मंदिरे अनलॉकबाबत प्रशासन दक्ष : नियमावलीच्या प्रतिक्षेत नागरिक
– राहुल गणगे
पुणे – लॉकडाऊनच्या काळात लॉक झालेली धार्मिक स्थळे लवकरच अनलॉक होणार आहेत. मंदिरं लवकरच भविकांसाठी खुली होण्याचे संकेत आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळे दर्शनासाठी उघडली जाणार आहेत. कोविड रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, सुरुवातीचे काही दिवस भक्तांना थेट गाभाऱ्यात प्रवेश देता येणे शक्य नाही. याबाबतही देवस्थान प्रशासनाचा विचार सुरू आहे.नागरिक, भाविकांना शासन आणि मंदिर व्यवस्थापनाच्या काटेकोर नियमांचे पालन करुनच देवदर्शन घ्यावे लागणार आहे. दर्शनासाठी भक्तांच्या संख्येवरही मर्यादा असणार आहेत.
करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. अजूनही करोनावर कोणतीही लस उपलब्ध नाही. लॉकडाऊनमुळे राज्यातील अर्थकारण पुर्णतः कोलमडले आहे. त्यामुळे अर्थिक घडी पुन्हा बसवण्यासाठी आता येत्या नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्र अनलॉक होणार आहे. पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे खुली होणार आहेत. त्याबाबत सरकारची काय नियमावली असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे व व्यायामशाळा उघडण्यासंदर्भात राज्य सरकार आता अनुकूल आहे. त्याची नियमावली ठरविण्यात येत असुन टप्प्याटप्प्याने ते सुरू करण्याची परवानगी देण्यात येणार आहे.
पुणे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धार्मिक, पर्यटन स्थळे आहेत. या धार्मिक, पर्यटन स्थळांवर अनेक नागरिकांचा उदरनिर्वाह चालत आहे. आत्ता नवरात्रौत्सव, दसरा सण तोंडावर आला आहे. या कालावधीमध्येही अनेक फुल, फळे व्यवसायिकांचा उदरनिर्वाह होत असतो. परंतु राज्य सरकारने नवरात्रौत्सव घरातच साजरा करण्याबाबत सुचना केल्या आहे. त्यामुळे याचा फटकाही अनेक नागरिकांना बसणार आहे.
जिल्ह्यात मोरगाव, रांजणगाव, थेऊर, सिद्धटेक, ओझर, लेण्याद्री, जेजुरी यासारखी अनेक धार्मिक स्थळे आहेत. या ठिकाणच्या देवस्थान प्रशासनाने विविध उपाययोजना करण्यास सुरवात केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक, भाविकांसाठी सोशल डिस्टन्सिंग मार्कींग, सॅनिटायझर, सुरक्षारक्षक, तसेच सरकार जा नियमावली जाहीर करणार आहे.
दर्शनासाठी मंदिरात प्रवेश करणाऱ्या भक्तांना मास्कची सक्ती असेल. आत प्रवेश करणाऱ्या सर्वांचे थर्मल टेस्टिंग होईल. सॅनिटायझरचा वापर केला जाईल. मंदिरात पूजेसाठी घेऊन जाणाऱ्या खण, ओटी साहीत्यावरही निर्बंध असतील. करोना रुग्णांची वाढणारी संख्या आणि राज्यात सुरु असलेली बिकट परिस्थिती यामुळे महाराष्ट्र शासनाने अद्याप मंदिरे अनलॉक केलेली नाहीत. पण
अशी घ्या काळजी –
1) दर्शनासाठी घोळक्यानी येण्याचे टाळा
2) शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करा
3) मंदिर परिसरात विनाकारण गर्दी करु नका
4) सोशल डिस्टन्सिंगचे नियमित पालन करा
5) आजारी, लक्षणे असणाऱ्यांनी गर्दीच्या ठिकाणी येऊ नये.
नागरिकांना मास्क असल्याशिवाय मंदिरात प्रवेश दिला झाणार नाही. मंदिर समितीने केलेल्या नियमांचे तंतोतंत पालन करावे, मंदीर परिसरात सॅनिटायझर करण्यात येणार आहे. सोशल डिस्टन्सिंगबाबतही मार्कींग करण्यात येत आहे. या नियमावलीचा सुरवातीस त्रास जाणवेल परंतु आपण, आपले कुटुंब व गावाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था, स्वच्छतेवर अधिक भर देण्यात येणार आहे. यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे.
– नारायण पाचुंदकर, विश्वस्त रांजणगाव गणपती.