आ. शंभूराज देसाई यांचा घणाघात
सणबूर – पाटण मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा विकास केला आहे. ते केवळ पोकळ आकडे नाहीत. म्हणूनच पाटण मतदारसंघात विकासाचा डोंगर उभा राहिला आहे. विरोरोधकांना हे जर उघड्या डोळ्यांनी दिसत नसेल तर त्यांच्या बोटाला धरुन मतदारसंघातील विकासकामे दाखविण्याची आपली हिंमत असल्याचा घणाघात आमदार शंभूराज देसाई यांनी केला.
सुपने मंडलातील सुपने व तांबवे येथील जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी जि. प. सदस्य प्रदीप पाटील, माजी बाजार समिती सदस्य प्रकाशराव पाटील, शिवदौलत बॅंकेचे चेअरमन मिलिंद पाटील, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन हणमंतराव चव्हाण, प्रभाकर शिंदे, रयत कारखान्याचे माजी संचालक शिवाजीराव गायकवाड, बबनराव शिंदे, कोयना बॅंकेचे संचालक अविनाश पाटील, खरेदी विक्री संघाचे माजी संचालक श्रीमंत काटकर, शिवाजीराव शिंदे, तुकाराम डुबल, हणंमत निकम, डॉ. पांडूरंग निकम, लक्ष्मण देसाई, संदीप सावंत, आनंदराव कदम, अनिल कदम, सुनिल पाटील, माणिकराव सूर्यवंशी, सचिन पाटील, नेहरु बापू, अशोकराव माने, संदीप साळुंखे, अर्जुन कळंबे, अमित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
आमदार देसाई म्हणाले, सुपने मंडल हे पाटण मतदारसंघाला जोडून 10 वर्षाचा काळ लोटला. लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी सुपने मंडलातील पुनर्वसनासाठी आपले आयुष्य वेचले. त्यामुळे सुपने मंडल आणि देसाई घराणे यांचे जवळचे ऋणानुबंध आहेत. या विभागाचे नेतृत्व यापूर्वी कराड दक्षिणचे माजी आमदार विलासराव पाटील हे करीत होते.
सुपने मंडलात गाव तेथे विकास ही संकल्पना राबवून आम्ही गेल्या पाच वर्षात या विभागातील जनतेची विकासाची भूक भागविण्याचा प्रयत्न केला आहे. उर्वरित विकासाचा बॅकलॉग आगामी काळात भरुन काढणार आहे. मागील निवडणूकीपेक्षा यावेळी मला जादाचे मताधिक्क्य द्यावे. सुपने मंडलात विकासाचा हा झंझावात असाच कायम सुरु ठेवणार आहे. मात्र उलट सुपने मंडलाने गेल्या दोन विधानसभा निवडणूकीत पाटणच्या माजी आमदारांना मतदान केले. केलेल्या मतदानाच्या बदल्यात माजी आमदारांनी या विभागाला किती विकासाची कामे दिली? असा सवाल केला.
गेल्या पाच वर्षात युतीच्या शासनाने कोट्यावधी रुपयांचा निधी मतदारसंघातील विकास कामांसाठी दिला. त्या निधीतील बहूतांशी वाटा सुपने मंडलामध्ये देण्याचा मी प्रयत्न केला. विकासाचे काम करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी ठाम उभे राहण्याची परंपरा या विभागाला आहे. तीच परंपरा या विभागाने कायमस्वरुपी जपावी. या विभागातील समस्या जाणून घेण्यासाठी आपण या विभागाचा स्वतंत्र जनता दरबार घेतला. यापुढील काळातही मतदारसंघाचा विकास आणखीन गतीने करण्यासाठी मला पाठबळ द्यावे. तसेच महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनाही माझ्या बरोबरीने मतदान करावे, असेही आवाहन देसाई यांनी मतदारांना
केले.
जनताच पंचनामा करण्यासाठी सज्ज
गेल्या पाच वर्षात मागेल त्या गावाला आणि वाडी-वस्तीला कसलाही गट तट याचा विचार न करता पाटण मतदार संघात सुमारे 1800 कोटी रुपयांची विकासकामे मंजूर करुन बहुतांशी विकासकामे सुरुही झाली असताना आमच्या विरोधकांना विकासच दिसत नाही. त्यामुळे विकासकामांच्या मुद्यावर समोरासमोर या. आता जनताच पंचनामा करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे आपल्या गावात विकास झाला की नाही हे जनताच ठरवणार आहे, असा टोला आमदार शंभूराज देसाई यांनी सत्यजितसिंह पाटणकर यांना लगावला.