पुणे – देशातील सर्व आयुध निर्माणी कारखान्यांचे कंपनीकरण म्हणजेच कॉर्पोरेटायझेशन होणारच. मात्र, कर्मचाऱ्यांच्या अधिकारावर यामुळे कोणतीही गदा येणार नाही, त्यांचे हित नक्कीच जोपासले जाईल, अशी ग्वाही संरक्षण मंत्रालय समितीने दिली.
या कंपनीकरणाला कर्मचारी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. नाराज कारखाना कर्मचाऱ्यांनी 12 ऑक्टोबरपासून बेमुदत संप पुकारला होता. या संपाबाबत संरक्षण क्षेत्रातून सातत्याने चिंता व्यक्त होत होती.
यासंदर्भात चर्चा करण्यासाठी संरक्षण मंत्रालयातर्फे कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी आणि सह-सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या पाच तासांच्या बैठकीनंतर कर्मचारी संघटनांनी 12 ऑक्टोबरपासून पुकारलेला संप स्थगित करण्याचा निर्णय घेतला.