पुणे – आगामी पुणे महापालिकेची निवडणूक शिवसंग्राम पक्ष लढवणार आहे. त्यात, किती जागा लढवायच्या, कोणत्या ठिकाणच्या लढवायच्या, कोणासोबत जायचे यावर अद्याप निर्णय झालेला नाही, सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, असे शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी सांगितले.
पत्रकार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सरकारला शेतकऱ्यांच काही देणं-घेणं नाही, पण नबाब मालिकांचा जावई कसा सुटेल, शाहरूख खानचा पोरगा कसा सुटेल, यातच सरकारला स्वारस्य आहे.
दिवाळीत जर शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही, तर दिवाळीनंतर शिवसंग्रामचा राज्यातील पहिला मोर्चा बीड जिल्ह्यात सरकार विरोधात निघेल, असा इशारा आमदार मेटे यांनी दिला आहे. दोन महिने झाले, तरी मराठा आरक्षणाविषयी राज्य सरकारने साधी बैठकही बोलावली नाही. कोणत्याही परिस्थितीत ठाकरे सरकारला मराठा समाजाला न्याय द्यायचा नाही, असा आरोप मेटे यांनी केला आहे.