इंद्रायणीनगर – भोसरी परिसरात स्थापत्य विभागाचा भोंगळ कारभाराचा फटका करदात्या नागरिकांना सोसावा लागत आहे. परिसरातील अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दिवसेंदिवस अपघातांमध्ये वाढ होण्याचे प्रमाण वाढले आहे. परिसरातील अनेक अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण त्वरित करावे, अशी मागणी भोसरीतील नागरिकांसह वाहनधारकांकडून होत आहे.
भोसरी परिसरात मोठ्या प्रमाणात रस्ते कॉंक्रिटीकरण सुरू आहे. परंतु परिसरातील मुख्य रस्त्यावर तसेच प्रभागातील रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. उखडलेल्या रस्त्यांमुळे अपघात होतो. नागरिकांचा नाहक बळी जातो. परंतु प्रशासन कायमस्वरूपी तोडगा काढत नसल्याचे नागरिक सांगतात. दरवेळी काही प्रमाणात तात्पुरत्या स्वरूपाची डागडुजी करत असल्याचे तसेच लवकरच याठिकाणी रस्ता कॉंक्रिटीकरण होणार असल्याचे सांगून वेळ मारून नेत असल्याने नागरिक स्थापत्य विभागाच्या कारभाराबाबत संताप व्यक्त करीत आहेत.
राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखालील चांदणी चौक येथे मोठा खड्डा पडला आहे. हा रास्ता अतिशय वर्दळीचा व रहदारीचा आहे. रात्रंदिवस या मार्गावरून अवजड वाहनांसह पीएमपीमएल बसेस, लहान-मोठी चारचाकी वाहने, दुचाकींसह इतर वाहनांची रहदारी सुरू असते. वाहनाने प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यांना आपला जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून जावे लागत आहे.
रस्त्यावरील खड्डे चुकविण्याच्या नादात दररोज अपघात घडत आहेत. या रस्त्यावर पडलेल्या मोठ्या खड्ड्यांत दररोज अनेक वाहने आदळत आहेत. अनेक जण जायबंदी झाले आहेत. संबंधित विभाग निवेदने दिल्याशिवाय कुठलीही दखल स्वतः घेत नाही. त्यामुळे या खड्ड्यात एखाद्या मोठ्या अपघाताची प्रतीक्षा संबंधित विभाग पाहतो का? असाही सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वाहनांचे होतेय नुकसान
भोसरी परिसरातील बऱ्याच मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यात शहरात आधुनमधून पाऊस येत असल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने वाहने खड्ड्यांमध्ये अपटून मोठे नुकसान होत आहे. पुढच्या चाकाजवळील शॉकप्सरचे ऑइलसील खराब होत आहेत. वाहने आदळून स्पेअरपार्ट खराब होत आहेत. त्यामुळे वाहनचालकांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
शारीरिक व्याधींनी वाहनचालक त्रस्त
बऱ्याच वेळा वाहने खड्ड्यांमध्ये अपटल्याने वाहनांचे तर नुकसान होत आहे परंतु वाहनचालकांना देखील शारीरिक व्याधी निर्माण होत आहेत. बऱ्याच वाहनचालकांना जुने आजार उद्भवत आहेत. तर काहींना वाहने खड्ड्यांमध्ये आदळल्याने मणक्याच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने केवळ कागदोपत्री खड्डे न बुजविता सर्वसामान्य व करदात्या नागरिकांचा विचार करून प्रत्यक्ष खड्डे बुजविण्याचे काम करावे.
भोसरी परिसरातील रस्त्यांवर पावसामुळे काही ठिकाणी खड्डे पडले आहेत. ते खड्डे लवकरात लवकर बुजविण्यात येतील.
– विनय जगताप, अभियंता, स्थापत्य विभाग.
रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्यामुळे वाहनाचे नुकसान तसेच वाहनधारकला होणारी दुखापत नागरिकांना सोसावी लागत आहे. संबंधित विभागाने त्वरित लक्ष घालून समस्या सोडवावी.
– तुषार जाधव, नागरिक.