संगमनेर – महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे विधानमंडळातील सर्वात अनुभवी नेते आहेत. त्यांनी नव्या पिढीतील आमदारांना कायम मार्गदर्शन केले. महाविकास आघाडी हे तीन पक्षांचे सरकार असले तरी हा राज्यातील जनतेसाठी दुग्धशर्करा योग असून हे सरकार चांगले काम करून समृद्ध महाराष्ट्र निर्माण करेल, असा विश्वास व्यक्त करीत संगमनेरचे दंडकारण्य अभियान संपूर्ण राज्यातील आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार पर्यावरण व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.
पिंपरणे येथील कार डोंगर परिसरात जय हिंद लोकचळवळ अमृत उद्योग समूह, वनविभाग व सर्व सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दंडकारण्य अभियानाच्या 16 व्या आनंद मेळाव्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होते. यावेळी सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, खासदार सदाशिव लोखंडे, आ. डॉ सुधीर तांबे, बाजीराव पा.खेमनर, महानंदाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, ऍड. माधवराव कानवडे, प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, मनीष मालपाणी, लक्ष्मणराव कुटे, सुनंदाताई जोर्वेकर, मीराताई शेटे, शरयुताई देशमुख, डॉ. जयश्रीताई थोरात, मुख्य वनसंरक्षक नितिन गुदगे आदी उपस्थित होते.
ठाकरे म्हणाले की, ग्रामीण भागातून अनेक गोष्टी शिकायला मिळत असून महाविकास आघाडी सरकारमध्ये शहरी- ग्रामीण असे एकत्र विचार आले असून हा दुग्धशर्करा योग आहे. पर्यावरण व पर्यटन खात्यात नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला जात असून करोनासारख्या महामारीवर मात करण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन अत्यंत गरजेचे आहे. वृक्ष हे समृद्ध व संपन्न आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची असून 20 वर्षानंतर पिढी बदलते मात्र प्रत्येकाने वृक्षसंवर्धन पर्यावरणाचे संवर्धन केलेच पाहिजे असे सांगताना संगमनेरची दंडकारण्य अभियान ही खरी लोकचळवळ ठरली असून देशाला आदर्शवत ठरली असल्याचेही ते म्हणाले.
थोरात म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाठीशी महाविकास आघाडी सरकार आहे. याउलट केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या अंगावर गाड्या घालून त्यांना चिरडत आहे. हा फरक प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. अस्मानी संकटे, करोना महामारी असूनही आघाडी सरकारने विकासाचा वेग कायम राखला आहे. विरोधी पक्षातील अनेक देव पाण्यात घालून बसले आहेत, काहींना रात्री ही सरकार पाडण्याची स्वप्न पडत आहे. काही झाले तरी हे सरकार पाच वर्षे अत्यंत चांगले काम करणार असल्याचे ते म्हणाले.
कदम म्हणाले, शिक्षण, कृषी व सहकार हा त्रिवेणी संगम या भागांमध्ये आढळतो आहे. त्यामुळे ग्रामीण विकास समृद्ध झाला आहे. पारदर्शकता व कडक शिस्त ही सहकारातील अत्यंत महत्त्वाची बाब असून चांगले नेतृत्व असले तर दुष्काळी तालुक्यात मोठे परिवर्तन घडते याचे मोठे उदाहरण म्हणजे संगमनेर तालुका होय.प्रास्ताविक आ. डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ यांनी आभार मानले.
खा. लोखंडेंनी फोडले गुपीत
2014 लोकसभा निवडणुकीत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुपीत मदत केल्याने मी निवडून आलो. दोन्ही वेळेस मला त्यांची मदत झाली असून निळवंडे कालव्यांच्या प्रश्न फडणवीस सरकारच्या काळात मीच मार्गी लावल्याचे खा. लोखंडे यांनी सांगितले.