सोमेश्वरनगर – वीर धरणातून सोमवारी (दि. 5) एक लाख क्युसेकने नीरा नदीत विसर्ग सोडल्याने होळ (ता. बारामती) येथील पुलावरून जोरदार पाणी वाहल्याने या पुलाची दुरवस्था झाली होती. तर पूल वाहतुकीसाठी बंद केल्याने साखरवाडी (ता फलटण) गावाशी संपर्क तुटला होता. त्यातच रविवारी (दि. 11) दुपारी एकच्या सुमारास धरणातून 30 हजार 800 क्युसेकने पाणी सोडल्याने हा पूल पाण्याखाली गेला असूनही यावरून धोकादायक स्थितीत प्रवास सुरू असून प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
साखरवाडी, सोमेश्वरनगर, वडगाव निंबळकर मोठी बाजारपेठ असल्याने या होळ गावातील या पुलाचा वापर होळसह इतरांना मोठ्या प्रमाणात होत असतो. दरम्यान, वीर धरणातून गेल्या सोमवारी एक लाखापेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू होता, त्यामुळे होळमधील या पुलाचे संरक्षण कठडे तुटले असून रस्त्याचीही दयनीय अस्वस्थता झाली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी या पुलाची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी होळ ग्रामस्थांनी केली आहे.