायला गेले नाही, तर देवच त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या शेतात आला. त्यांचा कार्यकाल इ. स. 1250 ते 1295. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी लक्षात घेणे औचित्याचे ठरावे. त्यांच्या पूर्वजांचे मूळ गाव मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील दुष्काळी भाग औसा. त्यांचे आजोबा दैव हे पंढरपूरला वारीला येत. पंढरपूरपासून 35 कि.मी. अंतरावर असणारे अरणगाव त्यांना सुपीक वाटले. ते त्या ठिकाणी स्थायिक झाले. हीच सावता माळी यांची कर्मभूमी.
“साव’ या शब्दाचा अर्थ सज्जन, गरीब त्याचेच अपभ्रष्ट रूप झाले “सावता’. घरच्या लोकांचा विरोध पत्करून त्यांनी शेतात असणारा म्हसोबाचा दगड उचलून शेताच्या बांधावर आणला. कारण, त्यामुळे शेती करण्यात अडथळा येत होता. अंधश्रद्धा निर्मूलनामुळे ते महात्मा फुले यांचे पूर्वज शोभतात. ते पंढरीजवळ असूनही वारीला फारसे गेले नाहीत. कारण आषाढीवारीच्या वेळेसच शेतीची कामे असत. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीतून जो कर्मयोग प्रतिपादन केला त्याचे तंतोतंत पालन सावता महाराजांकडून घडले. वारकरी संप्रदायातील संतांनी अभंगातून आपल्या जातीचा अभिमानाने उल्लेख केला.त्यात अभिनिवेश नव्हता. आपल्या जातीच्या व्यवसायावर रूपक रचले. “”भली केली हीन याती। नाही वाढली महती।।” अशा उक्तीमधून त्यांच्या मनाचा समतोलपणा दिसून येतो.
भक्तीच्या बळावर हे त्यांना शक्य झाले. विठ्ठलाच्या नामस्मरणाने आपले व्यवसायातील कष्ट, श्रम हे क्लेशदायक न ठरता आनंददायी ठरतात. ही त्यांची धारणा महत्त्वाची आहे. संसार करता करता “वाचे वसो सदा हरीचे नाम’ असे सावता महाराज अभंगातून प्रतिपादन करतात. यांचे व्यावहारिक मार्गदर्शन मोलाचे आहे. त्यांचे हे विचारदर्शन एका श्रेष्ठ भक्ताचे प्रकट चिंतन आहे. परमार्थाच्या भूमिकेवरून त्यांनी ऐहिक जीवनाकडे पाहिले आहे. जातिभेदाचा विचार मनातही आणू नये.
परमार्थाच्या प्रांतात जातपात नसते. देवाच्या दारात माणूस हा इथून तिथून एक आहे, समान आहे. देव फक्त शुद्ध भावाचा भुकेला आहे. ओहोळ गंगेला मिळाल्यावर त्याची मागील अवस्था विचारू नये. अस्वच्छ जमिनीवर तुळस उगवली तरी ती तुळस अपवित्र मानू नये. विठ्ठलासी एकरूप झालेल्या संताला जातीची उपमा देऊ नये. जनांमध्ये जनार्दनाला पाहावे. विठ्ठलभक्ती ही स्वतंत्र जीवननिष्ठा आहे, देवाला वश करणे, हीच त्यांच्या मते भक्तीची खरी कसोटी आहे.